उत्तरार्ध
दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे म्हणून सदानंद हॉलमध्ये बसले होते. आज त्यांचा वाढदिवस होता, हे मुलाच्या नक्की लक्षात असेल, त्यांना खात्री होती. “तुम्ही स्वतःहून सांगू नका,” असे सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावले होते.
रीना राजच्या फोनशी खेळत होती. “आजोबा, हा फोन तुमच्याकडे ठेवा, मी आलेच,” असे म्हणत ती बाल्कनीत गेली. तेवढ्यात राज बाहेर आला आणि त्याने सदानंदांकडून फोन घेतला. फोनवर दोन मिस कॉल होते, राजच्या बॉसचे. “फोन का वाजला नाही?” राजने नीट पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की फोन म्यूटवर होता… “काय केले बाबा तुम्ही? माझी नोकरी घालवायची का तुम्हाला? अहो, तुमच्यामुळे माझे दोन महत्त्वाचे कॉल मिस झाले.” आपण काय चूक केली ते सदानंदांना समजले नाही.
जेवणानंतर गप्पा मारताना राज म्हणाला, “चार दिवसांनी नेहाचे आई-वडील येणार आहेत आणि आम्ही सर्व महाबळेश्वरला जाणार आहोत, नेहाच्या बाबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हे मी कोणालाही सांगितलेले नाही, मला नेहाच्या बाबांना सरप्राइज द्यायचे आहे. तुम्ही पण येणार का?”
हेही वाचा – मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…
सदानंद आणि सावित्रीबाईंनी महाबळेश्वरबद्दल खूप ऐकले होते, तेथे जाण्याची त्यांना तीव्र इच्छा होती, परंतु राजने विचारलेल्या प्रश्नाला, “नको बेटा, तुम्ही जाऊन या,” एवढेच सदानंद म्हणाले.
रात्रभर सदानंद आणि सावित्रीबाईंना झोप लागली नाही. आपण सकाळीच निघून जायचे, असे दोघांनी ठरविले. दोघेही सकाळी रूममधून बाहेर आले ते निघण्याची पूर्ण तयारी करूनच!
“तुम्ही जाण्याची इतकी घाई का करता आहात?” राज आणि नेहाने विचारले.
“इकडे आमचे मन लागत नाही, गावाकडची आठवण येते. चला निघतो आम्ही, तुम्ही सुखी रहा.”
“आजी-आजोबा, तुम्ही जाऊ नका ना,” रीना म्हणत होती.
“नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गाडी घेऊन जाणार आहे, नाहीतर मीच तुम्हाला बसस्टँडवर सोडले असते,” असे सांगून राज म्हणाला, “बाबा, मला नमस्कार तर करू द्या…”
“बेटा, एक काळ असा होता जेव्हा तू लहान होतास आणि आम्ही आशीर्वाद देण्याइतके मोठे होतो, परंतु काळानुरूप तू खूप मोठा झालास आणि आम्ही होतो त्याच ठिकाणी राहिलो. आमची लायकी नाही रे तुला आशीर्वाद द्यायची. चल सावित्री, आपल्याला निघाले पाहिजे, उशीर होतोय,” म्हणत दोघेही सामान घेऊन चालू लागले.
साधारणतः पंधरा मिनिटांनी नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गेली.
“रीना, तूही ये ना मला सोडायला,” मावशी आग्रह करत होती.
“नको, मला माझ्या बाबांशी खूप बोलायचे आहे,” रीना म्हणाली.
राजच्या मित्राचा फोन आला. “राज, आज संध्याकाळी काका-काकूंना माझ्या घरी घेऊन ये ना. काकूंनी केलेले लाडू माझ्या बायकोला आणि मुलीला खूप आवडले. ते कसे करायचे ते माझ्या बायकोला काकूंकडून समजून घ्यायचे आहे,” राजचा मित्र सांगत होता.
“मित्रा, महत्त्वाचे काम निघाल्यामुळे ते दोघेही आत्ताच गावाकडे गेलेत,” राजने सांगितले.
“रीना बेटी, आजी-आजोबांनी लाडू आणले होते?” राजने फोन ठेवल्यावर विचारले.
“हो बाबा, आणि आजीने मला पण लाडू दिला होता, परंतु आईने मला खाऊ दिला नाही. आई म्हणाली हे लाडू काळे आहेत म्हणजे कधीचे केलेले असणार, खाऊ नकोस, तुला त्रास होईल.”
बोलता बोलता रीनाने मोबाइलबद्दल सांगितले, “आजोबांकडे पुरेसे पैसे नव्हते, मी माझ्या मनीबँकेतील पैसे आजोबांना दिले, परंतु त्यांनी ते घेतले नाहीत.”
“बाबा, हे बटन दाबल्याने काय होते? काल मी ते गंमत म्हणून दाबले होते…”
“बेटा, याने फोन म्यूटवर जातो.”
काल कॉल्स मिस झाले ते बाबांमुळे नाही तर रीनामुळे झाले होते, त्याच्या लक्षात आले. नेहाने आणि त्याने आई-बाबांना अपमानित केले होते.
“बाबा, आजोबा त्यांचे पैशांचे पाकीट घरीच विसरले,” म्हणत रीनाने कॉटवर पडलेले आजोबांचे पाकीट राजला दिले. राजने पाकीट उघडून बघितले. त्यात फक्त परतीच्या तिकिटांचे पैसे होते. म्हणजे पैसे नव्हते म्हणून आईची औषधे आणायला बाबांनी मला सांगितले असेल का? या विचाराने राज व्यथित झाला. पाकिटात एक फोटो होता— राज इंजिनीअरिंगची फायनल परीक्षा पास झाला, त्यावेळी आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतानाचा! त्याला आई-बाबांनी काढलेल्या हलाखीच्या दिवसांची आठवण झाली आणि पश्चाताप झाला आईवडिलांशी इतके निष्ठुर वागल्याचा…
पैशांचे पाकीट घरी राहिले मग आई-बाबा बसस्टँडवर कसे गेले असतील? रिक्षाचे पैसे त्यांनी कसे दिले असतील? “रीना बेटा, चल आपण बसस्टँडवर जाऊया.” राज आणि रीना बिल्डिंगच्या गेटपाशी आले, तेव्हा बिल्डिंगमध्येच राहणाऱ्या त्याच्या मित्राची गाडी आत शिरली आणि त्याने सांगितले, “राज, मी माझ्या आई-बाबांना सोडायला बसस्टँडवर गेलो होतो. त्यावेळी मी तुझ्या आई-बाबांनाही बसस्टँडवर सोडले.”
“थँक्स मित्रा,” राज म्हणाला.
म्हणजे बाबांना पाकीट घरी राहिल्याचे तेव्हाच समजेल, जेव्हा ते कंडक्टरकडे बसचे तिकीट मागतील. आता काय करायचे? राजला कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता. एक-दीड तास झाला तरीही आई-बाबा घरी परत आले नव्हते, म्हणजे कदाचित आईकडे पैसे असतील आणि त्यातून त्यांनी बसचे तिकीट काढले असेल, असा विचार करत राज निश्चिंत झाला.
संध्याकाळी राजला एका अनोळखी नंबरवरून फोन आला… “राज मित्रा, मी एसटीत कंडक्टर आहे. तुझे आई-बाबा माझ्याच बसमध्ये होते. त्यांच्याकडून मी तुझा नंबर घेतला. पाकीट घरी राहिल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते, परंतु मी त्यांना तिकीट दिले आणि सांगलीला पोहोचल्यावर त्यांना घरापर्यंत पोहोचवले. तू अजिबात काळजी करू नकोस.”
राजसाठी हा सुखद धक्का होता. “मित्रा, मी किती पैसे पाठवू?” राजने विचारले. “छे छे, पैसे नको पाठवूस. राज, अरे काका-काकूंनी किती प्रेम दिले आहे मला. थोडंसं त्यांच्यासाठी करायला मिळाले, हे माझे केवढे मोठे भाग्य.”
माझ्या आई-बाबांशी केवढ्या आपुलकीने वागले माझे मित्र आणि मी किती चुकीचा वागलो, राजला स्वतःचीच लाज वाटली.
ठरल्याप्रमाणे नेहाचे आई-वडील आले. राज त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला गेला, परंतु त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. महाबळेश्वरहून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज त्याच्या गावाकडे आला. घरी पोहोचल्यावर अनेकदा बेल वाजूनही दार उघडले नाही, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, घराला बाहेरून कुलूप लावले आहे. आई-बाबा कुठेतरी बाहेर गेले असतील, आपण इथेच थांबावे, असा राजने विचार केला… तेवढ्यात त्याचे लक्ष दरवाजावर लावलेल्या एका कागदावर गेले. त्या कागदावर लिहिले होते, “हे घर बँकेने जप्त केले आहे, बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे.”
गेल्या तीन महिन्यांत दोनदा बँकेची नोटीस आली होती सदानंदांना, परंतु ते पैसे उभे करू शकले नाहीत. अंतिम नोटीस आली— “पैसे भरले नाही तर जप्ती येईल,” असे स्पष्ट शब्दांत सांगणारी. म्हणूनच सदानंद आणि सावित्रीबाई राजकडे पैसे मागायला म्हणून आले होते. सुनेनेच नाही पण मुलानेदेखील अपमान केला म्हणून त्यांनी जप्ती टाळण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विषयच काढला नाही आणि रिकाम्या हाताने ते घरी परतले… आलीया भोगासी असावे सादर हे मनोमनी ठरवून.
खरंतर, राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा, अतिशय हुशार. शिक्षण होताच चांगली नोकरी मिळाली आणि साहेबांच्या मुलीच्या प्रेमात पडला. साहेब खूप श्रीमंत, गाड्या नि बंगलेवाले पण पारसी. राजचे आई-बाबा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. मुलाने पारसी मुलीशी लग्न करायचे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी कडाडून विरोध केला, पण राज मागे हटला नाही. सदानंद आणि सावित्रीबाई दुखावले गेले, त्यांनी मुलाशी संबंध तोडले. नातीच्या जन्माने पुनर्मिलन झाले, त्यांचे राजकडे येणे-जाणे सुरू झाले, परंतु राज आणि नेहाच्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल राग होता.
राज त्वरित बँकेत गेला. “किती कर्ज बाकी आहे? हे कर्ज कधी घेतले होते?” त्याने विचारणा केली. सदानंदांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते आणि त्यातील 75,000/- रुपये अजून बाकी होते. पंधरा वर्षांपूर्वी, म्हणजे राजने पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजला अॅडमिशन घेतली त्यावेळी त्याच्या बाबांनी ते कर्ज काढले असावे. बाबा कधी बोललेही नव्हते याबद्दल. राजने त्वरित 75,000/- रुपये बँकेला ट्रान्सफर केले आणि म्हणाला, “मला आमच्या घराची किल्ली द्या.”
“मी तुम्हाला किल्ली देऊ शकत नाही.”
“साहेब, मी पैसे ट्रान्सफर केलेत ना, बघा, चेक करा, तुम्हाला ते मिळालेत ना?”
“पैसे मिळालेत. तुमच्या वडिलांवर आता कर्ज बाकी नाही, असे लेटर मी तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या, मी त्यांना घराची किल्ली देईन.”
हेही वाचा – प्रत्येक घराचा ‘आधारवड’!
“साहेब, पण ते कोठे आहेत हे मला माहीत नाही!”
“तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वडिलांना आणा, नाहीतर त्यांचे डेथ सर्टिफिकेट आणा.”
“साहेब, काय बोलतात? अहो ते जिवंत आहेत, फक्त ते कुठे आहेत ते माहीत नाही.”
“मग शोधा त्यांना,” म्हणत मॅनेजर साहेब दुसऱ्या कामात गर्क झाले.
राजला विश्वास आहे आई-बाबा मिळतील, त्याच्या चुका विसरून ते त्याला मोठ्या मनाने माफ करतील. तो आई-बाबांचा शोध घेतो आहे, परंतु अजूनही त्यांचा पत्ता त्याला लागला नाही आणि यापुढेही पत्ता लागेल, याची खात्री नाही.
काय आश्चर्य आहे ना! ते समोर होते तेव्हा नकोसे वाटत होते आणि आता नजरेसमोरून गेलेत तर हवेसे वाटतात.
शेवटी काय तर? —
कालाय तस्मै नमः


