हिमाली मुदखेडकर
भाग – 7
चार वर्षे… एका न्यायालयीन प्रकरणासाठी हा कालावधी कदाचित फार मोठा नव्हता. पण अनिकेतसाठी मात्र ती चार वर्षे म्हणजे एक अखंड युग होतं. अपघातानंतरची दोन वर्षे अंथरुणावर आणि मानसिक तणावात… आणि त्यानंतरची चार वर्षे न्यायालयाच्या पायऱ्यांवर… एकूण सहा वर्षे!
सहा वर्षांपासून एक छोटासा भ्रूण प्रयोगशाळेतील क्रायो-स्टोरेजमध्ये गोठलेल्या अवस्थेत त्याची वाट पाहत होता.
आणि आज…
त्या प्रतीक्षेचा निर्णय होणार होता.
0000
खंडपीठात त्या दिवशी खूप गर्दी जमली होती. अनेक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. IVF क्षेत्रातील तज्ज्ञ होते… कायद्याचे अभ्यासक आले होते. अनेकांना माहीत होतं की, आजचा निकाल फक्त एका व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करणार नव्हता, तो भविष्यात अशाच अनेक प्रकरणांसाठी मार्गदर्शक ठरू शकत होता.
0000
न्यायमूर्ती अरविंद प्रधान न्यायासनावर आले. त्यांच्या समोर जवळजवळ तीनशे पानी निर्णयाची प्रत होती. कोर्टात पूर्ण शांतता पसरली. अनिकेतच्या तळहाताला घाम फुटला होता… ॲड. विभा शेलार मात्र नेहमीप्रमाणे स्थिर दिसत होत्या.
ॲड. राघव आपटेही शांत होते. कारण लढाई आता संपली होती. आता निर्णय न्यायालयाचा होता.
न्यायमूर्ती प्रधान यांनी निर्णय वाचायला सुरुवात केली…
“ही याचिका प्रथमदर्शनी एका व्यक्तीच्या वैयक्तिक दुःखाशी संबंधित वाटू शकते. मात्र सखोल विचार करता हे प्रकरण आधुनिक वैद्यकीय विज्ञान, वैयक्तिक स्वातंत्र्य, जैव-नैतिकता, धार्मिक श्रद्धा आणि कायदेशीर अस्पष्टता यांच्या संगमावर उभे असल्याचे दिसून येते. या प्रकरणात न्यायालयासमोर उपस्थित झालेले प्रश्न हे अभूतपूर्व आहेत. विद्यमान IVF आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानासंबंधी कायद्यांमध्ये अशा परिस्थितीचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. म्हणून या न्यायालयाला उपलब्ध कायदा, घटनात्मक तत्त्वे, नैतिक विचार आणि तज्ज्ञांच्या साक्षी यांच्या आधारे निर्णय द्यावा लागत आहे.”
हेही वाचा – संकर्षण… एकल पालकत्वात स्त्री की पुरुष सक्षम?
“न्यायालयाने सर्वप्रथम वैद्यकीय पैलूंचा विचार केला. IVF तज्ज्ञांच्या साक्षींवरून हे निर्विवाद सिद्ध झाले आहे की, संबंधित भ्रूण आजही जैविकदृष्ट्या सक्षम आहे. त्यातून यशस्वी गर्भधारणेची शक्यता अस्तित्वात आहे. म्हणून या प्रकरणात वैद्यकीय अशक्यता हा मुद्दा राहात नाही.”
न्यायमूर्ती पुढे म्हणाले, “यानंतर मानसशास्त्रीय पैलूंचा विचार करण्यात आला. एकल पालकत्वामुळे मूल अपरिहार्यपणे हानीग्रस्त होते असा कोणताही निश्चित वैज्ञानिक निष्कर्ष न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. उलट प्रेम, सुरक्षितता, भावनिक स्थैर्य आणि सामाजिक आधार यावर मुलाच्या विकासाचा अधिक प्रभाव असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे आणि तशी आजतागायतची एकल पालकत्व समर्थपणे पेलणाऱ्या अनेक पुरूषांची उदाहरणेही न्यायालयासमोर सादर केली गेली. करण जोहर, तुषार कपूर, एवढेच कशाला सलील कुलकर्णी यांच्यासारखी एकल पालकत्व समर्थपणे पेलणाऱ्या पुरुषांची उदाहरणे आहेतच…”
अनिकेत शांतपणे ऐकत होता.
न्यायमूर्तींनी पुढील पानावरील मजकूर वाचायला सुरुवात केली…
“विरोधी पक्षाने मांडलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत पत्नीची संमती उपलब्ध नाही. हा मुद्दा न्यायालय अत्यंत गांभीर्याने स्वीकारते. कारण प्रजननाशी संबंधित निर्णय हे व्यक्तीच्या स्वायत्ततेशी निगडित असतात.”
राघव आपटे किंचित ताठ बसले.
“मात्र…” न्यायमूर्ती क्षणभर थांबले आणि म्हणाले, “या युक्तिवादात एक अंतर्गत विरोधाभास न्यायालयाच्या निदर्शनास आला आहे.”
कोर्टात सर्वजण कान देऊन ऐकू लागले.
“जर मृत व्यक्तीची संमती उपलब्ध नसल्यामुळे भ्रूण वापरता येत नाही असे मानले, तर त्याच तर्कानुसार त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय भ्रूण नष्ट करणेही तितकेच प्रश्न निर्माण करणारे ठरते. मृत व्यक्तीची इच्छा अज्ञात असल्यास न्यायालयाने कोणता पर्याय स्वीकारावा, हा प्रश्न उपस्थित होतो.”
अनिकेतने नकळत ॲड. विभा शेलार यांच्याकडे पाहिले. हा त्यांच्या युक्तिवादाचा मुख्य आधार होता.
न्यायमूर्ती म्हणाले, “न्यायालयाच्या मते या परिस्थितीत मृत व्यक्तीच्या इच्छेबाबत तर्क लावण्यापेक्षा जिवंत असलेल्या व्यक्तीच्या घटनात्मक अधिकारांचा विचार करणे अधिक योग्य ठरेल. भारतीय संविधानातील कलम XX अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्णयांमध्ये प्रजनन स्वातंत्र्य हे वैयक्तिक स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे.”
काही क्षण थांबून न्यायमूर्ती स्पष्ट आवाजात म्हणाले,
“याचिकाकर्ता अनिकेत पुरंदरे हे संबंधित भ्रूणाचे जैविक पिता आहेत. ते त्या बालकाच्या जन्माची, संगोपनाची आणि सर्व जबाबदाऱ्यांची तयारी दर्शवत आहेत. अशा परिस्थितीत केवळ कायद्यातील अस्पष्टतेमुळे त्यांचा हा अधिकार नाकारणे योग्य ठरणार नाही…” असे सांगून न्यायमूर्ती म्हणाले, “या न्यायालयासमोर याचिकाकर्त्याने धार्मिक श्रद्धेचाही मुद्दा उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्मपरंपरेत गर्भ आणि भ्रूण हे केवळ जैविक संरचना नसून संभाव्य जीव आणि आत्म्याचे निवासस्थान मानले जाते. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणून न्यायालय कोणत्याही विशिष्ट धार्मिक मतावर आधारित निर्णय देऊ शकत नाही. तथापि, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला त्याच्या प्रामाणिक धार्मिक श्रद्धा बाळगण्याचा अधिकार प्रदान करते.”
न्यायमूर्तींचा आवाज अधिक गंभीर झाला.
“या न्यायालयाचा निर्णय धार्मिक श्रद्धेवर आधारित नाही. मात्र याचिकाकर्त्याच्या नैतिक आणि धार्मिक विश्वासांचा त्याच्या वैयक्तिक निर्णयप्रक्रियेवर होणारा परिणाम पूर्णपणे दुर्लक्षितही करता येणार नाही. विशेषतः जेव्हा त्या श्रद्धा इतर कोणाच्याही अधिकारांवर अतिक्रमण करत नाहीत.”
अनिकेतच्या डोळ्यांत पाणी दाटू लागलं…
यानंतर न्यायमूर्तींनी निर्णयातील सर्वांत महत्त्वाचा भाग वाचायला सुरुवात केली… तो भाग नियामक संस्थांबद्दल होता.
“या प्रकरणामुळे सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानासंबंधी विद्यमान नियमावलीतील गंभीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आल्या आहेत. कायद्यात संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर संरक्षित भ्रूणांच्या व्यवस्थापनासंबंधी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय संस्था, कुटुंबीय आणि न्यायालये अनिश्चिततेत सापडतात. नियामक संस्थांनी आणि संबंधित मंत्रालयानी या विषयाकडे पुरेसे लक्ष दिलेले दिसत नाही. या न्यायालयाचे मत आहे की, भविष्यात अशा प्रकरणांमध्ये गोंधळ टाळण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करणे अत्यावश्यक आहे.”
न्यायमूर्ती पुढे म्हणाले, “म्हणून केंद्र सरकार, राष्ट्रीय सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान प्राधिकरण आणि संबंधित नियामक संस्थांना पुढील बाबींचा विचार करण्याची शिफारस करण्यात येते—
- IVF प्रक्रियेदरम्यान मृत्यूनंतर भ्रूणासंबंधी स्वतंत्र संमतीपत्र घेणे.
- मृत्यूनंतर भ्रूण वापर, संरक्षण किंवा नाश यासंबंधी स्पष्ट धोरण तयार करणे.
- जैविक पालकांच्या अधिकारांची स्पष्ट व्याख्या करणे.
- अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र वैधानिक प्रक्रिया तयार करणे.”
मग अखेर न्यायमूर्तींनी अंतिम आदेश वाचला….
“वरील सर्व कारणांमुळे ही याचिका मंजूर करण्यात येत आहे.”
अनिकेतचा श्वास थांबला.
“याचिकाकर्ता अनिकेत पुरंदरे यांना संबंधित भ्रूणाचा वापर करण्यास हे न्यायालय ‘ना हरकत’ परवानगी देत आहे. तसेच लागू असलेल्या सर्व वैद्यकीय आणि कायदेशीर अटींचे पालन करून सरोगसी प्रक्रियेद्वारे मुल जन्माला घालण्याची परवानगी देण्यात येत आहे.”
संपूर्ण कोर्टरूम स्तब्ध होती. जणू सर्वांना निर्णयाचा अर्थ समजून घ्यायला वेळ लागत होता. पत्रकारांनी घाईघाईने नोट्स लिहायला सुरुवात केली. काही जण फोनवर ‘ब्रेकिंग न्यूज’ देऊ लागले.
अनिकेतला मात्र काही ऐकू येत नव्हते. त्याच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं…
“याचिका मंजूर करण्यात येत आहे.”
विभा शेलार त्याच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, ” मिस्टर पुरंदरे …”
तो त्यांच्याकडे पाहू लागला… त्या म्हणाल्या,
“आपण जिंकलो.”
त्याच्या डोळ्यात अश्रू आणि चेहर्यावर विजयाचे हसू एकाच वेळी होते.
हेही वाचा – संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!
0000
कोर्टाबाहेर पडताना त्याने आकाशाकडे पाहिलं… संध्याकाळच्या सूर्यकिरणांनी आभाळ सोनेरी झालं होतं.
त्याच्या डोळ्यांसमोर सानिकाचा चेहरा आला. तो हलक्या आवाजात म्हणाला,
“अखेर आपण जिंकलो सानिका… तुझ्यासाठी… आपल्यासाठी… आणि आपल्या बाळासाठी…”
पण हा विजय म्हणजे शेवट नव्हता तर, ती एका नवीन प्रवासाची सुरुवात होती.
पुढील काही आठवडे वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये गेले.
IVF केंद्राशी पुन्हा संपर्क झाला. क्रायो-स्टोरेजमधील भ्रूणाची तपासणी झाली. सरोगसी प्रक्रियेची प्राथमिक तयारी सुरू झाली.
आता प्रश्न होता… सरोगेट आई कोण?
कागदोपत्री परवानगी मिळवणे एक गोष्ट होती. पण प्रत्यक्षात अशी स्त्री शोधणे, जी या प्रवासाचा भाग होण्यास तयार असेल, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट होती.
टेबलावर सरोगसी एजन्सीच्या काही फाईल्स पडल्या होत्या… तो स्वतःशीच बोलत होता…
“आता आपल्या बाळाला या जगात आणायचं आहे…”
लढाई संपलेली नव्हती. तिने फक्त रूप बदललं होतं… आणि लढाईचं नवं नाव होतं
*सरोगेट मदर शोध प्रक्रिया*
क्रमश:
(Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


