डॉ. किशोर महाबळ
सध्याच्या प्रचलित शिक्षणपद्धतीतून आधुनिक शास्त्रे आणि विज्ञानाचे शिक्षण न घेतलेल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील निरक्षर मुलामुलींना ते मागासलेले आहेत, असे म्हटले जाते. आधुनिक शिक्षण घेतल्याशिवाय या आदिवासी आणि ग्रामीण भागातील निरक्षर मुलामुलींना काहीच भविष्य नाही, असेही बोलले जाते. आधुनिक शिक्षणाचे महत्त्व कोणीच नाकारणार नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की, आदिवासी तसेच ग्रामीण भागातील या निरक्षर मुलामुलींना काहीच येत नाही! काही वर्षांपूर्वी त्सुनामीमुळे अंदमान निकोबारमध्ये असंख्य व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, पण आधुनिक समाजाच्या दृष्टीने निरक्षर असलेले आदिवासी वाचले, कारण ते त्सुनामी येण्यापूर्वीच उंच पहाडावर जाउन थांबले होते!
गेली शेकडो वर्षे निसर्गाच्या सतत सान्निध्यात राहून साधी कंदमुळे, फळे खाऊन आपल्यापेक्षा ते कदाचित अधिक काटक जीवन जगत आले आहेत. ते जंगलातील औषधी वनस्पतींचा उपयोग करून आपले रोग बरे करीत आले आहेत. हे त्यांना कशामुळे शक्य झाले किंवा शक्य होत आहे? त्यांच्यातील निसर्गविषयक बुद्धिमत्तेमुळे त्यांना हे शक्य झाले, हे एक उत्तर आहे. साक्षरतेची म्हणूनच आपण खरेतर नवी व्याख्या केली पाहिजे…
या आदिवासी आणि ग्रामीण निरक्षर विद्यार्थ्यांना शहरी मुलामुलींपेक्षा पशू, पक्षी, प्राणी, वृक्ष, वनस्पती आणि निसर्गातील घटकांची कितीतरी जास्त माहिती असते. कारण ते निसर्गविषयक बुद्धिमत्तेने संपन्न असतात, हे आपण लक्षातच घेत नाही आणि त्यांना अज्ञानी निरक्षर तसेच मागासलेले समजतो. निसर्गविषयक बुद्धिमत्ता प्रत्येक विद्यार्थ्यात सुप्त रूपात असते. ज्या विद्यार्थ्यात ती अत्यंत विकसित झालेली असते, अशांची काही प्रधान वैशिष्ट्ये असतात. असे विद्यार्थी असंख्य वृक्ष, वनस्पती, फुले, फळे बघताक्षणीच त्यांची नावे, प्रकार, गुणधर्म, उपयुक्तता, वैशिष्ट्ये आणि काही प्रमाणात औषधी उपयोगही सांगू शकतात. जंगलातील प्राणी, पक्षी, बघताच त्यांची नावे, वैशिष्ट्ये, सवयी सहजगत्या सांगू शकतात. निसर्गातील छोट्या-मोठ्या बदलांचे, घटनांचे बारकाईने निरीक्षण करणे, त्या अनुभवणे, त्यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करणे, त्या माहितीतील साधर्म्य आणि वेगळेपण अभ्यासणे त्यांना आवडते. निसर्गात होणारे बदल ते चटकन ओळखू शकतात. निसर्गातील बदल बघताना ते मंत्रमुग्ध होतात. ते प्राण्यांची तसेच झाडांची उत्तम काळजी घेतात.
हेही वाचा – NCC… शिबिरार्थी होण्याचा अपूर्व अनुभव
त्यांना जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, खगोलशास्त्र हे विषय आवडतात. दुर्मीळ आणि नष्ट होत जाणाऱ्या जातींच्या संवर्धनात त्यांना विशेष रूची असते. निसर्गविषयक माहिती ते चटकन शिकतात. ही मुले ग्रहगती, तारे, चंद्राच्या कलेनुसार भरती-ओहोटी यासारख्या नैसर्गिक घटनांचीही माहिती गोळा करून ती अभ्यासण्याचा प्रयत्न करतात. जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र अशा विषयांत या विद्यार्थ्यांना अत्यंत रूची असते. ही मुले झाडांची पाने, विविध आकाराचे दगड, फुले, पक्ष्यांची पिसे अशा गोष्टींचा आवडीने संग्रह करतात.
निसर्गविषयक बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी प्रत्येक शाळेत निश्चित असतील. अशी बुद्धिमत्ता सर्वांमध्येच सुप्त स्वरुपात असते. काही विद्यार्थ्यामध्ये ती विकसित स्वरुपात आढळते. पण सर्वच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ती एका विशिष्ट स्तरापर्यंत त्यांच्यात विकसित झालीच पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. याचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.
निसर्गाबाबतच्या अज्ञानामुळे माणसे निसर्गावर असंख्य अत्याचार करीत आहेत. वृक्षांची कत्तल; पशूपक्ष्यांची हत्या; पाणी, हवा आणि जमीन यांचे प्रदूषण अशा निसर्गविरोधी गोष्टी करण्यात माणसे पुढाकार घेत आहेत. याचे असंख्य दुष्परिणाम होत आहेत. पण तरीही निसर्गाचे संतुलन नष्ट करणाऱ्या कारवाया थांबविण्यास कोणीच तयार नाही. ही परिस्थिती बदलविण्यासाठी, निसर्गाचे मानवी जीवनातील महत्त्व नव्या पिढीला पटवून देणे गरजेचे आहे. निसर्गातील संतुलन टिकून राहिले तरच, मानवी जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, अन्यथा ते नष्ट होईल. निसर्गाचे शोषण करायचे नाही तर, निसर्गाचे संगोपन आणि संवर्धन करायचे, हे शालेय मुलामुलींना पटवून द्यावे लागणार आहे. मानवी जीवन समृद्ध करण्यातील निसर्गाची भूमिका प्रत्येक विद्यार्थ्याला पटवून देणे, ही काळाची गरज आहे.
हेही वाचा – Education : शिकण्याची नेमकी गरज काय?
निसर्गविषयक बुद्धिमत्ता विकसित करण्यातून हे घडवून आणता येईल. ही निसर्गविषयक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचे निरीक्षण करण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे. विशिष्ट दिवशी ग्रह, तारे, चंद्र यांचे स्थान अवकाशात कुठे असते, ते कसे बदलते, ग्रहणे कशी होतात या गोष्टी बघण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. विविध प्रकारचे पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती, फळझाडे, फुले यांची त्यांना माहिती द्यावी लागेल. विविध वनस्पतींचे उपयोग, पशू-पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, त्यांच्या संरक्षणाची गरज विद्यार्थ्यांना पटवून द्यायची आहे. पाने, फुले, विविध आकारांचे दगड गोळा करण्यास, पुस्तकांतून वनस्पतींची माहिती मिळवण्यास तसेच चित्रे गोळा करण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे.
नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरी यासारख्या वाहिन्या बघण्यास सांगायचे आहे. याशिवाय, ज्या मुलांनी असे संग्रह केले असतील, त्यांच्या संग्रहाचे आपल्याला शाळेत प्रदर्शन आयोजित करता येईल. यामुळे इतर विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकू. याशिवाय, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपापल्या संग्रहाबद्दल आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सांगावे आणि शक्य झाल्यास, शालेय प्रदर्शनातून इतर वर्गातील विद्यार्थ्यांना सांगावे, अशी व्यवस्था आपण करावी. असे संग्रह बघणे हे विद्यार्थ्यांची निसर्गविषयक जाणीव तसेच निसर्ग विषयक बुद्धिमत्ता विकसित करण्यात उपयुक्त ठरेल.


