बहुतांश चेहरे काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. काही चेहरे मात्र आठवणींच्या कप्प्यात कायमचे जपले जातात. जसे की मधुबाला, सुचित्रा सेन, वहिदा रेहमान आणि…
ओटीटीवर जुने चित्रपट सर्फ करताना अचानक ‘सौदागर’ समोर आला, स्क्रीनवर ती दिसली आणि मी थांबलोच. आमचे काकाश्री (अशोक पाटील) आणि माझ्यामध्ये नेहमी मधुबाला आणि नूतन यांच्यावरून चर्चा व्हायच्या. काकाश्री (आणि तो इनबॉक्सवाला राम्यासुद्धा) मधुआजीचे चाहते, तर मी नूतनप्रेमी. पण काकाश्रीबरोबर वाद घालताना नूतनचा विषय निघाला की, निपो माझ्या बाजूने उभे राहायचे. निपोंचे देखील नूतनवर निरतिशय प्रेम. त्यामुळे काकाश्रींना बॅकफूटवर जाणे भाग पडे.
तिच्या डोळ्यांतील निरागसता, चेहऱ्यावरचे सौम्य हास्य आणि शब्दांशिवाय देखील भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद आजही मनाला स्पर्श करून जाते. काही कलाकार आपल्याला आवडतात… काही कलाकार आपल्याला प्रभावित करतात… पण काही कलाकार असे असतात की, ते आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. त्यांचे चित्रपट पाहताना आपण केवळ प्रेक्षक राहत नाही, तर त्यांच्या भावनांचे सहप्रवासी बनतो… नूतन हे असेच एक नाव.
जुन्या हिंदी चित्रपटांची आठवण निघाली की, अनेक सुंदर चेहरे डोळ्यांसमोर येतात. पण त्यातला हा चेहरा असा आहे, जो केवळ सुंदर नव्हता तर, भावनांनी समृद्ध होता. तिचे मोठे, बोलके डोळे, त्यातली निरागसता, प्रसंगी दिसणारी वेदना आणि एखाद्या शांत नदीसारखा तिचा पडद्यावरील वावर… हे सर्व काही इतके नैसर्गिक होते की, ती अभिनय करते आहे, हेच विसरून जायला व्हायचे.
हेही वाचा – गुजरा हुआ जमाना…
आजच्या काळात अभिनयाबद्दल बोलताना ‘नॅचरल ॲक्टिंग’ हा शब्द सहज वापरला जातो. पण भारतीय चित्रपटसृष्टीत या शैलीचा पाया घालणाऱ्या कलाकारांमध्ये नूतनचे नाव अगदी अग्रस्थानी घ्यावे लागेल. ती संवादांपेक्षा डोळ्यांनी बोलायची. तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या सूक्ष्म भावना अनेक पानांचे संवाद सांगून जायच्या.
मुंबईत 4 जून 1936 रोजी जन्मलेल्या नूतन समर्थ या गोड मुलीला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला होता. आई शोभना समर्थ या त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या, तर वडील कुमारसेन समर्थ हे कवी आणि चित्रपट निर्माते होते. पुढे तनुजा, काजोल, तनिषा यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या एका समृद्ध कलावंत घराण्याचा हा वारसा होता.
मात्र नूतनचा प्रवास केवळ घराण्याच्या बळावर झालेला नव्हता. लहानपणी ती अत्यंत सडपातळ आणि दिसायला सर्वसाधारण असल्यामुळे अनेकदा तिची खिल्ली उडवली जायची. तिच्या रूपाबद्दल शंका घेतली जायची. अगदी तिची आई शोभना समर्थदेखील तिचा उल्लेख ”माय अग्ली डकलिंग” असा करत असे. पण त्यातही लेकीच्या गुणांचे कौतुकच जास्त होते. हेच अग्ली डकलिंग पुढे अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आदरणीय आणि उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून अजरामर झाले, इतके की, आईपेक्षाशी जास्त प्रसिद्ध झाले.
तिचा पहिला चित्रपट ‘हमारी बेटी’ होता. त्यानंतर काही वर्षे ती स्वतःला शोधत राहिली. पण 1955मध्ये आलेल्या ‘सीमा’ने सर्व काही बदलून टाकले. ‘सीमा’ हा केवळ एक चित्रपट नव्हता. तो नूतनच्या अभिनयशक्तीचा पहिला मोठा स्फोट होता. एका अनाथ मुलीवर वारंवार होणारा अन्याय, तिच्या मनात साचणारा संताप, समाजाविषयी निर्माण होणारी कटुता आणि तरीही मनात कुठेतरी जिवंत असलेली कोमलता… हे सारे नूतनने इतक्या ताकदीने साकारले की, प्रेक्षक अक्षरशः स्तब्ध झाले. विशेष म्हणजे, या भूमिकेत तिने कोणताही कृत्रिम आवेश आणला नाही. तिच्या डोळ्यांतील राग आणि वेदना इतके खरे वाटतात की आजही ‘सीमा’ पाहताना अंगावर शहारे येतात.
‘सुजाता’मध्ये नूतनने भारतीय समाजाच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवले. अस्पृश्य मानल्या गेलेल्या एका मुलीची भूमिका तिने साकारली. हा चित्रपट पाहताना लक्षात येते की, नूतन किती कमी साधनांतून किती मोठा परिणाम साधू शकते. ‘सुजाता’ सतत स्वतःचे अस्तित्व शोधत असते. ती प्रेम करते, पण स्वतःला त्यासाठी पात्र समजत नाही. ती घरात राहते, पण घर तिचे आहे, असे तिला कधी वाटत नाही. हा अंतर्गत संघर्ष नूतनने इतक्या सूक्ष्मतेने व्यक्त केला आहे की, अनेक प्रसंगांमध्ये तिचे मौनच संवादांपेक्षा प्रभावी ठरते.
सुनील दत्तसोबतची तिची जोडी या चित्रपटात विशेष खुलली. पण प्रेमकथेपेक्षाही मोठी ठरली ती सुजाताच्या आत्मसन्मानाची कथा. नूतनने या भूमिकेत भारतीय स्त्रीच्या मनातील असुरक्षितता आणि आत्मगौरव दोन्ही एकाच वेळी जिवंत केले.
आणि मग आला ‘बंदिनी’.
भारतीय चित्रपटसृष्टीत जर अभिनयाचा एखादा विद्यापीठीय अभ्यासक्रम तयार झाला, तर ‘बंदिनी’मधील नूतनचा अभिनय हा त्यातील अनिवार्य धडा असावा.
‘कल्याणी’ ही व्यक्तिरेखा अत्यंत गुंतागुंतीची आहे. प्रेम, त्याग, अपराधीपणा, पश्चात्ताप, कर्तव्य आणि अंतर्गत तुटलेपण… यांचा संघर्ष तिच्या मनात सतत सुरू असतो. अशा भूमिकेत एखादी अभिनेत्री सहजपणे नाटकी वाटू शकली असती. पण नूतनने ती भूमिका अक्षरश: जगली आहे. तिच्या चेहऱ्यावर दिसणारे एकाकीपण, प्रेमभंगाची वेदना आणि आयुष्याने दिलेल्या जखमा प्रेक्षकांच्या मनात खोलवर उतरतात.
चित्रपटाच्या शेवटच्या भागात ‘कल्याणी’चा निर्णय पाहताना प्रेक्षकही तिच्यासोबत भावनिक प्रवास करत असतो. म्हणूनच अनेक समीक्षक आजही ‘बंदिनी’ला भारतीय सिनेमातील सर्वश्रेष्ठ स्त्रीप्रधान चित्रपटांपैकी एक मानतात आणि त्यातील नूतनचा अभिनय तिच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू मानला जातो.
नूतनने अनेक दिग्गज नायकांसोबत काम केले. राज कपूरसोबत ‘अनाडी’मध्ये तिने निरागस प्रेमाला एक वेगळीच ऊब दिली. तिच्या आणि राज कपूरच्या दृश्यांमध्ये एक सहज गोडवा होता.
देव आनंदसोबत तिची जोडी विशेष लोकप्रिय झाली. ‘पेइंग गेस्ट’, ‘बारिश’, ‘नौ दो ग्यारह’ आणि ‘तेरे घर के सामने’ या चित्रपटांत दोघांची केमिस्ट्री अप्रतिम होती. देव आनंदचा उत्साही, खट्याळ आणि चपळ पडद्यावरील स्वभाव आणि नूतनची संयमी, भावपूर्ण उपस्थिती यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना खूप आवडला. ‘पेइंग गेस्ट’मधील तिची निरागसता, ‘बारिश’मधील भावनिक खोली, ‘नौ दो ग्यारह’मधील तिचा उत्स्फूर्त आणि खेळकर अंदाज, तर ‘तेरे घर के सामने’मधील तिची मोहक उपस्थिती आजही रसिकांच्या स्मरणात आहे.
‘दिल्ली का ठग’मध्ये तिच्यासोबत किशोर कुमार होते. या चित्रपटात नूतनचा एक वेगळाच पैलू पाहायला मिळतो. गंभीर आणि भावनिक भूमिकांमुळे ओळखली जाणारी ही अभिनेत्री विनोदी, खोडकरपणा आणि हलक्याफुलक्या प्रसंगांमध्येही तितकीच प्रभावी होती, हे तिने सिद्ध केले.
तिच्यावर चित्रित झालेली गाणी हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. छोड़ दो आँचल, माना जनाब ने पुकारा नहीं, दिल का भंवर करे पुकार, तेरा मेरा प्यार अमर, सावन का महीना पवन करे शोर, ओ जाने वाले हो सके तो लौट के आना, मन मोरा बावरा, चंदन सा बदन… यासारखी गाणी आजही जिवंत आहेत. या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे नूतनची अभिव्यक्ती. ती गाण्यात अभिनय कधीच करायची नाही, ती तिचे प्रत्येक गाणे अक्षरश: जगली आहे, असेच वाटत राहते.
1959मध्ये नौदल अधिकारी रजनीश बहल यांच्याशी विवाह केल्यानंतरही तिची कारकीर्द तेजाने सुरू राहिली. त्या काळात हे फार मोठे यश मानले जात होते. पुढे मोहनिश बहलचा जन्म झाला. संसार, मातृत्व आणि अभिनय यांचा तिने सुंदर समतोल साधला.
तिच्या आयुष्यात अनेक रोलर कोस्टर राइडस होत्या. आई शोभना समर्थ यांच्याशी निर्माण झालेला दुरावा तिला सतावत राहिला. कर्करोगाशी ती झगडत होतीच. पण या वेदना तिने कधी सार्वजनिक केल्या नाहीत. पडद्यावर भावनांचा महासागर उभा करणारी ही स्त्री स्वतःच्या वैयक्तिक दुःखाबाबत मात्र अतिशय संयमी होती.
हेही वाचा – असंच काहीसं आवडलेलं…
कारकिर्दीच्या उत्तरार्धात मेरी जंग, नाम, कर्मा, मराठीत पारध यासारख्या चित्रपटांमधील आईच्या आणि सहाय्यक भूमिकांमध्येही तिने तेवढीच छाप सोडली. अनेक अभिनेत्री नायिकेपासून चरित्र भूमिकांकडे जाताना हरवून जातात, पण नूतनने त्या भूमिकांनाही प्रतिष्ठा दिली.
1990मध्ये तिला कर्करोगाचे निदान झाले. आयुष्यभर पडद्यावर संघर्ष करणारी ही अभिनेत्री वास्तव आयुष्यातही तितक्याच धैर्याने लढली. अखेर 21 फेब्रुवारी 1991 रोजी ती कायमची निघून गेली.
आज तिच्या निधनाला अनेक दशके झाली आहेत. पण ‘सीमा’तील संतापलेली मुलगी, ‘सुजाता’तील वेदनांनी भरलेली स्त्री, ‘बंदिनी’तील अंतर्मुख कल्याणी, ‘नौ दो ग्यारह’मधील हसरी तरुणी आणि ‘मिलन’मधील प्रेमात हरवलेली राधा आजही आपल्यासोबत आहेत.
कारण नूतन ही केवळ अभिनेत्री नव्हती…
ती भावनांची भाषा होती.
ती मौनाचा संवाद होती.
ती डोळ्यांतून बोलणारी कविता होती.
आणि म्हणूनच, हा लेख म्हणजे केवळ एका महान अभिनेत्रीची आठवण नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीने पाहिलेल्या सर्वात प्रामाणिक अभिनयाला केलेला एक हृदयपूर्वक प्रणाम आहे.


