भाग – 1
“सौमित्र, अरे रात्रीचे अकरा वाजलेत, तुझी आई परत घरात दिसत नाही रे….” नानासाहेबांच्या त्या हाकेने सौमित्र एकदम आपल्या खोलीतून बाहेर आला. पाठोपाठ मेघापण बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थोडे त्रासिक भाव दिसले, पण त्याकडे दुर्लक्ष करून नानासाहेब आणि सौमित्र सुमतीताईंना शोधायला बाहेर पडले. इतक्या रात्री कुठे गेली असेल? कोणाला विचारणार? तसे करणे बरेही वाटत नव्हते. दोघेही आपापल्या विचारांच्या तंद्रीत चालत चालत घराजवळील गणपतीच्या मंदिराजवळ आले. तिथे त्यांना मंदिराच्या पायरीवर एकट्याच बसलेल्या सुमतीताई दिसल्या… त्यासरशी सौमित्र झपझप चालत त्यांच्याजवळ जाऊन जवळपास ओरडलाच, “आई, काय हे? का अशी त्रास देतेस? न सांगताच कशी काय निघून येऊ शकते तू आणि तेही इतक्या रात्री! अगं नानांकडे पाहा किती घाबरले आहेत ते? तुझं असं विचित्र वागणं फार वाढत चाललंय… काय म्हणावं तुला?”
दुरून नानासाहेब हे सगळं पहात होते, त्यांना सौमित्रचा त्रागा समजत होता, पण सुमतीच्या अशा वागण्याने ते काळजीत पडले होते. सौमित्रचा आवाज ऐकून सुमतीताईंनी निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यासोबत त्या मुकाट चालू लागल्या…
अलीकडे सुमतीताई अधून मधून अशाच विचित्र वागायला लागल्या होत्या, दिवसातून कधी कधी दोन-तीन वेळा आंघोळ करायच्या… कुठेतरी वस्तू ठेवून द्यायच्या आणि मग आठवलं नाही की, दिवसभर ते शोधण्याच्या नादात घरभर पसारा काढून ठेवायच्या… एकदा तर नानासाहेबांसोबत बाजारात भाजी आणायला गेल्या असताना आपला भाऊ वसंता समजून तो घरी का आला नाही, म्हणून एका भलत्याच माणसाला फैलावर घेतले होते… त्या माणसाची समजूत घालता घालता नानासाहेब वैतागले होते आणि चार लोकांत सुमतीताईंनी तमाशा केल्यामुळे खजिलही झाले होते. बरं, तेव्हा सुमतीताई काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या, “तो वसंताच आहे. माझ्यापासून तोंड लपवत का फिरतो आहे,” म्हणून रडायलादेखील लागल्या होत्या. कसंबसं समजावून नानासाहेबांनी त्यांना घरी आणलं होतं. त्यानंतरही त्यांचं वागणे सामान्य नव्हतंच. याआधीपण त्या अशाच त्यांच्या मनात आले तेव्हा कोणालाही न सांगता घरून निघून गेल्या होत्या.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
आता नानासाहेब आपल्याच विचारांच्या तंद्रीत घरी आले. सुमतीताईंना त्यांच्या खोलीत झोपवून आल्यावर सौमित्र नानासाहेबांना म्हणाला, “नाना, मला आईचे वागणे काही सामान्य वाटत नाही. हल्ली ती जरा विचित्रच वागतेय. आपण उद्या तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊयात.” नानासाहेबांनाही त्याचे बोलणे पटलं. म्हणून त्यांनी मान हलवून संमती दर्शवली आणि ते झोपायला गेले. बेडवर सुमतीताई आपल्या हातात मोगऱ्याचा गजरा घेऊन शांत झोपल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी सुमतीताई नेहमीप्रमाणे नॉर्मल होत्या. सकाळी उठून आपली नेहमीची कामे आटोपून त्या बाहेर देवासाठी फुले तोडत होत्या. सोबत सौमित्रची लहानगी स्वरुपापण आजीच्या मागे मागे पारिजातकाची फुले वेचत होती. काल जणू काही घडलंच नाही, अशा त्या वावरत होत्या. नानासाहेबांनी जेव्हा त्यांना येऊन सांगितले की, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे, तशा, “मला मेलीला काय झाले आहे? कशाला तुम्ही इतकी काळजी करता?” म्हणून हसत सुटल्या. नानासाहेब त्यांना आठवण करून द्यायचा प्रयत्न करत होते. पण त्यांना रात्री काय घडले, ते काहीच आठवत नव्हते. जेव्हा नानासाहेबांनी स्वतःच्या तब्येतीचे कारण सांगितले, तेव्हा मात्र त्या चटकन डॉक्टरकडे जाण्यास तयार झाल्या.
डॉक्टरकडे जाऊन सगळ्या तपासण्या आटोपल्यावर डॉक्टरांनी सौमित्र आणि नानासाहेबांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. सौमित्र आणि नानासाहेब आल्यावर डॉक्टर म्हणाले, “नानासाहेब, सौमित्र… सुमती वहिनींची प्राथमिक चाचणी केल्यानंतर माझा आणि माझ्या सहकारी डॉक्टरांचा निष्कर्ष असा आहे की, त्यांच्यात ‘स्मृतिभ्रंश’ अर्थात ‘अल्झायमर’ची लक्षणे दिसत आहेत. हा रोग सहसा पूर्णपणे बरा होत नाही, पण इलाज लवकर सुरू केला तर, याने भविष्यात उद्भवणारा त्रास कमी होऊ शकतो. मुख्य म्हणजे, रुग्ण तसा शारीरिकदृष्ट्या एकदम ठीक असल्यामुळे हॉस्पिटलाइज करता येत नाही. तुम्हाला घरीच अशा रुग्णांची शारीरिक आणि मानसिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत रुग्णाचे स्वतःच्या शरीरावर आणि मनावर नियंत्रण राहात नाही. त्यांना नैसर्गिक विधींचे भान राहात नाही, मेंदूवर ताबा नसल्यामुळे अशा व्यक्ती कशाही वागू शकतात. तुम्हाला त्यांना अगदी लहान मुलासारखे जपावे लागणार आहे. कधीकधी त्या तुम्हाला देखील ओळखणार नाहीत. स्वतःची स्वच्छता, खाणिपिणे, काळाचे भान इत्यादी गोष्टी समजणार नाहीत. दिवस आणि रात्रीतला फरक कळणार नाही. तेव्हा औषधांपेक्षा त्यांना मानसिक आधाराची जास्त गरज भासते… जे फक्त जवळचेच लोक करू शकतात. पण नियमित औषधोपचार आणि योगा, प्राणायाम करवून घेतले तर बऱ्याच अंशी याची तीव्रता कमी करता येते,” डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून सौमित्र आणि नानासाहेब दोघेही हादरून गेले.
डॉक्टर पुढे म्हणाले की, “त्यांना हे समजू देऊ नका आणि घरातील तसेच आजूबाजूच्या लोकांना समजावून सांगा की, त्यांच्या कोणत्याही कृत्याचे वाईट वाटून घेऊ नका. वागण्या-बोलण्यावरून त्यांची खिल्ली उडवून त्यांना हिणवू नका, त्या दुखावतील असं काहीही करू नका… कारण, त्या आता सामान्य नाहीत. आपण उपचार सुरू करूच, पण त्यांना बरं करण्यात मला तुमची खूप मदत लागणार आहे.”
नानासाहेब तर ते सगळं ऐकून खचूनच गेले, पण सौमित्रने त्यांना धीर दिला. बाहेर सुमतीताई मात्र आपल्याच विश्वात रममाण झाल्या होत्या. सुमतीताईंना घेऊन नानासाहेब आणि सौमित्र घरी आले. मेघाला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. ती घरी असल्याने तिला सुमतीताईंकडे जास्त लक्ष द्यावे लागणार होते… तिचा दोन मुलांचा सांभाळ करण्यातच दिवस जात होता आणि आता एका नवीन जबाबदारीला तिला तोंड द्यावे लागणार होते. तिच्या संसारात सुमतीताईंच्या रूपाने अजून एका ‘बाळा’ची भर पडली होती. जरा चिडूनच मेघाने सुमतीताईंना त्यांच्या खोलीत नेलं. नानासाहेबांच्या ते लक्षात आलं, पण ते काही बोलले नाहीत. कारण त्यांना आता आपल्या बायकोची काळजी जास्त वाटत होती आणि त्याचमुळे त्यांनी आता आपले सर्व लक्ष सुमतीताईंवर केंद्रीत केले होते.
सुमतीताईंनी नानासाहेबांना प्रत्येक समयी साथ दिली होती. आपली आवडनिवड बाजूला ठेऊन त्यांनी आपल्या घराला, मुलाबाळांना, नानासाहेबांना रुचतील त्याच सवयी स्वतःला लावून घेतल्या होत्या. आपल्या प्रेमळ आणि लाघवी स्वभावाने त्यांनी सासर तसेच माहेर दोन्ही घरच्या लोकांना जिंकून घेतलं होत. नानासाहेब भूतकाळात रमले होते…
नानासाहेब म्हणजे श्रीधर कुलकर्णी सरकारी उच्चपदस्थ अधिकारी होते. खानदानी श्रीमंत होते; तरीही स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यात गैर असे काहीच नव्हते. सुमतीचे स्थळ जेव्हा सांगून आले, तेव्हा खरंतर ते पहिले लग्नासाठी तयार नव्हते, पण जेव्हा सुमतीताईंचा ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो त्यांना दाखवला गेला, तेव्हाच त्यांना सुमती आवडली होती. रीतसर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम जेव्हा झाला, तेव्हा सुमतीचे रूप पाहून नानासाहेबांनी म्हणजेच श्रीधरने लगेच होकार कळवला होता. तिच्यात नाकारण्यासारखे काहीच नव्हते. लांबसडक काळेभोर केस, गोरा रंग, रेखीव नाक-डोळे असलेली सुमती पहिल्या नजरेतच सगळ्यांच्या पसंतीस उतरली. शिवाय, ती एम.ए. मराठी आणि संगीत विशारदही झालेली होती. उत्तम संस्कारी, गुणवान अशी सुमती!
पण लग्नानंतर एकाच वर्षाने सौमित्र झाला आणि त्यानंतर तीनच वर्षात सुपर्णा. त्यामुळे मुलांना मोठे करण्यात, त्यांच्या आवडीनिवडी जपण्यात, त्यांना आपले छंद बाजूला ठेवावे लागले. लग्नानंतर तिला रेडिओवर आपला शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली होती, पण सासरेबुवांनी त्याबाबत खडे बोल सुनावले होते… “आपलं घराणं गवय्याचे नाही, त्यामुळे गाणं, बजावणं घरापुरतेच मर्यादित ठेवा सुनबाई…” तिच्या प्रगतीला पहिली खिळ तिथेच ठोकली गेली होती. मुलं मोठी झाल्यावर सुमतीने आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न केला होता, पण… “ए आई, ते शास्त्रीय संगीत ऐकवून आमची झोपमोड नको करत जाऊ, उगाच काहीतरी गात बसतेस, आम्हाला बोअर नको करत जाऊस…” असे मुलांचे बोल तिला सारखे ऐकावे लागायचे.
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
एकदा ती रविवारी आपली हार्मोनियम घेऊन आपला आवडता राग “अल्हेया बिलावल” गात होती तर, श्रीधर म्हणजे नानासाहेबच तिच्या अंगावर केवढ्याने तरी ओरडले होते, त्यांच्या कामात व्यत्यय आला होता म्हणून! तिने तशीच पेटी जी अडगळीत टाकली होती ती आजपर्यंत वर काढली नव्हती. लेखनासाठीपण तिला अशीच हेटाळणी सहन करावी लागली होती. त्यामुळे तिची डायरीपण कुठेतरी धुळ खात पडली होती. नंतर तिने सकाळचे अभंग म्हणणेसुद्धा सोडून दिले होते. हळूहळू तिने आपल्या सर्वच आवडीनिवडींवर निर्बंध आणले… पण याने तिचे मुलांवरचे आणि नानासाहेबांवरचे प्रेम कधीच दुभंगले नव्हते. नानासाहेबही सुमतीताईंवर खूप प्रेम करत होते, पण त्यांना ते शब्दांत कधीच व्यक्त करता आले नाही. ते ऑफिसमधून येताना सुमतीसाठी रोज दोन मोगऱ्याचे गजरे मात्र आठवणीने आणत असत. आपल्या लांबसडक केसांमध्ये तो गजरा सुमतीने माळला की, नानासाहेब खूश होत असत.
सकाळीसुद्धा ऑफिसला निघायच्या वेळेस जेव्हा सुमती सुस्नात होऊन केसांमध्ये गजरा माळून त्यांना निरोप द्यायला उभी रहायची, तेव्हा तिचे ते रूप पाहून त्यांना ऑफिसला जाऊच नये, असे वाटायचे. सुमतीने याच कारणासाठी, जेव्हा स्वतःचे घर बांधले तेव्हा आपल्या अंगणात मोगरा, जाई-जुई, चमेली, गुलाब, अबोली, कुंदा अशी फुलझाडे मुद्दाम लावून घेतली होती. त्यामुळे देवालाही फुले मिळायची आणि गजऱ्याची हौसपण भागायची.
पण जसजसा संसाराचा व्याप वाढत गेला, तसतशा या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी मागे पडल्या, तिथे भावनिक गुंता मागे पडला आणि व्यावहारीकपणा मोठा झाला. नानासाहेबांकडे या असल्या क्षुल्लक गोष्टींकरिता नंतर वेळ नसायचा. पण सुमतीताई मात्र नानासाहेबांनी गजरा आणण्याची वाट पाहात रहायच्या… नाही काही तर घरीच केलेला गजरा मुद्दाम नानासाहेबांची नजर पडेल अशा जागी ठेवायच्या, जेणेकरून त्यांना सुमतीताईंच्या केसात गजरा माळण्याची आठवण राहील. पण कसलं काय? नानासाहेब आपल्या कामात, आपल्या मित्रांच्या गराड्यात आणि नोकरीत सतत मिळणाऱ्या मान-सन्मानात आणि बढतीमध्ये गुंतून गेले होते.
कधीतरी सुमतीने त्यांना याबाबत छेडले तर ते “तू काय लहान आहेस का? अजूनही वीशीतली तरुणी समजते की, काय स्वतःला?” असं म्हणून तिच्या सगळ्या गोष्टी हसण्यावारी न्यायचे, त्यांना आता हे सगळे प्रकार खुळचट वाटायचे. यामध्ये तिची तुलना कधीकधी नोकरी करणाऱ्या आधुनिक राहणीमान, आधुनिक विचार असणाऱ्या बायकांशी केली जायची. अधेमधे नानासाहेबांचा “मेल इगो”देखील डोकं वर काढायचा, यामुळे तिच्या मनात न्यूनगंड तयार व्हायला लागला होता. मुलं मोठी झाल्यावर ती आपापल्या व्यापात गुंतून गेली, घरामध्ये सुमतीताईंशी बोलायला कोणालाच वेळ नव्हता. त्यांच्या लेखी सुमतीताई म्हणजे काहीच नव्हत्या… तिने चारचौघींसारखा संसार करावा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, त्यांची अपेक्षा पूर्ती करावी, पै पाहुण्यांची सरबराई करावी, या सगळ्या गोष्टी त्यांनी न बोलता एका आदर्श गृहिणीचे कर्तव्य असतं म्हणून कराव्यात हे नानासाहेबांसकट सगळ्यांनाच अपेक्षित होतं. ती प्रत्येक बाबतीत गृहीत धरली जाऊ लागली. हळूहळू ती अबोल होत गेली. देवपूजेत, वाचनात, घरातील पसारे आवरण्यात आपला फावला वेळ घालवू लागली. पण नंतर हळव्या झालेल्या सुमतीने आपल्या आवडीनिवडी कधीच बाहेर येऊ दिल्या नाहीत, ती आपल्या कुटुंबाच्या सुखातच आपले सुख मानत गेली.
आपल्या वैयक्तिक जीवनात तिने तिला आवडणारी रागदरी परत कधीच आळवली नाही. नाजूक मनाची सुमती काळाच्या ओघात परत स्वतःला सावरूच शकली नाही! वरून जरी ती सामान्य वाटत असली तरी, आतून निराशा, वैफल्याने, कोंडमाऱ्याने कोरडी होत गेली.
क्रमश:


