सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥357॥ हळाहळ आगीं पियालें । नवल मरण मारा पेटलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥358॥ परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटिलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥359॥ नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥360॥ तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणोनि घांसु । न भरीचि कोंडें ॥361॥ आणि पाताळव्याळांचां फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं । तैसी पसरलिये वदनदरी- । माजीं हे जिव्हा ॥362॥ काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे । तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥363॥ आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥364॥ ऐसें वाऊनि महाभयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज । तें नेणें परी मज । मरणभय आलें ॥365॥ देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें । बा देखलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥366॥ अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥367॥ एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥368॥ परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥369॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें
अर्थ
हे कसे झाले पाहा! जसा वार्याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात पडावा किंवा विषग्नी वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. ॥357॥ अग्नीने जसे हालाहल विष प्यावे अथवा आश्चर्य असे की, मरण जसे मारण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे या संहारतेजाला मुख झाले आहे, असे समजा. ॥358॥ परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल, तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहाते, ॥359॥ अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला, तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळारूपी गुहेचे द्वार उघडले, ॥360॥ त्याचप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत आणि त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत; त्यांच्या घासास विश्व पुरे पडणार नाही, म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही. ॥361॥ आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा या वदनरूपी दरीत पसरली आहे. ॥362॥ प्रलयकाळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. ॥363॥ आणि ललाटरूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासच भेडसावीत आहेत, अथवा ते डोळे, महामृत्यूचे लोटच असून (भिवयांच्या – भुवयांच्या) अंधारात राहिले आहेत. ॥364॥ असे हे मृत्यूचे कौतुक धारण करून (म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून) या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहातोस, ते मला कळत नाही! परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. ॥365॥ अहो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे, तसे झाले आहे. ॥366॥ अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चयेकरून नाश पावणारच, त्याची काळजी कोणी केली आहे? परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचते की नाही, असे मला वाटू लागले आहे. ॥367॥ एऱ्हवी भयामुळे अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की, मनाला ताप होतो, अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विगलित होतो. ॥368॥ परंतु या सर्वांहून वेगळा, जो केवळ आनंदाचा अंश आहे, असा जो अंतरात्मा, त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले. ॥369॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे


