Wednesday, March 4, 2026

banner 468x60

HomeललितBookshelf : ‘युद्ध जिवांचे…’ क्रूरतेचा भयानक संसर्गजन्य रोग!

Bookshelf : ‘युद्ध जिवांचे…’ क्रूरतेचा भयानक संसर्गजन्य रोग!

डॉ. अस्मिता हवालदार

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित या पुस्तकाचे पूर्ण शीर्षक ‘युद्ध जिवांचे : जैविक व रासायनिक संसर्गजन्य इतिहास’ असे आहे. ’संसर्गजन्य इतिहास’ का म्हटले असेल? कुतूहल वाटत होते. पुस्तक वाचू लागल्यावर मनुष्य जातीच्या क्रूरतेचा किती भयानक संसर्गजन्य रोग आहे, हे समजू लागते. माणसाचा इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. लेखक म्हणतो, “माणसांचे जीव वाचवायला शास्त्रज्ञ रोगप्रतिकारक औषधे बनवतात आणि तेच शास्त्रज्ञ माणसांचे जीव कसे घ्यायचे? यावर संशोधन करतात.”

काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूची साथ आली होती. पुण्यात जास्त पसरला होता. तेव्हा लसी पण टोचून घेतल्या होत्या. इथपासून पुस्तकाची सुरुवात होते. रोगजंतू पसरवायचे, भीती निर्माण करायची आणि मग लसी, औषधे विकायची हे गणित. त्यामागे असलेले राजकारणी, त्यांना अचानक आलेला जगाच्या आरोग्याचा पुळका. सगळेच डोके चकरावून टाकणारे…!

बायोलॉजिकल वॉर हा युद्धाचा एक प्रकार आहे. अस्त्र शस्त्र वापरून लढायचे युद्ध वेगळे. रोगजंतू पसरवून, विष टाकून आणि रसायने वापरून शत्रूला मारणे ही युद्धनीती पूर्वीपासून सुरू आहे. पहिल्या महायुद्धात यावर संशोधन झाले. रसायन युद्ध सुरू झाले. यावर प्रतिबंध आणण्यासाठी सर्वराष्ट्रीय करार करण्यात आला. यावर सही करणाऱ्या जर्मनीनेच रासायनिक शस्त्रं वापरली आणि वर सांगितले, आम्ही रासायनिक बॉम्ब वापरले किंवा फेकले नाहीत. आम्ही फक्त विषारी वायूच्या नळकांड्या उघडल्या. इतर राष्ट्रांनीही स्वसंरक्षणार्थ रासायनिक शस्त्रं बनवायला सुरुवात केली आणि कराराला तिलांजलि मिळाली. अश्रुधूर, फोस्जेन वगैरे विषारी वायू सौम्य वाटावी असा मस्टर्ड वायू आला, कल्पनातीत यातना देणारा. फ्रिट्झ हेबर याला रसायन शास्त्रातले नोबेल मिळाले, ज्याने रासायनिक युद्धाला जन्म दिला! पत्नीला पतीच्या कृत्यांची माहिती मिळाल्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. नोबेल पारितोषिकाची अशी गत तेव्हापासून झाली आहे. मुसोलिनीने अबिसिनिया देशावर रासायनिक शस्त्र सोडून माणसांसह किडामुंगी सुद्धा मारले अन् त्याचे कौतुक विस्टन चर्चिलने केले. अर्थात, चर्चिलकडून हीच अपेक्षा होती.

हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा

लेखक म्हणतो, “जपानी लोकांबद्दल सहानुभूती वाटते, पण त्यांनी केलेली कृष्णकृत्ये ऐकली तर,, हिटलर बरा वाटेल. त्यांच्या क्रौर्याला मर्यादा नाहीत.” जपानी लोक आपला राजा सम्राट हिरोहितोच्या आज्ञेने भूल न देता जिवंत शरीराची चिरफाड (व्हीव्हीसेक्शन) करत होती, माणसाच्या शरीराची सुद्धा! पुस्तकातले वर्णन वाचून धक्का बसतो. क्रौर्यात एकमेकांशी स्पर्धा सुरू आहे का? कोणाला क्रूरकर्मा खिताब द्यावा? जपानचे तर फिनिक्स पक्षासारखा राखेतून वर आला, असे कौतुक होत असते. त्यापाठचे अफूचे राजकारण म्हणजे आशियाला बरबाद करण्याचा यशस्वी डाव… चीनला अफूचे व्यसन लावून पिढ्या न पिढ्या नष्ट करणे समजले की, जपान कौतुकास पात्र आहे का? प्रश्न पडतो.

हिटलरने वेळीच रासायनिक शस्त्रे आणि जंतू वापरले नाहीत, हे त्याच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. असे म्हटले जाते. त्याला त्याच्या सहकाऱ्यानीच दगा दिला… घाबरवले. युद्धानंतर हिटलरने तयार केलेली जैविक अस्त्रे पाहून ब्रिटन आणि अमेरिकेची बोबडी वळली होती. जपानी आणि जर्मन शास्त्रज्ञांनी (!) केलेल्या प्रयोगांची आणि जैविक अस्त्रांची माहिती अमेरिकेला पुरवली, त्यामबद्दल अमेरिकेने जनरल शिरो इशी सारख्या क्रूरकर्म्याला अभय दिले, प्राध्यापकी दिली. इंग्लंडनेही प्रसिद्ध न्युरेम्बर्ग खटल्यात जर्मन शास्त्रज्ञाना वाचवलं. हे पुस्तक वाचल्यावर चर्चिलबद्दल घृणा वाटू लागते. हिटलरला संप्रेरके देऊन स्त्री करण्याचा प्रयत्न केला होता… अशा आश्चर्यचकित करणाऱ्या घटना या पुस्तकात सांगितल्या आहेत.

रशिया कसा पाठी राहील? त्यांचा संशोधक अलीबेक म्हणाला, ‘आम्ही माणसे एक-दोन अशी नाही तर, लाखात मोजतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसे मारतात तेव्हा फक्त आकडा महत्वाचा असतो.’ अमेरिकेत राजकारण्यांना, कोणी जैविक अस्त्रे वापरेल, असे वाटत नव्हते. पण पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर सर्वांचे डोळे उघडले, करार वगैरे बाजूला पडले. जनरल शिरो इशी यांना जीवनदान देण्याच्या बदल्यात जैविक अस्त्रांचे सगळे ज्ञान काढून घेतले.

व्हिएतनाममध्ये अमेरिकेने रासायनिक शस्त्र, जैविक बॉम्ब वापरून जमिनी नापीक केल्या. घनदाट जंगलातली झाडे मारली, निष्पर्ण केली, प्राणी पक्षी मारले. नापाम बॉम्ब म्हणजे काय ते वाचताना आणि चित्र पाहताना अंगावर काटा येतो! प्राण्यांवर चाचणी करणाऱ्या लेफ्टनंट विल्यमला त्यांचे हाल पाहून वेड लागलं. सद्दाम हुसेनला आधी अमेरिकेने शस्त्रास्त्र पुरवली. त्याने कुर्दी लोकांवर रासायनिक शस्त्र सोडली. केमिकल आली या सद्दामच्या साथीदाराने कुर्दी लोकांची गावे रसायनांचा वापर करून मारली. बंदुकीच्या गोळ्या कशाला वाया घालवायच्या, हा त्यांचा सिद्धांत! सद्दाम आणि त्याच्या साथीदारांना अमेरिकेने पाठीशी घातलं ते खोमेनीना संपवण्यासाठी. मग सद्दामची ताकद वाढल्यावर अमेरिकेचे डोळे उघडले. सद्दामला धडा शिकवताना ओसामा बिन लादेन निर्माण झाला. जैविक अस्त्र वापरायला नकोत, बंदी आणायला हवी; पण आम्ही मात्र वापरणार, हे अमेरिकेचे धोरण आहे.

हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

यापुढे Bacteria बॉम्ब तयार होतील. ते वापरायला सोपे असतील. त्याचा दुरुपयोग होईल. पोलिओचा कृत्रिम विषाणू तयार झाला आहे, इतरही होतील. जाणीवपूर्वक रोग पसवले जातात आणि त्यातून औषधंनिर्मिती कंपन्या भरमसाठ नफा कमावतात, हे स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू वगैरेवर औषधे विकणाऱ्या जिलाद, रोश कंपन्यांनी दाखवून दिले आहे.

हे पुस्तक लिहून काही वर्षे उलटली आहेत. आपण अधिक ’प्रगत (!)‘ झालो आहोत. सगळीकडे युद्धाच्या तुताऱ्या वाजत आहेत. हे रासायनिक शस्त्र, जंतू अस्त्र अजून कितीतरी घातक झालेले असेल. नुकताच कोरोना थैमान घालून गेला, आपल्याला अंतर्बाह्य ढवळून गेला.

हे पुस्तक वाचून झाल्यावर खिन्नता दाटून येते. पर्यावरणाची काळजी, मानवतेची काळजी, अखिल मानव जातीचे कल्याण वगैरे शब्दांचे फवारे आठवत राहतात. मानवी मूल्य, सहृदयता, माणुसकी वगैरेला आपण कधीच तिलांजली दिली आहे. सामान्य जनता भाबडी असते, त्यांचा अशा गोष्टींवर विश्वास बसतो. सध्या जगात बलाढ्य सत्ता जसे वागत आहे, ते पाहिल्यावर कुठलीही संघटना अगदी UN सुद्धा त्यांना आवर घालू शकणार नाही, याची खात्री पटते.

पुस्तक वाचून झाल्यावर सर्वावरच संशय वाटू लागतो. भूतकाळातल्या घटना आठवून आपण कशाकशावर विश्वास ठेवला, फसगत झाली याचे दुख होते, आपली अगतिकता जाणवते. शेवटी जे जे होईल ते ते चुपचाप पाहावे, सहावे हेच उरते. काळजी करून तरी काय होणार? असे असले तरी अज्ञानात सुख न मानता ज्ञान मिळवायलाच हवे. कोणास ठाऊक ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।’ कोणी येईल, त्यावेळी त्याचे मावळे तरी होऊ.

लेखक गिरीश कुबेर यांची सर्वच पुस्तकं अभ्यासपूर्ण आहेत. व्यंगात्मक भाषेत लिहिल्यामुळे इतका काळजाला भिडणारा विषय असून सुद्धा कधी हसू उमटते तर, कधी भयानकतेची तीव्रता अधिक होते. त्यांचे राजकीय विषयांवरचे लेखन (विशेषत संपादकीय), विचार वेगळे आणि पुस्तकांचे लेखन वेगळे. (या दोन्ही प्रकारांत लेखन करणारी व्यक्ती एकच आहे का? अशी शंका निर्माण होऊ शकते!) त्यांच्या राजकारणावरच्या मतांशी, विचारांशी मी मुळीच सहमत नाही. त्यांचे राजकारणावरचे लेखन मला अजिबात आवडत नाही. असे असून सुद्धा त्यांची पुस्तके संग्रही ठेवावीत, अशी आहेत. हे पुस्तकही वाचायला हवे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!