पराग गोडबोले
शनी वक्री असला की, काय होतं याची अनुभूती मी नुकतीच घेतली. असाच रविवारचा दिवस होता. दिवाळी नुकतीच संपली होती. गोडधोड, तेलकट, तुपकट, सगळं मनसोक्त हादडून झालं आणि मग बायकोने फर्मान काढलं. आता पुढचे पंधरा दिवस पोळी, भाजी आणि वरण-भात याशिवाय घरात काहीही शिजणार नाही. खूप पुरवले चोचले जिभेचे, आता सात्विक खा जरा!
होय महाराजा, म्हणून मान तुकविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच माझ्याकडे, तरी मी एक क्षीण असा प्रयत्न करून बघितला, पण तिचा नन्नाचा पाढा… मी हताश. रविवार असूनही हे असं? किती तो अन्याय…
मी म्हणालो, “काही नाही तर, मस्त आमटी तरी कर की! निदान चरचरीत आमटी-भात तरी खाईन म्हणतोय…” दोन क्षण शांतपणे बघितलं माझ्याकडे आणि म्हणाली, “माझी पोळी भाजी करून झाली आहे. एवढं वाटतंय ना खावंसं, तर स्वतः बूड हलव की जरा. नुसता तो पेपर नाहीतर मोबाइल घेऊन अखंड तंगड्या पसरून बसून राहायचं. बायको आपली राबतेय स्वयंपाकघरात… नुसत्या फर्माईशी करायला लागतंय काय?”
च्यायला, ही भलतीच आफत. करायला जावं एक आणि भलतंच काहीतरी लचांड मागे लागावं, असं बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत घडतं. तसंच आज पण घडत होतं.
मी पण काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो. ठासून म्हणालो तिला, “मला आव्हान देऊ नकोस, मी ठरवलं तर काहीही करू शकतो. मला मॅगी करता येते, ऑम्लेट करता येतं, कुकर लावता येतो, फोडणीची पोळी करता येते, यह आमटी-भात क्या चीज है? चुटकीसरशी करून दाखवेन, आहेस कुठे? पण एक अट आहे, मी माझी पाककला सिद्ध करत असताना तू लुडबूड करायची नाहीस अधेमधे. कबूल असेल, तर आज मस्त बेत जमवतो!”
चांगलं आहे. नाहीतरी मला जरा मैत्रिणीकडे जायचं आहे. तिच्याकडे साड्या घेऊन तिची मैत्रिण येणाराय विकायला. मी जातेच कशी. आत्ता अकरा वाजतायत, येईन एक वाजेपर्यंत. आहेत दोन तास तुझ्याकडे, काय वाट्टेल तो गोंधळ घाल, पण मला एकही फोन करायचा नाही, सांगून ठेवतेय! कामवाल्या मावशी पण येऊन गेल्यात, म्हणजे तुला त्रास द्यायला कोणीच नाहीये. पूर्ण स्वातंत्र्य तुला…”
माझा निश्चय थोडा डळमळला… “फोन करायचा नाही म्हणजे जरा अति झालं तुझं. काही अडलं तर काय करू?”
“मला नाही माहीत, मी फोन बंदच करून ठेवते, म्हणजे प्रश्नच मिटला.”
कपडे बदलून, पायात चपला अडकवून, मला टुकटूक करून, एक वाजता जेवायला मिळेल एवढं बघा, असं खिजवून ती गेली आणि मी डोकं खाजवायला लागलो. आज नेमकी लेक पण नव्हती घरी, नाहीतर तिची मदत नक्कीच झाली असती.
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
मी मनातल्या मनात उजळणी करायला लागलो. आमटी भात करायचा, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कुकर लावणे. तसा आधी लावला होता कुकर बऱ्याच वेळा, पण प्रत्येक वेळी कुकर लावणे म्हणजे नवं प्रकरण असतंय माझ्यासाठी. दोघांना किती भात लागेल, त्यासाठी किती तांदूळ लागेल, कुठली भांडी लागतील, याचा अदमास घेतला. अंदाजाने दोन पातेली घेतली. एकात एक मूठ तांदूळ आणि दुसऱ्यात अदमासे डाळ घेतली. दोन्ही जिन्नस धुवून घेतले आणि मग बोटांची पेरं बुडतील अशा अंदाजाने पाणी घातलं.
तांदूळ शिजवताना त्यात किती पाणी घालावं हे मला कधीही न जमलेलं प्रकरण. कधी भात पिचपिचीत होतो, तर कधी पार फडफडीत. डाळ पण तशीच कात्रज दाखवते मला! कधी ती अर्धी कच्ची राहते, तर कधी पार मेण होते… यांच्या मधली सुयोग्य पातळी गाठणं हे म्हणजे मोठंच आव्हान. डाळ-तांदूळ एकत्र लावल्यानंतर नक्की कितव्या शिट्टीला गॅस बंद करायचा, हे पण कधीच न सुटलेलं कोडं. कुकरमध्ये तळाशी किती पाणी घालायचं, हाही एक ज्वलंत प्रश्न, काळजाचं पाणी करणारा. किती अंदाज बांधायचे ते?
तर, हा सगळा जांगडगुत्ता कसाबसा कुकरमध्ये कोंबला आणि गॅस लावून निवांत बाहेर जाऊन बसलो. मागे एकदा बायको म्हणाली होती, तीन शिट्ट्या करायच्या, गॅस थोडा वेळ बारीक करून ठेवायचा आणि मग बंद करायचा. मी ते तंतोतंत लक्षात ठेवलं होतं. बाहेर येऊन बसल्यावर, बराच वेळ काहीच घडेना! शिट्टी काही वाजेना. माझी वरात आत. बघतो तर काय, सगळीकडून नुसती वाफ बाहेर पडतेय, भसाभसा. बायको समोर तोंडची वाफ दवडणाऱ्या मला, ही वाफ अपरिचित. आता काय करावं बरं?
गॅस बंद केला. कुकरचं झाकण उघडलं तर भसकन् वाफ बाहेर आली आणि हात पोळले माझे तेवढ्यात. मनातल्या मनात एक सणसणीत शिवी हासडून, झाकणाची रबरी रिंग बघितली, तर ती नीट बसलीच नव्हती. झाकण पाण्याखाली धरलं, रिंग नीट बसवली आणि परत थोडं पाणी घालून झाकण लावलं. धांदल नुसती.
आता गॅस लावून, तिथेच उभा राह्यलो ठिय्या देऊन. थोड्याच वेळात, शिट्टी लटलट कापायला लागली आणि सगळं व्यवस्थित होणार याची खात्री पटली. यथासांग तीन शिट्ट्या झाल्या, गॅस थोडा बारीक केला आणि मग बंद केला.
आता पुढे काय, हे कुकरचं झाकण उघडल्यावर कळणार होतं. सगळं व्यवस्थित असेल हा आशावाद जागवून, तेलाची बुधली, कांदा, टोमॅटो, कढीलिंब, लसणीच्या पाकळ्या आणि मिसळणाचा डबा ही आयुधं परजून ठेवली. माझ्या नशिबाने, मिसळणाच्या डब्यातली सगळी पूडं भरलेली होती. हळद, तिखट, हिंग, जिरं, गोडा मसाला, सगळं काही होतं. नसतं तर भारी पंचाईत झाली असती!
कांदा, टोमॅटो मस्त चिरून घेतला बारीक. हल्ली ते दोरी ओढण्याचं नामी यंत्र आलंय घरात. पाच मिनिटांत काम तमाम. आहे काय आणि नाही काय…
हे सगळं करेस्तोवर चहाची तलफ आली. मग मस्त आलं घालून चहा केला, निवांत घुटके घेत तो संपवला, फोनवर मुशाफिरी करून आलो आणि झाकण निघण्याची वाट बघू लागलो. बायकोला फोन करावा का नाही या द्वंद्वात होतो, पण कटाक्षाने टाळलं. मला ठाऊक होतं, तिलाच राहवणार नाही आणि फोन येणार म्हणजे येणार. थट्टी years का experience है भाय!
हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…
यथावकाश झाकण निघालं. भात आणि डाळ बाहेर काढल्यावर मला आभाळ ठेंगणं झालं. दोन्ही, अगदी मला अपेक्षित असलेल्या मात्रेत शिजले होते! दोन शितं चिमटीत घेऊन तपासणी केली. शितावरून भाताची परीक्षा अगदी तंतोतंत जमली मला. भले शाब्बास. भात शिजला होता की! बायको समोर नसली शिजत डाळ माझी, तरी प्रत्यक्षात मात्र ती चांगली शिजली होती. आता आमटीचे वेध लागले होते. मागे एकदा बायकोने कृती सांगितली होती, तिची उजळणी केली आणि सिद्ध झालो.
पातेलं गॅसवर ठेवलं आणि त्यात तेल घातलं. ते तापल्यावर त्यात मोहरीची चिमूट सोडली. तडतडली मोहरी. त्या मोहरीच्या तडतडण्याची, बायकोच्या तडतडण्याशी तुलना करायचा मोह आवरला नाही मला आणि हसू आलं गालातल्या गालात… मग कांदा आणि लसूण घातलं आणि ते छान परतून घेतलं. हळद, तिखट, हिंग, कढीलिंबाची पानं, गोडा मसाला, सगळं त्या फोडणीत घातलं आणि मस्त एकजीव केलं मिश्रण.
सुगंध बहरला फोडणीचा.
डाळ थोडी सारखी करून घेतली आणि त्या फोडणीवर सोडली. चर्र आवाज आला आणि मी सुखावलो. मीठ घातलं, थोडं आणखी पाणी घातलं, ढवळलं, टोमॅटो घातला आणि गॅस बारीक करून झाकण ठेवलं. अरे यार, जमतंय तुला म्हणत, स्वतःचीच पाठ थोपटून घेतली मी.
आमटी आकाराला येत होती. तेवढ्यात आठवलं आणि आमसूलाच्या दोन पाकळ्या सोडल्या त्यात. बायको चिंच घालते, माझा आपला थोडासा वेगळा प्रांत…!
झाकण काढून एकदा डोकावलो त्यात, परत ढवळून घेतलं आणि सगळं मनासारखं झालंय, शिजलंय, हे जाणवल्यावर आच बंद केली. माझ्या आमटीला बहारदार रंग आला होता. पाणी सुटलं तोंडाला. घेतली थोडीशी काढून एका वाटीत आणि आचमन केलं. काहीतरी कमी वाटत होतं. काय ते कळत नव्हतं, पण नंतर पेटली बत्ती आणि आठवलं, गूळ तर राहिलाच की! त्याच्याशिवाय काय खुमारी आमटीला? लगोलग दोन चमचे गुळाची पूड सोडली आमटीत आणि परत एकदा गॅस लावून ती नीट सामिल केली त्या मिश्रणात. परत चव बघितली आणि भरून पावलो. चिरलेली कोथिंबीर मग वरून घातली आणि निवांत झालो.
ओटा आवरतच होतो, तेवढ्यात फोन आलाच… “काय, येऊ का आमटीभात खायला?” आवाजात उत्सुकता आणि चेष्टा… हे दोन्ही स्वर जाणवले. मी म्हणालो, “लगेच ये. माझ्या मते जमलंय मला. उत्तीर्ण झालोय का नाही तुझ्या परीक्षेत ते तू ठरवायचं.”
पाचव्या मिनिटाला बेल वाजली. मी पानं तयार ठेवली होती. हातपाय धुवून आम्ही जेवायला बसलो आणि पोळीचा पहिलाच घास तिने आमटी सोबत घेतला. घास तोंडात असतानाच, तर्जनी आणि अंगठा जुळवून, मस्त झालीये म्हणाली आणि मी खुश झालो.
नंतर आमटी-भात सुद्धा ओरपला आम्ही आणि भरून पावलो मी तिच्या कौतुकाने.
“आता बटाट्याची भाजी करून बघ एकदा, नक्की जमेल तुला…”
म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो तो असा.
हसतखेळत जेवण झालं आमचं आणि जगण्याच्या रोजच्या रामरगाड्यात, हे असं तोंडी लावणं असलं, की संसाराचा आमटीभात आणखीनच चटकदार होतो, हे पटलं मला.
पटतंय ना तुम्हाला?
मोबाइल – 9323277620


