दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 05 फेब्रुवारी 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 16 माघ शके 1947; तिथि : चतुर्थी 24:21; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 22:56
- योग : सुकर्मा 24:03; करण : बव 12:10
- सूर्य : मकर; चंद्र : कन्या; सूर्योदय : 07:12; सूर्यास्त : 18:32
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:48)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. काम खूप असले तरी कठोर परिश्रमाने तुम्ही ते हातावेगळे करू शकाल. आर्थिक लाभ होईल. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतात. परदेश प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
वृषभ – आजचा दिवस संमिश्र असेल. कामानिमित्त एखादा छोटासा प्रवास कराल. आज नवीन कामे हाती घेण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यात यशस्वी देखील व्हाल. धार्मिक आणि सामाजिक कार्यातील तुमची आवड वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल, मात्र तुमच्या बोलण्याने कोणी दुखाले जाणार नाही, याची काळजी घ्या. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.
मिथुन – आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसाय मध्यम स्वरूपाचा राहील आणि कामात अनेकदा अडथळे देखील येतील. मात्र तुमचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम तुम्हाला यश मिळवून देईल. अर्थात, अपेक्षित यश न मिळाल्याचा त्रास होईल. आज नवीन प्रकल्प सुरू करणे टाळा, शक्य असल्यास आर्थिक व्यवहारही टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्याकडे लक्ष द्या, अकारण हेळसांड करू नका.
कर्क – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. व्यावसायिक घडामोडींमध्ये प्रगती होईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांची नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. कुटुंब आणि मित्रांसोबत पिकनिक किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह – आजचा दिवस संमिश्र असेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती मजबूत असेल, परंतु कौटुंबिक समस्या उद्भवतील. व्यवसाय चांगला चालेल आणि त्यातून नफा मिळण्याची शक्यता निर्माण होईल. मात्र कामाच्या जास्त ताणामुळे दिवस धावपळीचा बनेल. शारीरिक थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. कौटुंबिक वातावरण चांगले असेल, परंतु कुटुंबातील सदस्यांशी आणि नातेवाईकांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या.
कन्या – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय चांगला चालेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर, आज नवीन उपक्रम सुरू करणे टाळा, कारण यात नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज जुन्या मित्रांच्या भेटी होऊ शकता, ज्या फायदेशीर ठरतील. मित्रांसोबत सहलीचे नियोजन देखील केले जाऊ शकते.
हेही वाचा – मानखुर्द फलाट अन् सनी म्हणजेच ‘हृतिक’!
तुळ – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. व्यवसाय चांगला चालेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करू शकता, जे यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रगतीच्या आणि उत्पन्नात वाढ होण्याची संधी चालून येतील. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल, ज्यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल.
वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसायात नफा होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. मात्र, अनावश्यक खर्चामुळे तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ शकते. कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राग नियंत्रित करा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. आज एखाद्या बौद्धिक कामात किंवा लिखाणात सक्रिय असाल.
धनु – आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसायात नफा आणि कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मात्र नवीन प्रकल्पात घाई करणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता देखील आहे. व्यवसाय आणि कुटुंबात सुसंवाद राहील. बाहेर जाण्याच्या योजना पुढे ढकलल्या जाऊ शकतात. मनोरंजनावर वायफळ खर्च करणे टाळा.
मकर – कामाच्या ठिकाणी परिस्थिती आव्हानात्मक असू शकते. पदोन्नती किंवा पगारवाढीला उशीर होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. एखाद्या कामासाठी कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आज खर्च नियंत्रणात ठेवा. मालमत्ता आणि शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम. आजच्या दिवशी प्रवास मात्र टाळा.
कुंभ – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. त्याचबरोबर, आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवर काम करू शकाल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे.
मीन – व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या प्रचंड ताणामुळे खूप मेहनत आणि धावपळ करावी लागेल, परंतु कामातील यश आनंद देईल. नवीन व्यक्तींशी होणारे संपर्क फायदेशीर ठरेल. रिअल इस्टेट आणि कोर्ट केसेसशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि आर्थिक व्यवहार टाळा. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
दिनविशेष
लेखिका आणि कथाकथनकार गिरिजा कीर
टीम अवांतर
लेखिका आणि कथाकथनकार म्हणून नावाजलेल्या गिरिजा कीर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1933 रोजी धारवाड येथे झाला. मुंबई विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्या लेखनाकडे वळल्या. कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णनं अशा विविध वाङ्मय प्रकारात त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. त्यांच्या चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, गिरीजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, झपाटलेला अशा अनेक कादंबऱ्यांना मोठी वाचकप्रियता लाभली. व्यक्तिचित्रणातही गिरीजा कीर यांची वेगळी शैली बघायला मिळते. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके समीक्षकांच्या पसंतीस उतरली.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गिरीजा कीर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार’, पुणे मराठी ग्रंथालयाचा कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरूची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री साहित्यिक पुरस्कार आदी सन्मानांनी गौरविण्यात आले.
हेही वाचा – भीती… लेक तन्वीचं वक्तव्य ऐकून शैलेश चमकला!
बालसाहित्यातही त्यांनी विपुल निर्मिती केली. झंप्या द ग्रेट!, फुलं फुलवणारा म्हातारा, चला, उठा, जागे व्हा, शाब्बास, पुंडी शाब्बास! अशी पुस्तके लहान मुलांसाठी त्यांनी लिहिली. कैद्यांचे आयुष्य, त्यांचा तुरुंगावास यांचं चित्रण करणारे त्यांचे ‘जन्मठेप’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकाकरिता त्यांनी येरवडा कारागृहातील कैद्यांवर 6 वर्ष संशोधन केले होते. 1968 ते 1978 या काळात त्या ‘अनुराधा’ मासिकाच्या सहाय्यक संपादिका होत्या. सामाजिक समस्यांची जाण यावी यासाठी त्यांनी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन अभ्यास केला. त्यांच्या साहित्यात या जीवनानुभवाचे प्रतिबिंब दिसते.
ठाणे येथे आयोजित झालेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांची एकंदर 115 पुस्तके प्रसिद्ध झाली. 31 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.


