एका न्यूज चॅनेलचा मी हेड झालो आणि पहिल्याच महिन्यात महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थाचा कारभार जवळून पहाण्याचे मी ठरवले. याकरिता महिन्यातील आठ दिवस दौरे काढून विशेषतः ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना भेट द्यायचे ठरविले. अर्थात, माझ्या डोळ्यांसमोर आली माझी शाळा… म्हणजेच जोंधळे गुरुजींची शाळा!
या शाळेत मी पहिलीपासून दहावीपर्यंत शिकलो होतो. राज्यातील एक आदर्श शाळा म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी खुद्द राज्यपालांकडून आमच्या शाळेचे कौतुक झालेले. त्या वेळचे शिक्षणमंत्री सहा महिन्यांतून एकदा तरी या शाळेत येत… सोबत कुणी ना कुणी शिक्षणतज्ज्ञ असायचेच. हे विविध राज्यांतील शिक्षणातज्ञ्ज संस्थेचा कारभार पाहात, विविध उपक्रम पाहात आणि तोंडात बोटे घालत.
मी शाळेत असताना म्हणजे अंदाजे तीस वर्षांपूर्वी या शाळेत शिक्षण होतेच, पण आणखी अनेक उपक्रम होते. त्यापैकी शेती हा मुख्य उपक्रम! अंदाजे दहा एकरमध्ये शेती होती. त्यामुळे पाचवीपासूनची मोठी मुले शेतात राबत. सर्व मुलांना शेतीची सर्व कामे येत. मला पण नांगर लावून जमीन नांगरणे येते. त्यानंतर जमिनीची लेवल, पेरणी, तण काढण्यापासून कापणी, मळणी, धान्य साठवणे सर्व… शाळेतील मुलींना पण सर्व शेतीकाम येई. शेतीखेरीज संस्थेची गुरे होती – गाई, म्हशी. त्यानां स्वच्छ करण्यापासून दूध काढण्यापर्यंत मुलांना सर्व माहीत होते.
हेही वाचा – पाप आणि पुण्य
शाळेने फळझाडे लावली होती. नारळ भरपूर मिळत. आंब्याची झाडेही होती. या झाडांची मशागत करण्याचे काम आम्ही करत होतो. शाळेचा छापखाना होता, त्या प्रेसमध्ये कम्पोजिंग, प्रिंटिंग, बाइंडिंग शिकवत असत. मुलांना हे पण काम येई. संस्था शाळेच्या कामाव्यतिरिक्त बाहेरची कामे देखील घेई.
शिक्षणात शाळा कधीच मागे नसे. शालांत परीक्षेत याच शाळेची मुले अव्वल असत. सर्व बाजूंनी संस्था आणि शाळा फोफावली होती.
पण गेल्या काही वर्षांपासून संस्थेत वाद सुरू होते. जोंधळे गुरुजींनाच इतरांनी वेगळे केले होते.. कोर्टात आणि धर्मादाय कार्यालयात वेगवेगळ्या केसेस सुरू होत्या…
मी गेली अनेक वर्षे मुंबईत असल्याने माझ्या कानावर काही गोष्टी येत होत्या; पण निश्चित काय ते समजावे म्हणून एक दिवस गावात आलो आणि शाळेत गेलो. खरंतर वर्ग सुरू होते, पण कुठेच गडबड नव्हती. नारळाच्या झाडांनी पाण्याअभावी मान टाकली होती. आंब्याची बरीच झाडे तोडलेली दिसत होती. मोठा गोठा रिकामा होता. त्यात एक पण गाय किंवा म्हैस नव्हती. मला धक्का बसला. शाळेची एवढी वाईट अवस्था असेल, याची मला कल्पना नव्हती.
जुन्या पिढीतील फक्त जोंधळे गुरुजी शिल्लक आहेत याची मला कल्पना होती. बाकी संस्थेचे आणि शाळेचे संस्थापक एक एक करून जग सोडून गेले होते. मी जोंधळे गुरुजींना शोधत होतो. गुरुजी एका चिंचेच्या झाडाखाली टेबलावर बसलेले दिसले.. तीस वर्षांपूर्वी मी पाहिलेले गुरुजी आता थकले होते… डोक्यावर गांधी टोपी मात्र अजून होती. गालफडे बसली होती… धोतर मळलेले होते… शर्ट जीर्ण झाला होता… मी जवळ जाऊन त्याना हाक मारली..
“जोंधळे गुरुजी नमस्कार…”
जाड चष्म्यातून माझ्याकडे रोखून पाहात गुरुजी उत्तरले…
“कोण रे?”
“गुरुजी, मी उमेश यादव… याच शाळेचा विदयार्थी… पंचाण्णवच्या बॅचचा!”
“म्हणजे तीस वर्षे झाली. त्यावेळी मी तरुण होतो. तुम्हाला इंग्लिश शिकवत होतो… बरोबर?”
“हो सर, तुम्ही करून घेतलेले व्याकरण अजून विसरलो नाही.”
“आता कुठे असतोस?”
“मुंबईला… एका प्रतिष्ठित ग्रुपच्या मराठी न्यूज चॅनेलचा हेड आहे गुरुजी.”
“अरे छान. आपली मुले कोठे-कोठे मोठ्या हुद्द्यावर आहेत. तीन कलेक्टर आहेत. दोन मंत्र्यांचे सचिव आहेत. शिवाय डॉक्टर, व्यापारी, इंजिनीअर अनेक आहेत… प्रोफेसर आहेत. राजकारणी सुद्धा आहेत! आनंद वाटला. पण आज तू इकडे कुणीकडे?”
“गुरुजी, मी चॅनेलहेड झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला, तो म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील शिक्षणसंस्थांना भेट द्यायचा. मुंबईत फारशा बातम्या कळत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन संस्था, शाळा बघायची… आज आपल्या शाळेपासून म्हणजे जोंधळे गुरुजींच्या शाळेपासून सुरुवात केली. कोणत्या उद्देशाने ही शाळा सुरू झाली?”
“खरंतर, या शाळेला जोंधळे गुरुजींची शाळा म्हणणे चूक आहे. आम्ही होतो तिघेजण… अप्पा साठे, नंदू मगदूम आणि मी या गावात आलो. ते दोघे शिक्षक नव्हते, पण संस्था वाढण्यासाठी धडपडत होते. आमच्यावर लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोघांच्या विचारांचा पगडा होता. मी वयाच्या विसाव्या वर्षापासून शिकवतो आहे.. म्हणून माझ्या नावाने शाळा ओळखली जाऊ लागली.
ग्रामीण भागात शिक्षण देण्याची गरज आहे, या विचाराने इथे आलो. अप्पा साठेने आपली चाळीस एकर जमीन शाळेसाठी दिली… संस्थेच्या नावे केली! मग आम्हाला उत्साह आला… आजूबाजूची मुले येऊ लागली. मी चार विषय घेऊ लागलो. अप्पा दोन विषय आणि नंदू दोन विषय… जसजसे वर्ग वाढू लागले, तसे नवीन शिक्षक आले. संस्थेला ग्रांट मिळू लागली. मग संस्थेने आणि शाळेने मागे वळून पाहिले नाही… शाळेने झाडे लावली… शेती करू लागलो… प्रेस सुरू केली… मग मुलांना सुतारकाम, कुंभारकाम शिकता येऊ लागले… मुले बोर्डात येऊ लागली. मी निवृत्त झालो तरी संस्थेवर होतो… माझे लक्ष होतेच, पण…”
“पण काय गुरुजी?”
“2005पर्यंत शाळेत दीड हजार मुले होती. बरीच मुले निवासी होती. या शाळेच्या संचलनासाठी एक सल्लागार मंडळ कार्यरत होते.. त्यात चार प्रतिनिधी संस्थेचे, तीन वर्गणीदारातून आणि दोन पालकांचे. 2006 साली वर्गणीदारांमधून पुण्याचे दोन राजकीय कार्यकर्ते मंडळात शिरले. या दोघांनी संस्थेच्या कार्यकारणीत फूट पाडली. दोन तट पडले. या गटबाजीमुळे मंडळ निवडणुकीसाठी दोन गटांनी स्वतंत्र निवडणूक घेतली. दोघांनीही धर्मादाय कार्यालयात त्यांच्या प्रतिनिधींची नावे दिली. धर्मादाय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना मान्यता दिली आणि गोंधळ सुरू झाला. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कुणाचे आदेश मानावे, हे कळेना. यातून शाळेतले वातावरण दूषित झाले. शेती, नारळ, आंबे आणि दूध, छापखाना यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर दोन्ही गट हक्क सांगू लागले… पुन्हा संस्थेची निवडणूक झाली; त्याला धर्मादाय कार्यालयाने मान्यता दिली नाही. या गोंधळात राजकीय पुढारी असलेल्या गटाने शाळेचा आणि संस्थेचे रेकॉर्ड पळविले.
काय करायचे? माझ्या दोन्ही सहकाऱ्यांनी संस्थेचे हे धिंडवडे पाहून हाय खाल्ली आणि दोघेही हे जग सोडून गेले… राहिलोय फक्त मी. अजून फाईट देतोय.”
तावातावाने बोलण्याने गुरुजींना धाप लागली. सोबतच्या बाटलीतील चार घोट पाणी ते प्यायले आणि पुन्हा बोलू लागले.
“या बेदिलीला कंटाळून मी आजीव सभासद म्हणून कोर्टात धाव घेतली, खालच्या कोर्टाने मला योग्य न्याय दिला आणि ते दोन पुढऱ्यांची नेमणूक चुकीची ठरवली; पण पैसेवाले पुढारी हायकोर्टात गेले. त्याचा निकाल अजून लागलेला नाही… तारखांवर तारखा.. धर्मादाय आयुक्तांकडे अनेक दावे प्रलंबित आहेत… यामुळे संस्थेची आणि शाळेची बेअब्रू झाली आहे. नवीन शिक्षक भरती नाही… होते ते शिक्षक शाळा सोडून गेले. हळूहळू मुले दुसरीकडे गेली. या नारळीच्या झाडांना पाणी द्यायला कोणी नाही… आंब्याची झाडे लोक गुपचूप तोडून नेत आहेत. गाई म्हशी मेल्या. आता या शाळेत तीन शिक्षक आहेत आणि पंधरा मुले… हळूहळू ती पण यायची बंद होतील. शिक्षक सोडून जातील.. पण मरेपर्यत इथे राहणार आहे हा जोंधळे गुरुजी! हा गुरुजी इथेच मरणार आहे… अर्थात, बरीच मंडळी माझ्याच मरणाची वाट पाहात आहेत कारण…”
“कारण काय जोंधळे गुरुजी?”
“कारण ही चाळीस एकर जमीन… या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे. आता विमानतळ जवळच होतंय म्हणजे या जमिनीला सोन्याचा दर आहे सध्या!”
“मग काय करायचे गुरुजी?”
हेही वाचा – नमन नटवरा… जयवंत सरांच्या निराशेचे कारण काय?
गुरुजी संतापले… चिडून मुठी आवळून बोलू लागले…
“या शाळेचे माजी विद्यार्थी कलेक्टर आहेत, कुणी सचिव आहेत… कुणी पोलीस महासंचालक आहेत… काही कोट्यधीश आहेत. तू एका चॅनेलचा हेड आहेस, पण मी आणि या शाळेने नपुंसक, षंढ विद्यार्थी घडविले याचे मला दुःख आहे. एकाही माजी विद्यार्थ्याला या शाळेसाठी, संस्थेसाठी उभे राहावे असे वाटतं नाही… हा म्हातारा जोंधळे या गुंडाना अजून पुरून उरतो आहे आणि तू… तरणा, मोठ्या पगारवाला मला विचारतोस… ‘गुरुजी, पुढे काय?’ थू तुमच्या शिक्षणावर आणि मोठ्या पदावर… आम्ही तीन मित्र झपाटल्यासारखे या भागात आलो आणि दोन हजार मुलांना दरवर्षी शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली आणि तुम्ही…? चालता हो माझ्यासमोरून… चालता हो. चुकूनही मी जोंधळे गुरुजींचा विद्यार्थी म्हणून सांगू नकोस…”
गुरुजींच्या या अवताराने मी खाली मान घातली आणि बाहेर पडलो.
या भेटीचा वृत्तांत मी माझ्या चॅनेलसाठी तयार करत असताना बातमी आली…
‘जोंधळे गुरुजीं शाळेत चिंचेच्या झाडाखाली मृतावस्थेत सापडले’
एका शाळेचा अंत झाला.


