सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
तूं या कालयंत्रासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री । तूं ब्रह्मकटाहधात्री । हें कळलें फुडें ॥152॥
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा । असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥13॥
पैं आणिकही एके परी । इयेचि प्रतीतीची येतसे थोरी । जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें ॥153॥ परि तया सांगितलियाचें साचपण । हें आतां माझें देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ॥154॥ एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये । तोही ऐसेंचि वचनें गाये । परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ॥155॥ हां गा आंधळ्यांचां गांवीं । आपणपें प्रगटलें रवी । तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा ॥156 ॥ येरवीं देवर्षिही अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसीं जे मधुरता । तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांहीं ॥157॥ पैं असितादेवलाचेनिहि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें । परि तैं बुद्धि विषयविखें । घारिली होती ॥158॥ विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू । विषय तो गोडू । जीवासी जाहला ॥159॥ आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदा सांगिजे ॥160॥ परि तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणोनि ॥161॥ तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा ॥162॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड…
अर्थ
तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस! तू जीवितास आश्रयस्थान आहेस. तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस, हे मला निश्चित समजले. ॥152॥
(वरीलप्रमाणे) सर्व ऋषी, देवर्षी नारद, तसेच असित, देवल आणि व्यास म्हणतात आणि तू स्वत: देखील असेच सांगतोस. ॥13॥
आणखीही एक प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा कळून येतो. कारण की, मागे मोठ्यामोठ्या ऋषींनी याप्रमाणे तुझे वर्णन केले होते. ॥153॥ परंतु त्यांनी सांगितलेल्याचा खरेपणा (माझ्या) मनाला हा आता पटत आहे. कारण देवा, आपण कृपा केली म्हणून हे होत आहे. ॥154॥ एरवी देव आणि ऋषी असलेले नारद आमच्याकडे नेहेमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत; परंतु त्याचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही (नुसत्या) गाण्याचा आनंद अनुभवीत होतो. ॥155॥ हे देवा, आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वत: प्रगट झाला, तर त्यांना त्याच्या (फक्त) उष्णतेचाच अनुभव येणार. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्यांना अनुभव कोठचा? ॥156॥ एरवी देवर्षी नारदही अध्यात्मपर गाणी गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागांत असणारी वरवरची मधुरता, तीच काय ती आमच्या अनुभवाला येत होती. त्यावाचून चित्ताला त्या गाण्यांपैकी दुसरे काही कळत नव्हते. ॥157॥ त्याचप्रमाणे असित आणि देवल या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप ‘असे आहे’ म्हणून मी ऐकले. परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. ॥158॥ विषयरूप बिषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की, वस्तुत: गोड असलेला जो परमार्थ, तो त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो आणि स्वाभाविक कडू असलेले शब्दादिक जे विषय, ते प्राण्यांना गोड वाटतात. ॥159॥ आणखी दुसर्याचे हे कशाला सांगू? व्यासदेवांनी आपण स्वत: आमच्या राजवाड्यात येऊन नेहेमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे ॥160॥ परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होय. परंतु तो चिंतामणी नाही, अशा समजुतीने जसे त्याविषयी उदास व्हावे आणि मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे, म्हणून ओळख पटावी, ॥161॥ त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे या माझ्यापाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या; परंतु कृष्णा, तू जो सूर्य, त्या तुझा उदय न झाल्यामुळे, त्यांचा अनादर केला जात होता. ॥162॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें…


