सकाळ झाली. रोजच्या सारखे गुरुजी पूजा करण्यासाठी देवळात निघाले. पूर्वी देऊळ साधेसुधे होते. आता भव्य बांधले होते. पायरीला नमस्कार करून गुरुजी आत आले. अजून चार गुरुजी त्यांच्याबरोबर होते. ते पाचजण मिळून पूजा करत असत. चांदीचा भला मोठा दरवाजा उघडला होता. समोरच सोनं, मोती, हिऱ्याच्या दागिन्यांनी सजलेली देवाची मूर्ती होती. नमस्कार करून त्यांनी पूजा सुरू केली. प्रथम काळजीपूर्वक एकेक दागिना काढायला सुरुवात केली. दुसरे गुरुजी, ते दागिने पेटीत ठेवायला लागले. प्रत्येक वाराचे दागिने वेगळे होते.
शुद्ध पाण्याने देवाचे स्नान झाले. चांदीच्या पाच भांड्यात पंचामृत होते. ते घातले. नंतर कोमट पाण्याने देवाला स्नान घातले. पंचाने देवाला पुसले. पितांबर नेसवला. अंगरखा घातला. शेला पांघरला… आणि नेहमी प्रमाणे दागिने घालायला सुरुवात केली. सर्वात मोठा सोन्याचा हार देवाच्या गळ्यापाशी नेला आणि काय झालं कळलं नाही… हार गळून पडला!
“फासा तुटला का काय?” एका गुरुजींनी विचारले.
हातात घेऊन बघितले तर, तो नीट होता. परत त्यांनी हार घेतला आणि घालायला लागले, तर तो खाली घरंगळाला… “अरेच्च्या, असं काय होतंय…” गुरुजींनी हार बाजूला ठेवला आणि हिऱ्याची कंठी घेतली. ती घालायला लागले, तर ती पण खाली आली. दुसऱ्या गुरुजींनी प्रयत्न केला तरी तसंच…
तिसरे गुरुजी देवाजवळ आले. त्यांनी मोठी मोत्याची माळ घालायचा प्रयत्न केला तर… ती अचानक तुटलीच! मोती विखरून पडले. आता मात्र सगळे घाबरले. आज कुठलाही दागिना देवाला घालता येत नव्हता. काहीतरी विपरीत घडते आहे, याची जाणीव झाली… सगळेजण घाबरले. ताबडतोब ट्रस्टींना फोन केला. ते धावत आले. त्यांनी वेगवेगळे दागिने घेऊन घालायचा प्रयत्न केला, पण आज एकही दागिना मूर्तीवर टिकत नव्हता.
हेही वाचा – आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…
गुरुजींना काय वाटले कोण जाणे, त्यांनी शेवंतीच्या फुलांचा हार देवाच्या गळ्यात घातला. तो मूर्तीवर स्थिर राहिला. हे काय गूढ आहे, हे कोणाला उमगेना…
ही वार्ता लगेचच गावात पसरली. देवाला बघायला खूप गर्दी झाली. आज देवाचे मूळ रूप सर्वांसमोर होते!
जवळ राहणारी म्हातारी काठी टेकत निघाली, “मला देवाला बघू दे…” म्हणायला लागली. लोकांनी तिला वाट करून दिली. जवळ जाताच म्हातारीला रडू आले. ती देवाशी बोलायला लागली… म्हणाली,
“किती दिवसांनी दिसलास रे. सोन्या, मोत्यांच्या, हिऱ्यांच्या दागिन्यात पार बुडून गेला होतास. तुझ्या या रूपाचं दर्शन घ्यायला डोळे आतुरले होते रे! आज माझा जीव सुखावला. माझा देव दिसला… मला भेटला…”
म्हातारीच बोलणं ऐकून लोकांचे डोळे भरून आले…
प्रसादासाठीचे पेढे, बर्फी, लाडू यांनी भरलेले चांदीचे मोठे बाऊल बाजूला होते. म्हातारीने हातातले मूठभर शेंगदाणे देवाच्या तोंडाशी नेले…
“खा रे देवा…”
देव तिच्याकडे बघून हसला… असा तिला भास झाला. अत्यंत प्रेमाने देवाकडे बघत म्हातारीने हात जोडले…
दागिन्यांची ही अतर्क्य गोष्ट सर्वांसमोर घडली होती. अवाक् होऊन गुरुजी बघत होते. जे घडत आहे, त्याचा अर्थ काय असेल? याचा सगळे विचार करायला लागले. तो उमगायला थोडा वेळ जावा लागला. देवाला दागिने नको आहेत का? असाच प्रश्न मनात आला.
देव भावाचा भुकेला आहे. त्याला हे दिखाऊ सुंदर पण नको, तर निर्मळ मन हवं आहे… हे त्यांच्या लक्षात आले. देवाचं देवपण सोन्या-चांदीत नाही… दगडातल्या त्या देवपणाचं दर्शन आज भाविकांना झालं.
हेही वाचा – संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!
देवाला दागिने घालायची हौस आपल्याला आहे. तो निर्गुण निराकार आहे… त्याच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व भाविकांना मनोमन आनंद होत होता. प्रत्येकजण सुखावला होता… गावात चर्चा रंगली.
गावकऱ्यांना समजलं की, देवाने आज आपल्याला महत्त्वाची बाब लक्षात आणून दिलेली आहे. आता आपण प्रत्येक कृती करताना विचारपूर्वक करायला हवी आहे. मी जे करतो आहे, ते देवाला आवडेल का? असे प्रत्येकानी स्वतःच्या मनाला विचारायला हवे आहे. आपले वागणे संयमपूर्वक हवे.
पटलं का तुम्हाला? तुम्ही सुज्ञ आहात. ही कथा का लिहिली, हे तुम्हाला कळले असेलच. ते अंतःकरणापासून जाणून मात्र घ्या… आणि मुख्य म्हणजे, तसं वागायचा प्रयत्न करा… श्रद्धा ठेवा, पण त्याबरोबर विवेकाची साथ असू दे!


