सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीजवळची गावे. या गावांतील लोकांना नदीपलीकडे जायचे वांदे होते. उन्हाळ्यात जायला मिळे, पण पावसाळ्यात कृष्णा दुथडी भरून वाहू लागे आणि मग या गावांचा पलीकडील गावांचा संपर्क तुटे. अनेक वर्षांची पूल बांधण्याची लोकांची मागणी सरकारने मान्य केली आणि आंध्र प्रदेशमधील एका कपंनीला पुलाचे काम मिळाले.
पूल फार मोठा होता आणि पूल उभारणे जिकिरीचे होते. पुलाच्या बांधकामासाठी मराठवाड्यातील शेकडो मजूर आपल्या बायका-पोरांसह हजर झाले. कंपनीने त्यांना झोपडया उभारण्यासाठी तात्पुरती जागा मिळवून दिली. पाण्यासाठी मोठा ओढा होता.कामगार आले तसे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी मुकादम आले. मुकादम आपल्या पंटरसह फिरू लागले. इतक्या माणसांसाठी दुकाने उभी राहिली… तसेच विडीकाडी, देशीदारूची पण दुकानें आली.
दुष्काळी मराठवाड्यातून बिरजू आणि लक्ष्मी आपल्या दोन पोरांसकट पुलाचे काम करायला हजर झाली. त्यांच्या शेजारच्या झोपडीत बिरजूच्या गावातील मोन्या आणि त्याची बायको सरस्वती, ती पण आली. मोन्याची ऐंशी वर्षांची म्हातारीही सोबत होती. बिरजू लक्ष्मीची दोन पोरे – तीन वर्षांचा पोरगा आणि दोन वर्षांची पोरगी होती. लक्ष्मी आता तिसऱ्यांदा पोटूशी होती. शेजारची म्हातारी सकाळ-संध्याकाळ लक्ष्मीच्या झोपडीत येऊन तिच्या पोटावर हात ठेऊन अंदाज घेत होती.
पुलाचे काम सुरू होते. अनेक ट्रक्स माती घेऊन धावत होते. पुलासाठी लोखंडी शिगा, लोखंडी बार, सिमेंट यांची वाहतूक सुरू होती. काळे दगड लांबून लांबून आणले जात होते. शेकडो पुरुष, स्त्री कामगार काम करत होते. मुकादम कामगारांची आय-बहीण काढून काम करून घेत होता. बरीच नवराबायको जोडीने काम करत होती, त्यामुळे त्यांना दोन पैसे मिळत होते, पण संध्याकाळ झाली की, बहुतेकजण देशी दारू, जुगार याच्यात अडकत होते.
हेही वाचा – निनादच्या कंपनीची औषधं कोहिनूर हॉस्पिटलकडे का नव्हती?
काम संपलं, कामगार घरी आले की, बऱ्याच वेळा शेजारचा मोन्या, बिरजू लक्ष्मीबरोबर दोन गोष्टी बोलायला येई, कधीकधी मोन्याची म्हातारी पण येई. दोघेही एकाच गावातले, त्यामुळे त्त्यांची जुनी ओळख होतीच.
असेच एक दिवस मोन्या बिरजूच्या झोपडीकडे आला… लक्ष्मी झोपडीच्या बाहेर चुलीवर भाकऱ्या भाजत होती आणि तिची पोरे भाकरी चटणीबरोबर खात होती, वर पाणी पित होती. मोन्याने झोपडीत डोकावून पाहिले, बिरजू अजून आला नव्हता.
“बिरजू आला न्हाई?”
“न्हाई. गेलं असलं गुत्यात… तुमी न्हेत जावा की देवळात, भजन करायला…”
“तुझ्या दादल्याचं मन न्हाई भजनात.”
“मग कशात हाये?”
“तुझ्यात हाये… म्हनून तिसरा पालना येतोय,” तिच्या पोटाकडे पाहात मोन्या म्हणाला.
“जावा की… त्याचं लक्ष माझ्यात न्हाई… (हाताचा अंगठा तोंडाकडे नेत)… याच्यात हाये… काय काळजी चिंता हाय काय? दोन पोरं हायेत आपल्याला… त्याचं औषधपानी… एखादं घर पत्र्याचं का होईना… सारं पैसं दारूत…” लक्ष्मी भाकरी भाजता भाजता बडबडत होती. तोपर्यत गाणे म्हणत म्हणत बिरजू हजर झाला.
“बिरज्या, देशी पिनं वाईट्ट बाबा… सगळी नासाडी बघ… त्यापारस इट्ठलच्या भजनाला येईनास.”
“तू जातुस न्हवं, तो जा, मी हाय तो बरा हाय…”
“न्हवं, तुले बातमी लागली काय, पुलाला भेग पडली म्हने?”
“व्हय, सगली लोक बोलत्यात… भेग पडली हाय… अशानं पूल टिकायचा न्हाय.”
“पन आसं का होतंय?”
“याचं कारन शांती केली न्हाय… एव्हडी मोटी नदी… कशी सांत बसंल?”
एवढ्यात मोन्याची म्हातारी आपल्या झोपडीतून बाहेर पडली आणि लक्ष्मीच्या झोपडीत आली. तिने लक्ष्मीच्या ओटीपोटीवरून हात फिरवला आणि म्हणाली,
“बिरज्या, लक्षमेचे दिवस भरत आलेत… त्येला कामावर न्हेऊ नको.”
एवढ्यात लक्ष्मी बोलली.
“कामावर जायचं नको म्हन्ते म्हातारी, पन घरी बसून खायचं काय? दाल्ला हा असा… दोन पोरं हायेत मला…”
“मी आपलं सांगायचं काम केल्ला, आता तुमी काय ते बघा.”
एवढ्यात कानठळ्या बसवणारा आवाज घुमला…
झोपडीतील सर्व लोक घाबरली. लोक बाहेर पडली आणि सैरावैरा धाऊ लागली. कोंबड्या मोठ्याने ओरडू लागल्या… कुत्री पळू लागली…
एवढ्यात कुणीतरी ओरडला, “पूल पडला रे पूल पडला… पूल पडला… धावा… धावा…”
लोक कंदील घेऊन, विजाऱ्या घेऊन नदीच्या दिशेने पळाली. पूल कोसळला होता.. मधे मोडून पडला होता… अजून माती कोसळतच होती.
सगळ्या झोपड्यात स्मशानशांतता होती, पूल पडून दहा दिवस झाले, काम बंद झाले, म्हणजे दोन पैसे मिळायचे ते बंद झाले. सगळी झोपडपट्टीवाली माणसे बेकार झाली, कुणाकडेच काही नव्हते, कोण कोणाला आणि काय देणार?
इकडे पूल पडला आणि तिकडे लक्ष्मीला कळा सुरू झाल्या. बिरजू, मोन्या पुलाजवळ. मोन्याची म्हातारी जवळ होती, तिने लक्ष्मीचे बाळंतपण केले, मुलगी झाली… मुलीच्या पायगुणाने पूल पडला, असे सर्वांचे मत, त्यामुळे जो तो या नवीन जन्माला आलेल्या मुलीला दोष देत होते.
मुकादम पिसाळला होता, एवढी काळजी घेऊनही पूल कसा कोसळला, हे त्याला समजत नव्हते, पूल कोसळला हे कळताच कॉन्ट्रॅक्टर येऊन पाहून गेले. त्यानी संतापून मुकादमाला लाथाबुक्यानी तुडवला आणि ‘काळजी घेऊन काम सुरू कर, परत पुलाला काय झालं तर त्या पुलाबरोबर तुझा पूल बांधीन,’ अशी धमकी देऊन तो गेला.
मुकादम सगळीकडे फिरत होता. त्याला कळले तिकडे मिरजेच्या बाजूला एक जागृत देवस्थान आहे, त्याचा कौल लोक घेतात. तो पावतो, अडचणी दूर करतो. मुकादम त्या देवस्थानकडेकडे गेला. त्या देवस्थानाने पूल परत उभा करण्याआधी कोवळ्या पोराचा बळी द्यायला लागेल, असा कौल दिला. मुकादम कोवळा पोरं शोधायला लागला. झोपड्यातील कुणी ताजी बाळंतीण शोधू लागला, त्याला बातमी लागली बिरजूची बायको लक्ष्मी तिला आठ दिवसांपूर्वी मुलगी झाली आहे. मुकादमाने बिरजूची सगळी चौकशी केली, त्याला अजून दोन मुले असल्याचे कळले.
मुकादमाने सगळी बातमी कॉन्ट्रॅक्टरला सांगितली, कॉन्ट्रॅक्टरने, ‘त्या बिरजूला दोन लाख दे आणि त्याचे पोर ताब्यात घे,’ अशी ऑर्डर दिली.
सगळी झोपडपट्टी भुकेने व्याकुळ झाली होती. रानात जाऊन झाडांचा पाला उकडून ती खात होती. लहान पोर आजूबाजूच्या दुकानात भीक मागत होती, देवळाच्या बाहेर आशेने कोणी काय देईल, याची वाट पाहात होती. बिरजूची दोन्ही मुले भुकेने रडत होती… लक्ष्मीकडे त्यांना खायला द्यायला काही नव्हते… शेजारच्या मोन्याच्या घरात पण सगळा खडखडात होता. जो तो पुलाचे काम पुन्हा कधी सुरू होते, याची वाट पाहात होते. बिरजू भुकेने व्याकुळ झाला होता. परत परत आशेने झोपडीत शिरून पाहात होता. लक्ष्मी पाणी पिऊन होती… छोटीला छातीला लावत होती… छोटी किंचाळत होती, कारण लक्ष्मीच्या छातीतून काहीच येत नव्हते!
संध्याकाळच्या सुमारास मुकादम, पंटर आणि त्त्यांचे काही दोस्त बिरजूच्या घरी आले. त्यांना बघून बिरजू घाबरला, लक्ष्मी घाबरली… आता काय नवीन बालंट आले म्हणून!
मुकादम बिरजूला म्हणाला, “बिरजू, पुलाचं काम बंद हाये. पूल टिकत न्हाई… सगळी झोपडपट्टी उपाशी हाये. कुणाच्या घरात अन्नाचा दाना न्हाई. पन पुलाच काम सुरू करणं, तुझ्या हातात हाये…”
“माझ्या हातात? मी काय करनार?”
“तू करू शकतोस. हे बघ, मालकांनी तुझ्यासाठी दोन लक्ष रुपये दिल्याती…”
झोपलेली लक्ष्मी बाहेर आली, मालक दोन लक्ष रुपये देत्यात… कशापाई तिला कळेना!
‘मी काय करायचा मालक…” बिरजू एवढे पैसे पाहून गांगरला.
“तुझी दोन पोरं हाईत ना मोठ्ठी, त्यास्नी शाळेत पाठवायचं… गावाकडे घर बांधायचं, बदल्यात…”
“बदल्यात काय?” लक्ष्मी काळजीने म्हणाली.
“बदल्यात तुझं तान्ह पोर आम्हास्नी द्यायचं, बस…”
एवढ्यात मुकादमच्या बरोबर आलेला पंटर बोलला, “अरे बिरजू, बली चढाना पडेगा… नरबली… छोटे बच्चे का, तो ही पूल टिकेगा…”
त्याचं बोलणं ऐकून अंगात शक्ती नसलेली लक्ष्मी कडाडली, “म्ही न्हाई देनार माज लेकरू… नऊ म्हैने पोटात वाढवलंय त्यास्नी.”
मुकादम चिडला “अगं लक्षमे, ह्ये पैक बघ, दोन लाख हाईत, सगळ्या चिंता जातील तुमच्या… तू पोर दिलंस, तर पुलाचं काम सुरू… म्हंजी सगळी झोपडपट्टी जेवायला लागंल. सगळी तुझं नाव काढतील. तू बोल की बिरजू? पैकं नको हाईत काय?”
हेही वाचा – सॉरी मॅडम… निनाद अन् डॉ. अंजलीची कथा
“पैकं कुनाला नको असत्यात मालक… पर, पोटचं पोर… त्याला बली द्यायचा? न्हाई… न्हाई… मेलो तरी चालेल पर पोटचा पोर…”
“आरं, कुठं तुझं पोर कलेक्टर होनार की दागदर व्हणार… तुज पोर तुझ्यापरीस हमालीच करनार.. आनि एक दिस उपाशी मरनार.”
न्हाई न्हाई मालक, माझ्या बायलीचं बराबर हाय.. आमचं पोर न्हाई देनार पुलासाठी.”
रागारागाने मुकादम, पंटर निघून गेले.
मुकादम नरबळीसाठी छोट्या मुलाच्या शोधात होता… पुलाच्या कामास उशीर होतं होता… मग मुख्य कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाने लक्ष घातले. त्याला समजले मुकादम नरबळीसाठी लहान मुल शोधतोय. त्याने मुकादमला हाकलून लावले. पंटर आणि त्याच्या जवळच्या मंडळींना हाकलून लावले…
चांगले इंजिनिअर नेमले आणि पुलाचे काम सुरू झाले. सारी झोपडपट्टी आनंदात होती. सर्वांच्या घरात दोन पैसे येऊ लागले… नवीन मालकाने या वस्तीसाठी बस ठेवली, त्यातून मुले तालुक्याच्या गावी शाळेत जाऊ लागली. बिरजू लक्ष्मीची दोन्ही मुले शाळेत जाऊ लागली. सरकारी नर्स त्या भागात फिरू लागली, तिच्या प्रयत्नाने स्त्रियांची कुटुंबनियोजन शत्रक्रिया झाल्या. लक्ष्मीने पण शत्रक्रिया करून घेतली.
लक्ष्मीची छकुली एकदम देखणी आणि चुणचुणीत होती. ती खेळत असताना लक्ष्मी तिला कौतुकाने पहायची. तिच्या मनात यायचं, त्यावेळी मुकादमाने दोन लाख रुपयांचे आमिष दाखवले या मुलीसाठी, पण चार दिवसांची उपाशी असून आपण विरघळलो नाही… पण एवढेच नव्हे, दारूचे व्यसन असलेल्या आपल्या नवऱ्याने सुद्धा ते पैसे घेतले नाहीत!
मोबाइल – 9422381299


