Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितशिव आणि आराधना… एक अनोखी प्रेम कहाणी

शिव आणि आराधना… एक अनोखी प्रेम कहाणी

शोभा भडके

भाग – 1

“आरू… अगं झालं का नाही तुझं? किती उशीर! बस निघून जाईल ना…” राम बाहेरच्या अंगणात बॅग घेऊन उभा राहात तिला आवाज देत होता.

“आले रे दाद्या किती जोराने ओरडतो… येतच होते ना!” ती लगबगीने खांद्यावर पर्स अडकवत, पायात सँडल घालत म्हणाली.

ही आरु म्हणजे आपल्या कथेची नायिका… म्हणजे आराधना शिंदे… बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारी… तशी घरची परिस्थिती ठीक… घरी पाच एकर शेती… आई, वडील, ती आणि तिचा मोठा भाऊ असं त्यांचं चौकोनी कुटुंब… तसे चुलत काका, काकी, भावंडं वगैरे असा बराच मोठा गोतावळा आहे… पण सगळे वेगवेगळे!

आईचं नाव कलावती तर, बाबा सखाराम शिंदे आणि भाऊ राम… आई-वडील तसे अशिक्षित, पण त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं! रामने ग्रॅज्युएट केलं आणि आता वडिलांना शेतीत मदत करतो.. तर आराधनाची नुकतीच बारावी झाली… ती चांगल्या मार्कांनी पास झाली आणि तिला पुढे फॅशन डिझायनर बनायचंय आणि त्यासाठी ती आज पुण्याला जात आहे… पुण्यात तिची आत्या राहाते आणि ती त्यांच्याकडेच राहणार आहे. तसं पाहिलं तर, आईची अजिबात इच्छा नव्हती, आपल्या वयात आलेल्या मुलीला असं शहरात शिकायला पाठवायची… पण रामच्या पुढे तिचं काही चाललं नाही. ‘मुलीला कामापुरता शिकवा आणि लग्न करून जबाबदारीतून मुक्त व्हा’, असेच आईचे विचार!

खरंतर, गावाकडील बहुतांश लोकांची हीच धारणा आहे. पण रामने आईला समजावलं… कारण त्याच्या लाडक्या बहिणीची इच्छा तो नेहमी पूर्ण करायचा! तिचे प्रत्येक लाड तो पुरवायचा… ती पर्स घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली… आई-भाऊ पण दारात उभे होते, तिला निरोप देण्यासाठी…

” दाद्या, चल आले मी,” आरु त्याच्यासमोर उभी राहात म्हणाली.

“हो, जाऊया ना, पण आधी आई आणि भाऊंच्या पाया पडून आशीर्वाद घे… मग निघू,” त्याने तिच्या गालावर हात फिरवून समजावत सांगितलं.

“बरं…” ती नाक मुर्डूनच आईकडे वळली… कारण राग आला होता ना आईचा… ती नको पाठवायचं म्हणत होती म्हणून! तसं बाबांचं काही म्हणणं नव्हतं… ‘काहीही करा, पण इभ्रत जाईल असं काही करू नका…’ एवढंच त्यांचं म्हणणं होतं!

ती आईच्या समोर येऊन उभी राहिली आणि खाली वाकून तिच्या पाया पडली.

“नीट सांभाळून जा आणि तिथं गेल्यावर नीट राहा… बाहेर जास्त फिरू नको, एकटी कुठं जाऊ नकोस… आत्या रागावली कधी तर उलट बोलू नको… आणि सकाळी लवकर उठायची सवय लाव…” आई तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली. सोबत डोळ्यांत पाणी पण जमा झालं होतं. शेवटी आईच ती आपलं लेकरू कधी नाही ते असं दूर जातंय म्हणून गलबलून आलं होतं.

हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा

“आई कळतं मला सगळं… आणि राहीन मी नीट… तुला वाटतं तेवढी पण वाया नाही गेलेली मी… तुझ्यापाशी मी असं येड्यावाणी करते… बाहेर तुझी मान खाली होईल, असं कधीच वागत नाही आणि वागणार पण नाही… त्यामुळे उगाच काळजी करू नकोस,” असं म्हणून तिने आईला मिठी मारली अन् रडू लागली… आईनेही मायेने तिला जवळ घेऊन पाठीवर थोपटलं.

“ए पोरी, तू काय लगीन करून नांदाया नाही चालली… एव्हढं रडायला. शिकायला चाललीयस… बास झालं रडणं!”

“अगं, कले रोज तर तिला रडवतीस, आजतरी हसत वाट लाव तिला…” असं म्हणत भाऊंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला… तसं तीही आईपासून बाजूला होऊन भाऊंच्या पाया पडली.

“भाऊ येते मी… तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ती दारू जरा कमी करा! तुमच्यामुळे मागच्या वेळी दादासाठी आलेलं स्थळ गेलं…” जाताना पण ती भाऊंना दारूवरून बोलायला विसरली नाही.

त्यावर भाऊंनी तिच्याकडे रागात पाहिलं. तर, रामने ‘हिचं काहीच होऊ शकत नाही…’ अशा अर्थानं मान हलवली.

ती अशीच होती… तिच्या मनात येईल ते बोलून मोकळी व्हायची! समोरचा त्यावर काय बोलेल, काय विचार करील… त्याची ती चिंता करायची नाही.

“बरं, चल आता कळलं त्यांना… आपल्याला उशीर होईल… बसचा टाइम झाला…” असं म्हणून दोघांनी आई भाऊंचा निरोप घेतला आणि ते दोघे निघाले… तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्याला!


“दादा, कसलं भारीय रे हे शहर… अणि किती मोठं…” राम आणि आराधना पुण्यामध्ये पोहोचले होते. बसमधून उतरून पवनची वाट पाहात होते. (पवन म्हणजे आत्याचा मुलगा).

सकाळचे सहा वाजले होते. दिवस उजाडला होता, तरीही थोडाथोडा अंधार होताच आणि सगळीकडे लाइटच्या उजेडात ते शहर उजळून निघाले होते. सकाळची थंड हवा अंगावर शहारे आणत होती आणि आराधना दोन्ही हात दंडांवर चोळत भारावून रामशी बोलत होती.. तिला खूपच भारी वाटत होतं…

पवन अजून आला नव्हता, त्यामुळे राम वैतागून गेला होता… त्यात रात्रभर प्रवास आणि झोप पण झाली नव्हती! आरु मात्र एकदम फ्रेश होती, ती नेहमी उल्हासित असायची… तणावाची अणि तिची गाठभेटच नव्हती कधी!  कधीही तिचा चेहरा हसतमुखच असायचा…

सकाळची वेळ असल्यामुळे सगळीकडे शांतता होती अणि तिला अस शांत वातावरण खूप आवडायचं, त्यामुळे तिला खूप भारी वाटत होतं.

“अरे, पवन कुठं राहिला तू? अर्धा तास झाला आम्हाला इथ पोहोचून!” राम फोनवर पवनला ओरडत होता…

“आलो… आलो… हे काय तुझ्या पाठीमागे आहे!” पवन त्यांच्या जवळ येत म्हणाला.

“किती उशीर?” राम.

“सॉरी दादा, जागच आली नाही म्हणून थोडा लेट झाला…” पवन रामच्या हातातली बॅग घेत म्हणाला.

“हं… चल, आरु… ही आरु कुठं गेली, रामने आजूबाजूला बघितलं तर त्याला आरु कुठे दिसली नाही. तसं त्याच्या चेहऱ्यावर काळजी पसरली… पवनने पण आजूबाजूला पाहिलं… तशी त्याची नजर रस्त्याच्या कडेला गेली… तिथे फुटपाथवर काही मुले झोपली होती आणि आराधना आपल्या अंगावरची शाल काढून त्या मुलांच्या अंगावर टाकत होती… रामने पण त्या दिशेला पाहिलं… तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि काळजी असे संमिश्र भाव उमटले.

“एSSS नकटे झाली असेल तुझी समाजसेवा करून तर घरी जाऊया…” पवनने तिला आवाज दिला.

“झालं ओ दाजी… हे काय आलेच. चला जाऊ आपल्या घरी”, ती त्याला चिडवत म्हणाली… रामने आणि पवनने बॅगा डिकीत टाकल्या आणि गाडीत येऊन बसले… पवनने गाडी सुरू केली. राम त्याच्या शेजारी बसला आणि आरू पाठीमागे बसली…. नव्हे तिने तर मागच्या सीटवर स्वत:ला झोकून दिलं…


“मॉमSSS माझा ब्रेकफास्ट!” शिवने डायनिंग एरियामध्ये खुर्चीवर बसत आईला आवाज दिला.

“हा घे तुझा ब्रेकफास्ट…” सियाने त्याच्यासमोर प्लेट ठेवली आणि त्याच्याकडे आशेने पाहू लागली. त्याने तिचा आवाज ऐकून एक दीर्घ उसासा सोडत डोळे मिटून घेतले आणि आलेला राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

“मॉम मला लेट होतोय, मी निघतो,” असं म्हणत त्याने ताटासमोर हात जोडले अणि न खाताच तो निघून गेला.

सियाने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात सुस्कारा सोडला… सोबत डोळ्यातलं पाणी गालावर ओघळून आलं. ती तशीच हताशपणे दाराकडे पाहत उभी होती, तोच तिच्या खांद्यावर हात ठेवला गेला आणि एक आवाज आला,

“नको काळजी करू… जाईल त्याचा राग!” सुधा म्हणाल्या.

“कधी मॉम, कधी? नाही सहन होत मला आता. तो मला कधीच माफ करणार नाही का?” ती मॉमकडे पाहून रडत म्हणाली आणि तशीच तिच्या रूममध्ये निघून गेली…

सुधा हताशपणे खुर्चीवर बसल्या. हे सगळं आता रोजचंच झालं होतं! सिया रोज त्याला मनविण्याचा प्रयत्न करत राहायची आणि तो त्यावर काहीही रीॲक्ट न करता निघून जायचा… तरीही तिने हार नव्हती मानली अणि आज पुन्हा प्रयत्न करत त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला होता… पण तो न खाताच शिव निघून गेला होता.

हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!

“काय झालं? आज पुन्हा सियाचा प्रयत्न फेल झाला ना?” दिनकररावांनी शेजारील खुर्चीवर बसत विचारले. सुधांनी त्यांच्याकडे निराशेने पाहिलं अणि उठून किचनमध्ये निघून गेल्या. हळूहळू घरातले बाकी मंडळीही नाश्त्यासाठी येऊन बसले.

“हे काय सिया-दी नाही आली?” समरने विचारलं.

“नाही… तिने दादासाठी नाश्ता बनवला होता, पण तो न खाताच तो निघून गेला,” पूर्वीने माहिती पुरवली.

“समर आणि पूर्वी… तुम्ही तिच्यासाठी नाश्ता घेऊन जा आणि तुम्हीही तिच्यासोबत नाश्ता करा म्हणजे तिला बरं वाटेल,” लीला आजी म्हणाल्या. त्यावर दोघांनी माना डोलवल्या आणि एकाच ताटामध्ये तिघांसाठी नाष्टा घेऊन गेले.

ते दोघे गेल्यावर इकडे टेबलवर वातावरण गंभीर झालं होतं…

“दिनकर, किती दिवस हे असं चालणार आहे? तू शिवशी काही का बोलत नाहीस? समजावं त्याला… किती दिवस तो असा राग धरून बसणार आहे?” आजी कडक शब्दांत दिनकररावांना म्हणाल्या.

“आई, काय बोलू आणि कसं समजावू? तो माझ्याशीही बोलत नाही! एकदा बोलण्याचा प्रयत्न केला तर, घर सोडून जायची धमकी दिली…” दिनकरराव हताशपणे म्हणाले.

सुधा तर केविलवाण्या नजरेने दोघांकडे पाहात होत्या.

(तर, ही आहे आपल्या हीरोची फॅमिली… दिनकर सरपोतदार आणि सुधा सरपोतदार… शिवचे आई-बाबा अन् लीला आजी, समर आणि पूर्वी हे शिवचे चुलत भाऊ-बहीण तर, सिया शिवची मोठी बहीण!)

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!