भाग – 12
प्रत्येकाला नेमून दिलेल काम सुरू झाले… उजेडाची सगळी तजवीज करून सगळे पुढे जाऊ लागले… आधीच्या प्रवासाच्या खुणा न्याहाळत सगळे काल सापडलेल्या सभागृहसदृश्य भागात आले… समोर अहंकाराचा पुतळा होताच.
डॉक्टर देवदत्त यांनी शाल्मलीला जवळ बोलावले… “शाल्मली तुला ठाऊक आहे ना, आज तुला महाराणी संघमित्राची खोली शोधून काढायची आहे…”
डॉक्टरांच्या बोलण्यावर तिने एकदम चमकून पाहिलं… “डॉक्टर काल महाराणी प्रत्यक्ष दिसल्या मला… मला मदत करतील सांगून त्यांनी आश्वस्त केलं… मला असं वाटतंय, ती खोलीही इथे आसपासच असावी…” तिने आपल्या मेंदूवर जोर देत सांगितलं. “महाराणींनी एक सांगितलं… ती खोली मला मिळेल, पण कुठे आहे, ते मात्र त्यांनी सांगितलं नाही… डॉक्टर त्यादिवशी त्या खोलीकडे आपणहून ओढले गेले होते, पण इथे असं काही जाणवतही नाही…” असं म्हणत शाल्मली आजूबाजूच्या खोल्या न्याहाळत होती. पण वेगळं असं काहीच जाणवलं नाही तिला.
“डॉक्टरSSS” एकदम काहीतरी आठवल्यागत शाल्मली ओरडली… “महाराणी असं पण म्हणाल्या, अहंकारा माझ्यासमोर कधी येत नाही…”
शौनक सोबत होताच त्याने हे बोलणं ऐकलं, तो म्हणाला, “डॉक्टर समोर अहंकाराचा पुतळा आहे, आतापर्यंत आपण ज्या काही खोल्यांच्या बाहेरून गेलो, त्या खोल्या तिच्यासमोर येतात… शाल्मली जे सांगतेय की, अहंकारा माझ्यासमोर येत नाही तर, त्याप्रमाणे तिच्या पाठीमागच्या भागात खोली असेल तर?”
डॉक्टरांनी शौनककडे पाहिलं… “परफेक्ट…” आणि मूर्तीच्या पाठीकडील भागात जाण्याचा हाताने इशारा केला…
त्या भागातही काही खोल्या असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तिथे जाताच मात्र शाल्मली थबकली… शांत पुतळ्यासारखीच तिची अवस्था होती. शौनक तिला काही बोलणार तोच डॉक्टरांनी तोंडावर बोट ठेऊन तिच्या पाठीमागे जाण्याचा इशारा केला… ती एका खोलीसमोर जाऊन उभी राहिली अन् त्या खोलीचं दार तिने ढकललं… दार उघडताच प्रचंड तेजस्वी प्रकाश बाहेर पडला… त्या प्रकाशाने सर्वांचे डोळे दिपले… शाल्मलीने डोळ्यांवर हातच धरला… प्रकाशाची तीव्रता जशी कमी झाली तसा हात दूर करून ती त्या खोलीत शिरली… अगदी स्वप्नात पहिल्याप्रमाणेच समोर तेजस्वी करारी स्त्रीची तसबीर होती! तिला आणि डॉक्टरांना कळून चुकले याच त्या महाराणी संघमित्रा!! त्या तसबिरीतून त्या जणू त्यांच्याकडे हसून पाहात होत्या…
हेही वाचा – शाल्मलीला स्वप्नातला तो राजवाडा समोर दिसला अन्…
शाल्मलीने आपली नजर हळूहळू वळवली तसं तिला ते रेशमी वस्त्र दिसलं… तिने ते रेशमी वस्त्र उचलले आत काही तरी होतंच… रेशमी वस्त्र बाजूला करून आतील गुंडाळी तिने उचलली तशी जमिनीत थोडी हलचल जाणवली… तिने ती गुंडाळी उघडली त्यावर काही लिहिले होते, पण ते तिला समजत नव्हते. भूकंपाचे हादरे जाणवायला लागले, तसे कोणीतरी ओरडले भूकंप होतोय लवकर वर चला… डॉक्टरांनी शाल्मलीच्या हातून रेशमी वस्त्रांनिशी ती गुंडाळी घेतली आणि पाठीवरच्या सॅकमध्ये टाकली… शाल्मली आणि शौनकचा हात धरून ते धावत बाहेर पडण्यासाठी निघाले.
कंपन सुरूच होतं… सगळे बाहेर पडलेत याची खात्री करून डॉक्टरही बाहेर आले… त्यांनी सर्वांना बसकडे जायला सुचवले… सगळ्यांना कळून चुकले आजच काम इथंच संपलंय… मुक्कामावर जायचं म्हणून सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला…
वाड्यावर परतल्यावर काही काळ जो काही अनुभव नुकताच मिळाला होता, त्यावर चर्चा करण्यातच गेला. डॉक्टर आणि शाल्मली तर शांतच बसून होते… इतक्या मोठ्या प्रमाणावर भूकंप म्हणजे खालील भागाची पडझड झालीच असेल? काय होईल त्या मूर्तींचं? डॉक्टरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला.
शाल्मलीनेही त्याच वेळेस तोच प्रश्न उपस्थित केला. ‘काही सांगू शकत नाही,’ असेच डॉक्टरांनी आपल्या हावभावावरून दाखवलं आणि ते स्वतःच्या खोलीत फ्रेश व्हायला निघून गेले. जाता जाता त्यांनी विश्वासरावांच्या कानात सांगितले, “तू आणि शाल्मली थोड्या वेळाने खोलीत या…”
इथे डॉक्टर निघून गेलेले पाहून शौनक आणि श्लोकने शाल्मलीला घेरले… “ए सांग ना, त्या खोलीत काय पाहिले तुम्ही?” दोघांच्याही चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता दिसत होती. “का, तुम्ही काहीच नाही पाहिलं?” शाल्मलीने विचारलं.
“छे… तू दार उघडलंस अन् त्या तेजस्वी प्रकाशाने आमचे डोळे दिपले… काही काळ डोळ्यासमोर अंधारीच होती… थोडं भानावर आलोच होतो की, भूकंप सुरू झाला. तुला आणि डॉक्टरांना खोलीतून बाहेर येताना तेवढं पाहिलं आम्ही!” श्लोक म्हणाला.
“अरे, त्या प्रकाशाने आमचेही डोळे दिपले होते, डोळ्यासमोर एका तेजस्वी स्त्रीची तसबीर पहिली… कदाचित त्याच महाराणी संघमित्रा होत्या! भूकंप होतोय हे जाणवलं आणि आम्हीही बाहेर पडलो…”
शाल्मलीने डॉक्टरांच्या सांगण्यानुसार रेशमी वस्त्राचे गुपित सांगायचे टाळले. उगाच कोणताच धोका त्यांना ओढवून घ्यायचा नव्हता. थोड्या वेळाने सगळेच आपापल्या खोल्यांकडे निघून गेले. विश्वासरावांनी शाल्मलीला डॉक्टरांच्या खोलीकडे जाण्याची खूण केली…
दोघे खोलीत शिरताच डॉक्टर देवदत्त यांनी दार लावून घेतलं. जेणेकरून कोणीही चटकन आत शिरणार नाही. देवदत्त यांनी त्या सॅकमधून ते रेशमी वस्त्र शाल्मलीला काढायला सांगितले. शाल्मलीने वस्त्रासहित ती गुंडाळी उचलून घेतली आणि डॉक्टरांच्या हाती सोपवली.
डॉक्टरांनी मनोमन महाराणी संघमित्राचं स्मरण करत त्यांना सहाय्यभूत होण्याविषयी प्रार्थना केली आणि ती गुंडाळी उघडली. देवदत्त यांनी लक्षपूर्वक त्या लेखाच वाचन केलं… ती भविष्यवाणी आचार्य विष्णू वामन यांनी लिहून ठेवली होती… जे शब्द महाराणी संघमित्राच्या तोंडून निघाले होते, अगदी जसेच्या तसे त्यांनी शाल्मलीला समजावून सांगितले…
हेही वाचा – अलंकारीत स्त्रीची मूर्ती पाहून शौनक दचकलाच…
पण मुख्य अडचण ही होती की, उद्याच पौर्णिमा आणि त्यात काम बंद ठेवायचे, असे खुद्द डॉक्टर देवदत्त यांनीच सांगितले होते… काय आणि कसं करावं? मोठा यक्ष प्रश्न होता. पण देवावर आणि महाराणी संघमित्रावर सगळा भार टाकायचा त्यांनी ठरवलं… कारण आपण सामान्य मनुष्य काय आणि कसं करणार, हे सगळं तेच योग्य वेळ येता योग्य मार्ग दाखवतील आणि तसं आपण वागायचं!
आज सगळ्यांच्याच मनात वेगवेगळे प्रश्न थैमान घालत होते. चंदन नगरमधला एकही माणूस असा नव्हता, ज्याला उद्याची चिंता नव्हती. खरंच काय भवितव्य होतं… उद्याच्या चिंतेतच सर्व झोपी गेले.
पौर्णिमेचा दिवस उदासच उजाडला होता… अगदी धावपळीने सुरू होणाऱ्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजच्या दिवसात चैतन्यच नव्हते. दिवसाचा काही भाग अस्वस्थ असाच गेला होता. त्यातच गावातून खबर आली… मीडियाचे काही लोक वाळवंटी भागात येऊन शूट करत आहेत… पाटलांनी टीव्ही सुरू केला तर, बातम्यांमधून अगदी खमंग प्रकारे सजवून धजून चंदन नगरबाबत सांगितलं जात होतं…
क्रमशः


