अधिक महिना सुरू होण्यापूर्वीच कितीतरी दिवस आधीच त्याचे वेध लागले. सगळीकडे जावयाला काय काय देता येईल याबद्द्ल वेगवेगळ्या कल्पना समोर येत आहेत… आणि अशातच मन थोडे विचारात रमले. मुलगी जन्माला येतेच मुळी लक्ष्मीच्या पावलांनी. लक्ष्मी जन्माला आली असेच म्हटले जाते. (नारायण जन्माला आला असे नाही म्हणत.) तेवढ्याच लाडात तिला वाढवले जाते. वयात आल्यावर लग्न होते आणि या लक्ष्मीला नारायण मिळतो. लग्नाला येणारा प्रत्येकजण, मग तो कोणाच्याही बाजूचा असो, “किती छान लक्ष्मी-नारायणाचा जोडा आहे” असेच म्हणत असतो. सासरी तर तिचे गृहलक्ष्मी म्हणूनच स्वागत केले जाते.
लक्ष्मी (गृहलक्ष्मी)- नारायणाचा प्रवास सुरू होतो. वेगवेगळे सण, कार्यक्रम, सोहळे दोघांचे एकमेकांच्या साथीने सुरू होतात. पहिल्या वर्षात दोन्हीकडील सणांमध्ये हे लक्ष्मी (गृहलक्ष्मी)- नारायण आनंदाने सहभागी होतात. नंतर काळानुसार अनेक गोष्टींमध्ये बदल होत जातात. त्यातूनच मधून मधून येणारा अधिक महिना दोघांनाही लक्ष्मी-नारायण असल्याची आठवण करून देत असतो!
पहिली एक-दोन वर्षं हा नारायण पण, सासु-सासऱ्यांना पुण्य मिळते म्हणून किंवा इतर काही कारणामुळे अधिक महिन्यात आवर्जून सासुरवाडीला जातो. धोंडे खाऊन, वाण घेऊन येतो. (सासु-सासरे काही कमवत नसले तरी, जावयाचे वाण स्वत:च्या ऐपतीप्रमाणे करत असतात. शक्यतो मुलाकडून त्यासाठी मदत घेण्याचे टाळतात.) नंतर मात्र हा नारायण काही कारण काढून, नेहमी नेहमी कशाला? असा विचार करून किंवा अन्य काही कारणाने जाण्याचे टाळू लागतो. काही ठिकाणी तर सासु-सासऱ्यांच्या पश्चात काही भाऊ आवर्जून बोलावतात. पण तेथे पण ‘आता कशाला’ म्हणणारे किंवा ‘नाते जपायचे आहे’ असे म्हणून भावाचा मान ठेवत जाणारे पण अनेक नारायण दिसतात. काही असो यामध्ये त्या लक्ष्मीला काही महत्त्व दिसत नसले तरी तिच्यासाठी तर माहेरी जाण्याचे ते निमित्त असते!
हेही वाचा – गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य
माहेरची लक्ष्मी खरंतर आता सासरी पूर्णपणे मिसळून गेलेली असते. लक्ष्मीची गृहलक्ष्मी झालेली असते. नारायण पण आई-वडिलांसाठी जबाबदार व्यक्ती झालेला असतो. मग मनात येते की सासू-सासऱ्यांचे पुण्य फक्त लक्ष्मीच्याच आई वडिलांना का? सासू-सासरे म्हणून तर नारायणाचे पण आई-वडील आहेतच की! त्यांच्या लेखी पण मुलगा आणि सून हे लक्ष्मी (गृहलक्ष्मी)-नारायणच आहेत की… मग जसे जावयाचे कौतुक केले जाते, तसे खरेतर त्यापेक्षा जास्त सुनेचे कौतुक केले गेले पाहिजे. जावई हा कायम सासुरवाडीचा पाहुणाच असतो. पण सून घरची असते. ती दोन्ही घरं तेवढ्याच ताकदीने संभाळते. मग तिचे पण कौतुक यानिमित्ताने का होईना, करायला काय हरकत आहे!
गृहलक्ष्मीचे कौतुक करण्याची, तिला छान वाण नाही, पण निदान काही बक्षीस देण्याची किती छान संधी! असे अचानक झालेले कौतुक हे पुढे घरातील सौख्य, आनंद टिकवण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि तेव्हाच लक्ष्मी ही सर्वार्थाने गृहलक्ष्मी म्हणून मिरवेल. नेहमीच तिच्याबरोबर असणारा नारायण आहेच की, त्यानिमित्ताने तो पण आई-वडिलांकडून थोडे कौतुक करून घेईल.
हेही वाचा – घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…
कन्यादान असो नाहीतर अधिक महिना हे पुण्य फक्त मुलीच्या आई-वडिलांनाच मिळते. परंतु आजकाल घरात फक्त एक मुलगा किंवा एक मुलगी असते, अशा वेळेस मुलाच्या आई-वडिलांना असे काही करता येत नाही. तेव्हा, असा अधिकचा विचार करायला काय हरकत आहे? अनेक बदल स्वीकारत आहोत, मग हा पण बदल स्वीकारून बघू… आणि यावर्षीपासून गृहलक्ष्मीचे पण कौतुक करू!


