दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 मार्च 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 08 चैत्र शके 1948; तिथि : एकादशी 07:46; नक्षत्र : आश्लेषा 14:37;
- योग : धृति 18:19; करण : बव 19:25;
- सूर्य : मीन; चंद्र : कर्क 14:37; सूर्योदय : 06:37; सूर्यास्त : 18:51;
- पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
कामदा एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – कृष्ण होणे एवढेही कठीण नाही
दिनविशेष
प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले
टीम अवांतर
प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक म्हणून ओळखले जाणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाली. त्यांचे शालेय शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत तर, महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेमध्ये मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी कुलपतीच्या सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले. 1980मध्ये यु. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर पीचडी मिळवली.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी कविता, कथा, कादंबरी, समीक्षण असे सर्व साहित्य प्रकार हाताळले. मूड्स, दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू हे त्यांचे कवितासंग्रह तर, कर्फ्यू आणि इतर कथा, रक्त आणि पाऊस, संदर्भ, काळोखाचे पडघम, देवाचे डोळे, राजधानी हे त्यांचे कथासंग्रह आहेत. कवीची गोष्ट आणि सावित्रीचा निर्णय या त्यांनी लिहिलेल्या दीर्घ कथा त्या काळात खूप गाजल्या. या दरम्यान त्यांच्या गांधारीचे डोळे आणि मध्यरात्र या कादंबऱ्या तसेच इतर बरेच ललित साहित्य प्रकाशित झाले. साहित्याचा अन्वयार्थ, आधुनिक मराठी कविता, नवकथाकार शंकर पाटील, ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ आहेत.
हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे
सन 1971 ते 1977 या काळात त्यांनी बीड येथील महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम केले. तर 1977 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. 2005 ते 2010 या काळात कोत्तापल्ले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी या संस्थांसह राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बाल पुरस्कार समिती आणि राज्य शासनाची भाषा सल्लागार समिती यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. याशिवाय मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाहकपदही त्यांनी सांभाळले. त्यांची ‘मूड्स’, ‘सुंदर दिवसासाठी’, ‘संदर्भ’, ‘गांधारीचे डोळे’ ही पुस्तके महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांची मानकरी ठरली. याशिवाय, न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार, परिमल पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. श्रीगोंदा येथे 1999 साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच, 2012 साली चिपळूण येथे झालेल्या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 30 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.


