दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 19 जानेवारी 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 29 पौष शके 1947; तिथि : प्रतिपदा 26:14; नक्षत्र : उत्तराषाढा 11:51
- योग : वज्र 20:44; करण : किंस्तुघ्न 13:50
- सूर्य : मकर; चंद्र : मकर; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:22
- पक्ष : शुक्ल; मास : माघ; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज योग्य ती ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमच्यात दिसेल. व्यापारात आजचे नफ्याचे प्रमाण बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कामाच्या बाबतीत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपला दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. विद्यार्थी दिवसभर मोबाइलवरच असतील, ज्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.
वृषभ – प्रलंबित देणी आल्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस पाहुणचार घेतला तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुमचा फायदा होईल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि जोडीदारामध्ये काही कारणांनी कुरबुरी सुरू होत्या त्या आज संपतील.
मिथुन – आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. दीर्घकालीन गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. लहानपणीची एखादी वस्तू अचानक सापडेल, ज्यामुळे बालपणाच्या आठवणी जाग्या होतील.
कर्क – कलात्मक काम तुम्हाला समाधान मिळवून देईल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. लहान व्यावसायिकांना आज तोटा होऊ शकतो. मात्र मेहनत योग्य दिशेने असेल तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा.
सिंह – हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे आपल्या वेळेची किंमत ओळखा. हाती असलेला पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि त्या चुकीच्या वाटतात अशांच्या संगतीत राहू नका.
कन्या – अत्यंत व्यग्र वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आर्थिक बाबी कशा प्रकारे हाताळायच्या याचे कौशल्य आज समजून घ्यावे लागेल. कुठल्याही नवीन कामाच्या संदर्भात अनुभवी लोकांसोबत बोलणी करा. आज जोडीदारासोबत छोट्या छोट्या कारणांवरून वाद होतील परंतु त्यामुळे वैवाहिक जीवन बिघडणार नाही याची काळजी घ्या.
हेही वाचा – राम आणि सियाचा होकार आला, आता पुढे काय?
तुळ – दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. त्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आज मुलांसमवेत वेळ घालवा. त्यामुळे तुमच्यातील बॉंडिंग अधिक वाढेल. प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल. जोडीदार आज तुमची जरा जास्त काळजी घेईल.
वृश्चिक – घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील, त्यामुळे या परिस्थितीकडे तूर्तास दुर्लक्ष करणेच इष्ट. भागीदारीतील व्यवसायात पडू नका, कारण भागीदार तुमचा गैरफायदा घेतील. आज भेटणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि प्रसन्नतेने वागा.
धनु – कामाच्या धबडग्यात थोडा आराम करा आणि रात्रीची जागरणे टाळा. जे लोक एखादा लहान व्यवसाय करतात, त्यांना जवळच्या लोकांचे मार्गदर्शन मिळू शकते. ज्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची तुमच्या आयुष्यात नको इतके नाक खुपसण्याची सवय तुमच्या आणि जोडीदाराच्या संबंधात दुरावा निर्माण करण्याची शक्यता आहे, सावध रहा.
मकर – संततीमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू द्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, त्यामुळे डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. काहीजणांना कामानिमित्त दूरच्या प्रवासाला जावे लागेल, यामुळे दगदग होईल, मात्र नंतर खूप फायदाही होईल.
कुंभ – ज्यांची किंमत भविष्यात वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. संततीच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल. कार्यक्षेत्रात तुमच्यातील उर्जेची परीक्षा पाहिली जाऊ शकते. दिलेले काम ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी जे काही कष्ट घेत होतात, त्याचे आज चीज होणार आहे.
मीन – दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि त्यात उत्तमपैकी नफा देखील होईल. ज्या कार्यक्रमात सहभागी व्हाल, तिथे आकर्षणचे केंद्र ठराल. संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि कामात उत्साह दाखवलात तर फायदाच होईल.
दिनविशेष
निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते मास्टर विनायक
टीम अवांतर
ख्यातनाम मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचा जन्म 19 जानेवारी 1910 रोजी कोल्हापूर येथे झाला. विनायक दामोदर कर्नाटकी हे त्यांचे मूळ नाव. 1932 साली प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या चित्रपटातील नारदाच्या भूमिकेतून मास्टर विनायक यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. पुढे प्रभातच्या पाच चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. मात्र प्रभात कंपनी नंतर पुण्याला स्थलांतरित झाली आणि विनायकरावांनी कोल्हापूरच्या सिनेटोनमध्ये प्रवेश केला. विनायकरावांना दिग्दर्शनाची पहिली संधी येथेच मिळाली. विलासी ईश्वर ही मामा वरेरकरांची गोष्ट अनौरस संततीच्या एका ज्वलंत सामाजिक समस्येवर आधारलेली होती. त्याचे दिग्दर्शन म्हणजे विनायकरावांना एक आव्हानच होते. मात्र वाङ्मयाची आणि चित्रपट माध्यमाची उत्तम जाण असलेल्या विनायकरावांनी हे आव्हान समर्थपणे पार पाडले.
हेही वाचा – बस सुटताना जोरदार पाऊस अन्…
पुढे बाबूराव पेंढारकरांनी विनायकराव आणि पांडुरंग नाईक यांच्या भागीदारीत ‘हंस पिक्चर्स’ची स्थापना केली. हंस पिक्चर्समधील अभिनेता आणि दिग्दर्शक या नात्याने पुढील चार वर्षे विनायकरावांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. विनायकरावांनी हंस पिक्चर्सकरिता दिग्दर्शित केलेले ज्वाला वगळता इतर सर्व चित्रपट सामाजिक होते. परंतु विनायकरावांसारख्या प्रतिभाशाली कलावंताचा त्याला स्पर्श झाल्यामुळे हे चित्रपट अजरामर बनले. ‘छाया’सारखे गंभीर आणि सामाजिक समस्यांना स्पर्श करणारे, कारुण्याने ओलावलेले चित्रपट जसे होते, तसेच ब्रह्मचारी, ब्रॅंडीची बाटली यासारखे हास्यरसप्रधान चित्रपटही होते.
हंस पिक्चर्स बंद झाल्यावर 1940 साली विनायकराव नवयुग चित्रपट संस्थेत गेले. तेथेही त्यांनी लग्न पहावे करून, अमृत, सरकारी पाहुणे असे लक्षात राहणारे चित्रपट दिग्दर्शित केले. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यातील अभिजात कलागुण प्रथम ओळखले ते विनायकरावांनीच आणि त्यांनीच लतादीदींना चित्रपटसृष्टीतही आणले.
1943 साली त्यांनी आपली स्वतःची प्रफुल्ल पिक्चर्स ही संस्था स्थापन केली आणि लतादीदींनाही त्यात सामील करून घेतले. प्रफुल्ल पिक्चर्सचा डोलारा सांभाळत असतानाच विनायकरावांनी व्ही. शांताराम यांच्या डॉ. कोटनीस की अमर कहानी या चित्रपटात एक भूमिकाही केली होती. विनायकरावांनी पूर्णपणे दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट म्हणजे राजकमल कलामंदिरचा जीवनयात्रा. चित्रपटसृष्टीतील आपल्या 16 वर्षाच्या कारकीर्दीत विनायकरावांनी 18 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि त्यांपैकी बऱ्याच चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र झाल्याचे पाहून देशप्रेमी विनायकराव विलक्षण भारावून गेले होते. त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे 19 ऑगस्ट 1947 रोजी विनायकरावांचे मुंबई येथे देहावसान झाले.


