भाग – 2
म्हाईचं आगमन होणार म्हणून दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानातून सामान आणतो, असे तिला झाले होते. त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. दीपूच्या घरात गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षांच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे.
बुडीत गेलेल्या पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिपूच्या बाबांना 50 हजार रुपयांचा चेक दिला होता. तो वटविण्यासाठी ते तालुक्याच्या गावी गेले होते. दोन वाजायला आले आणि दीपूची आई आत-बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहीत होते, चारच्या गाडीने ते येणारच! पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिच्या आत बाहेर फेऱ्या सुरू झाल. साडेपाचच्या सुमारास गाडीचा आवाज आला, तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दिपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला, तिने दिपूला हाक मारली… “दिपू ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आलेत, त्यांच्याकडून तीन-चार हजार घे आणि दुकानात जाऊन सर्व सामान व्यवस्थित आण.”
“हो, आई येतो,” म्हणत दिपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दिपूचे बाबा घराजवळ पोहोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.
“मिळाले ना पैसे?” दिपूच्या आईने विचारले. बाबा रडवेले होत म्हणाले, “नाही, बँकेत त्यांच्या अकाऊंटवर पैसेच नाहीत.”
“काय?” दिपूची आई किंचाळली, तीही रडवेली झाली.
“सकाळपासून स्टेट बँकेत होतो. त्यांच्या अकाऊंटला फक्त 220 रुपये होते, म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले, “काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी दोन वाजता पुन्हा पैसे भरतो. तुम्ही दोननंतर तुमचा चेक पास करा. म्हणून न जेवता परत दोन वाजल्यापासून बँकेत उभा. अडीच वाजता चेक बँकेत दिला तर, तो बँकेचा माणूस म्हणाला, ‘अहो, या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत… सर्वांचे चेक परत गेलेत. यांच्या अकाऊंटला काही रक्कम नाहीच आहे. त्यामुळे कुणाचे चेक पास झालेले नाहीत.’ मी परत संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर भले मोठे कुलूप. चार वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली.”
हेही वाचा – म्हाई… आर्थिक अडचणीत चेकचा दिलासा
दिपूच्या बाबांचे शब्द दिपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार, हे तिला कळत होते. पण तिच्या मनाने उसळी घेतली… छे छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गाळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी… पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला बरं वाटत नाही, हे पाहून दिपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली.
दिपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दिपूला म्हणाली, “दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज म्हाई येणार आमच्याकडे, एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा.” दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यांपासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटांत दिपू धावत आला. “आई, वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही.” तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते. एवढ्या माणसांचे जेवणखाण व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित ‘मानकर’ यांची ही परिस्थिती! प्रतिष्ठित मानकरी, म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाहीत! ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी घोडे ठेवले होते, रोज दहा-वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधण बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन-चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे… या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार म्हाईसाठी माल नाही म्हणतो?
दिपूच्या आईला रडू येत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली, “दिपू चल माझ्याबरोबर.”
“कुठे आई?”
“रघू सोनार किती वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवतो?” तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.
“सहापर्यंत…” दिपूचे बाबा म्हणाले.
तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली, एवढ्यात संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला.
“काय हे संज्या?” तिने विचारलं.
“आईने पाठवले तुमच्याकडे,” संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली अन् त्या टोपलीकडे दीपूची आई पाहातच राहिली. टोपलीत तीन-चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.
“अरे हे कोणासाठी संज्या?” दिपूची आई आश्चर्याने ओरडली.
“तुमच्यासाठी काकी… तुमच्याकडे म्हाई येणार ना! दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ‘संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला, आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस-पंचवीस लोक असणार… त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही.’ माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली, ‘संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले… आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील.’ माझ्या आईने ही टोपली भरली आणि आणि तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं.”
दिपूची आई रडत रडत खाली बसली. “काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी, पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्याच रूपात आत्ताच भेटली.” दिपूची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. “बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात.” संजाने आणि दिपूने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.
आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात भिजत घातले. कोथिंबीर मोडून ठेवली. बटाटे, कांदे चिरायला घेतले. पुऱ्यांची तयारी केली.
इकडे देवळात ढोलांचे, ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम… ढम… म्हाई निघाली, म्हाई निघाली… भक्तांच्या भेटीला म्हाई निघाली… सगळ्या गावात उत्साह संचारला.
दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन-अडीच तासांत सगळा स्वयंपाक पूरा केला. आधी बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली, तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने आंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे नेसले. दिपूही आंघोळ करून तयार झाला.
साडेअकरा वाजले आणि ढोल ताशेजवळ वाजायला लागले. ढम…ढम… ढम, ताड.. ताड… ताड…., शिंग वाजू लागले… दिपूच्या बाबांनी म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजाऱ्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकऱ्याच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपूच्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी ‘पुंडलिक वरदे’ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाणा-बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी… भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली…
हेही वाचा – पूल पडला… मुकादमला दणका
रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली, पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजयची आई ‘म्हाई’सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर…
दिपूच्या आईला झोप येईना. दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एकसारखी आठवण येत होती.
सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयांची खीर आणि पुऱ्या, वाटाणा बटाट्याची भाजी घेतली आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच आळीत शेवटचं घर संज्याचं. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने संज्याच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली, “संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडावं लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारासमोर घराण्याची अब्रू जाणार होती. संज्याच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली! संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई.”
“असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.”
“कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत… आमची म्हाई त्यांना शिक्षा देत नाही. संज्यच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई.”
संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजयची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे, रडणे ऐकून तेथे आलेले संजयचे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.
समाप्त
मोबाइल – 9422381299


