दिप्ती चौधरी
आम्हाला बंगलोरला घेऊन जायचा निर्णय पक्का झाला; पण आणायाचे कसे? हा मोठा प्रश्न होता. प्राण्यांच्या प्रवासासाठी अनेक एजन्सी आहेत, जे घरातून उचलून नवीन ठिकाणी दारात आणून देतात. पण त्यांची एकच अट प्राणी पिंजऱ्यात घालून सुपूर्द करा आणि आमची तिथेच गोची होती! आम्ही आझाद परिंदे! कधी कुठे असू याचा काय भरवसा? बरं, मुंबई ते बंगलोर प्रवास करायचा तर आगाऊ बुकिंग केलेच पाहिजे. पण त्या दिवसाचा भरवसा देणार कोण?
एकदा आवाजच्या कार्यकर्त्यांशी बोलताना आईने ही अडचण सांगितली. अगदी सहजपणे तिने सांगितले, “त्यात काय कठीण आम्ही आणून देऊ की! आमची टीम पकडण्यात एकदम माहीर आहे.. त्यांना पकडू डॉक्टरकडे नेऊन check up, लसीकरण अशा अडोप्शन आधीच्या रीती करू आणि आमच्या प्राण्यांच्या रुग्णवाहिकेतून बंगलोरला आणून देतो! मग तर झालं?” वा! आता सगळेच प्रश्न सुटले होते. आम्ही एका फेरीत नाही सापडलो तर, नंतर पुन्हा प्रयत्न करू, असेही आश्वासन दिले! अर्थात आई पपा त्यासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार होते. ही मदत इतर मुक्या प्राण्यांना पोहचेल, असे त्यांना वाटत होते. फक्त प्रश्न इतकाच होता की, रुग्णवाहिेकेतून आम्हाला आणणार, हे काही आईला पटत नव्हते. पण तिच्या भावना समजून त्यांनी ती गाडी स्वच्छ धुवून घेतली, त्याचे फोटोही आईला पाठवले! उद्या सकाळी दूध प्यायच्या वेळी जमलं तर, पकडून पिंजऱ्यात ठेवा नाहीतर, आम्ही येतोच, असा निरोप आजी, बाबांकडे पोहोचला.
मुंबईच्या गँगमधील मांजरी तशा कणखर होत्या आणि खाण्याव्यतिरिक्त जास्त जवळ येत नसत. सोसायटीमधून आलेल्या धमकीत आम्ही सर्व मांजरे सोडून देऊ, असे सुनावले होते. त्यात यांना पकडणे मुश्किल होते. पण जर दूर सोडलेच तर, मांजरांपेक्षा बोक्याचा निभाव लागणे मुश्किल! कारण तिथे दुसरे भटके बोके अजिबात स्थान देत नाहीत आणि भटक्या बोक्यांविरुद्ध आमची काय वाट लागते, ते इथेच दिसत होते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर डिगर, डंपर आणि माझा प्रश्न सोडवायचे ठरवले.
त्यातही मी आणि डंपर घरात शिरून तिथे आरामात वावरायचो. डंपरने तर आजीची खिडकी जर नीट लागली नसेल तर नखाने उघडायची युक्ती शोधून काढली होती. बाहेर राहिल्याने आम्ही मस्त मातीचा मेकअप केलेले असायचो, खिडकी उघडून आत शिरताच आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा आता जरा इथेच पडतो, हे सांगण्यासाठी आधी जाऊन पलंगावर लोळायचो! आम्ही घरात शिरताना इतका विरोध न दाखवणारी आजी तेव्हाच का अचानक बिथरायची देव जाणे!
पण म्हणजे बंदिस्त घरात राहणे आम्हाला चालायचं. डिगरचे तसे नाही. त्याला घरात शिरणेच मंजूर नाही. कधी-कधी काळया बोक्याने जिव्हारी जखमी केले असायचे. त्याला अशा अवस्थेत बाहेर ठेवणे आई आणि डिंपल आंटीला अशक्य वाटायचे. रात्री पुन्हा हल्ला झाला तर? त्या मध्यरात्रीपर्यंत त्याला घरात घालण्यासाठी धडपड करायच्या, पण हे महाशय अजिबात आत शिरत नसत आणि चुकून आलाच तर बेभान होत असे.
अशा स्वभावाच्या मांजरांना पण हळू हळू आत घेणे शिकवता येते आणि नंतर हलवता येते. पण अचानक उचलून अनोळखी ठिकाणी बंदिस्त करणे शक्य नाही. डिगरला शिकवण्याइतका वेळ नव्हता आणि सध्यातरी त्याचा बाणा ‘मुझको अपने जान से प्यारी है मेरी आजादी!’ असा होता. पण त्या प्रेमळ जीवाला असेच सोडणेही शक्य नव्हते. पण त्याची जबाबदारी बाबांनी उचलली. सध्या आम्ही त्याला बघतो नंतर त्याचं बघू, असे सर्वानुमते ठरले.
त्या दिवशी सकाळी नशिबाने आम्ही दोघेही प्रगटलो आणि अलगद डिंपल आण्टीच्या हाती पण लागलो! पिंजऱ्यात बंद केल्यावर आम्ही घर डोक्यावर घेतले, पण आवाजची टीम थोड्या वेळाने आली आणि आम्हाला घेऊन डॉक्टरकडे निघाली.
इकडे आईचा जीव खाली वर होत होता.. सगळं ठीक होईल ना.. आम्ही व्यवस्थित पोहचू ना… तशी आमची आई महाचिकित्सक! तिने अजून दहा ठिकाणी चौकशी करताना कोणीतरी तिला सांगितले की, कुठलीही लस म्हणजे अशक्त केलेले जीवाणू / विषाणू. त्यांच्याबरोबर आपली रोगप्रतिकरकशक्ती लढा देते आणि पुन्हा जर असा हल्ला झाला तर, नक्की काय करायचे ते शिकून घेते. लस दिल्यानंतर जर लगेच प्रवासाला सुरुवात केली तर, त्या ताणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि अशक्त विषाणूचाही सामना करू शकत नाही. त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात.
आईने लगेच संपर्क साधून याबाबत डॉक्टरांना विचारण्यास सांगितले. त्यांनीही सांगितले की, हो, हा धोका आहे. लसीकरण झाले पण, आमचं बंगलोर प्रस्थान रहित झाले! आम्हाला पुन्हा आमच्या मुंबईच्या सोसायटीत आणून सोडले आणि एक महिन्याने परत प्रयत्न करू, असे ठरले.
आम्ही परत आलो पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आज घडली होती… आज पहिल्यांदा डॉक्टरकडे आमच्या लसीकरणाच्या नोंदीसाठी कागद बनला होता आणि त्यावर Dumper and Pidu… Cats of Mr. D.W… आमच्या बाबांचं नाव होते… आता आम्ही officially कोणाचे तरी होतो!
(क्रमश:)
(पिदू या मांजराची आत्मकथा)
diptichaudhari12@gmail.com