राम नगरकर आपल्याला माहीत आहेत… ते विनोदी नट म्हणून आणि नंतर त्यांनी केलेल्या ‘रामनगरी’ या एकपात्री प्रयोगांमुळे! ‘विच्छा माझी पुरी करा’मधली त्यांची भूमिका अनेकांना आठवत असेल. ‘रामनगरी’ हे त्यांचे आत्मचरित्र आपल्याला हसायला लावते… कधी गालातल्या गालात तर कधी खळखळून… त्यांनी ग्रामीण, रांगड्या बोलीभाषेत लिहिलेले त्यांचे अनुभव हसवतात आणि विचार करायला भाग पाडतातही. सुरुवातच त्यांनी हजाम आणि हजामती या शब्दांवर कोटी करून केलेली आहे. काही न करणाऱ्याला किंवा कुठलेही काम न येणाऱ्याला ‘हजाम आहेस’ असं का म्हणतात? ड्रायव्हर आहेस, कुंभार, लोहार आहेस, असं का म्हणत नाहीत? असं ते विचारतात. त्यांच्या आजोबांनी नाभिक शब्दाची सांगितलेली उत्पत्ती सांगून फुशारक्या मरणाऱ्याला गप्प केलं होतं… ती काय ते मात्र वाचायलाच हवं!
झाडाखाली नाटक करणारा व्याही, त्याची सत्यवानाची भूमिका सुरू असताना सुनेला घेऊन पोहोचलेला आजा आणि नाटक मधेच थांबवून आपल्या मुलीला आणि नातवाला पाहून ‘लोकहो, जरा थांबा. आधी लेकीला आणि नातवाला पदरात घेतो’ असे म्हणतो. लोकांना काहीच वावगे वाटत नाही. नाटक पुढे सुरू होते. गावातल्या नाटकांच्या, हौशी मंडळींच्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत. नंतर वडील मुंबईला घेऊन आले. तिथे गोदामात राहात होते. बायको बाळंतपणाला माहेरी गेली की, गोदामाची खोली रिकामी व्हायची. मग दुसरे कुटुंब राहायला यायचे… लेखकाची आई मात्र तीन वर्षं झाली तरी, बाळंतपणाला गेली नाही, म्हणून मालक उखडला आणि म्हणाला, “इतर मंडळी खोळंबली आहेत, बायकोला लवकर माहेरी पाठवा.” लेखक भजनी मंडळात सामील झाले होते. तिथे ‘बुवा’ असे टोपणनाव पडले.
न्हाव्यांच्या वेगवेगळ्या जाती उदा. मशाली न्हावी, वाजंत्री न्हावी आणि त्यातल्या उच्च-नीच जाती, त्यांचे हेवेदावे यामुळे झांजा वाजवायचा मोह लेखकाला भारी पडला आणि वडिलांकडून मार खावा लागला. ते लिहितात, ’माझ्या झांजांचा ठेका आणि बापानं मारायचा ठेका… मी ताल शिकलो तो असा.’ तंबाखू खाताना पकडले गेल्याचा किस्सा पण असाच! दुकानाचा मालक नोकरांना ओरडायला सुरुवात करतो, तेव्हा लेखक तंबाखू मळून हातावर थाप देतो. मालकाला वाटतं, तो नोकरांना रागावतोय म्हणून हा टाळ्या वाजवतोय! लेखकाने हा प्रसंग इतका रंगवला आहे की, हसून हसून डोळ्यांत पाणी येतं. असाच प्रसंग पेटी वाजवण्याचा! दूरची बहीण आलेली असताना तिला उत्साहाने पेटी वाजवून दाखवली, तेव्हा तिच्या अंगात देवी आली आणि ती ‘वाजव… वाजव’ म्हणून ओरडू लागली. लेखक घाबरले पण ती पेटी थांबवू देईना. शेवटी तिच्यासमोर नारळ ठेवून अंगात येण्याचे कारण विचारले, तेव्हा अंगात आलेली देवी उतरली… लेखकाची पेटी वाजवण्याची पुरी हौस फिटली.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
त्यांच्या लग्नाची गंमत तर बहारदार आहे. जी मुलगी रस्त्यावर सायकलसकट लेखकावर आदळते तीच (भवानी!) होणारी बायको असते. नवरा मुलगा ‘’परसाकडे’’ जायला निघतो तेव्हा गाडी, वाजंत्रीवाले, करवल्या आणि वधू त्याच्याबरोबर जायला निघतात! संपूर्ण लग्नाचा किस्सा फारच गमतीशीर आहे. लेखक वसंत बापट, लीलाधर हेगडे वगैरे सेवादलाच्या मंडळींमध्ये वावरायला सुरुवात केल्यावर पांढरपेशी आयुष्याची ओळख झाली आणि तसे होण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी पत्नीला सुधारायचं ठरवले. नऊवारी साडीऐवजी गोल साडी, आडव्या कुंकूऐवजी गोल कुंकू, चप्पल या गोष्टी इतक्या क्रांतीकारक होत्या, याची आपण कल्पनाच करू शकतो. हे बदल स्वीकारणे कठीण गेले. इंग्लिश सिनेमा पाहण्याचा प्रसंग किंवा डेक्कन क्वीनमधून जाण्याचा प्रसंग हसू आणतो, पण गंभीरही करतो. नव्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर सामाजिक स्तरामुळे आलेल्या अडचणी आणि त्यातून झालेले विनोद फार बोलके आहेत… तिथला डॉक्टर म्हणतो, ‘तुमच्याकडे तीन तीन कामाच्या बाया आहेत, एक आमच्याकडे पाठवा.’ तेव्हा लेखक म्हणतो, ‘एक आई, एक बायको आणि एक बहीण आहे!’ बायकोने सेल्सगर्लला ‘मीच मालकीण’ म्हटल्यावर ती मालकाचं आणि कामवालीचं सूत जुळलंय, असा निष्कर्ष काढते. मित्र लेखकाला शोधत घरी येतात तेव्हा वडिलांशी गाठ पडते. “अशा बापाच्या पोटी जन्म घेणारा तू महान आहेस,” असं म्हणायची वेळ येते.
लेखक आजारी पडले, तेव्हा वसंत बापट, हेगडे, एस. एम. जोशींपासून अनेक जण पाठीशी उभे राहिले. उत्तम इलाज आणि आर्थिक भार दोन्ही सांभाळले. आईचा मृत्यू, बहिणीचे लग्न, नवे सलून, नवे घर अशा प्रत्येक प्रसंगांत या सर्व व्यक्तींनी भक्कम साथ दिली. पोस्टातल्या नोकरीच्या गमतीजमती पण वाचण्यासारख्या आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’सारख्या नाटकांतून, काही सिनेमांतून, पोस्ट खात्याच्या डॉक्युमेंटरीतून भूमिका करून त्यांनी नाव कमावले. कलापथकात काम करून दौरे केले. पहिले एअर कंडिशन सलून काढले.
हेही वाचा – कोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप
पांढरपेशा वर्गात समाविष्ट होण्याचा सतत प्रयत्न केला. काही प्रमाणात यशस्वी झाले, पण समाजात घट्ट रुतलेल्या समजूतींमुळे पूर्ण यश मिळाले नाही. स्वतःवर हसण्याची लाखमोलाची हातोटी त्यांच्याकडे आहे. हसवता हसवता ते समाजाची कुरूप बाजू दाखवून देतात. तसेच गुणी, कष्टाळू व्यक्तीला कुठलेही बंधन यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, हेही दाखवून देतात. जवळच्या मित्रपरिवाराच्या गप्पा रंगत आल्या आहेत, त्यात लेखक आहेत, आपणही आहोत… ते वर्णन करून प्रसंग सांगत आहेत आणि हास्याचा कल्लोळ उठतो आहे, असा भास व्हावा, असे लिखाण आहे. मित्रांच्यात बोलताना समाजासमोर चढवलेली झूल काढून ठेवता येते, मुखवटा उतरवता येतो तसे करून लिहिलेले हे आत्मचरित्र. पांढरपेशा कुटुंबात जन्म मिळाल्यामुळे आपल्याला कितीतरी आयतेच मिळाले, संघर्ष करावेच लागले नाहीत, याची जाणीव मला हसून हसून डोळ्यांतल पाणी पुसताना झाली.
…आणि आणखी एक, या पुस्तकाचं भाषांतर होऊ शकेल का? तीच छटा, तोच गर्भितार्थ, शब्दाला चिकटून डोळ्यासमोर येणारी प्रतिमा… दुसऱ्या भाषेत येऊ शकेल का? वसंत बापट म्हणतात, ‘मधुगुंजन लखलाख तुम्हाला बोल रांगडा प्यार मला’
हा याच मातीतला बोल, दुसऱ्या भाषेत सांगता येणे कठीणच!
संग्रही ठेवावे असे पुस्तक.


