भाग – 18
आराध्याने आपल्या हातातला बॉक्स दादा गुरुजींसमोर धरला. गुरुजी म्हणाले, “तू कुणालाही या बॉक्सबद्दल काहीही सांगायचं नाही. जरी विश्वासू वाटले तरी नाही. काहीही झालं, कोणी कितीही विचारलं, भीती घातली तरी… शांत राहायचं. वेळ आली की, मी स्वतः तुला सांगेन — कधी, कसे आणि कुठे हा बॉक्स शर्वायच्या हाती द्यायचं.”
आराध्या गप्प झाली. गुरुजींच्या चेहऱ्यावरचा गहन गंभीर भाव तिला समजावून सांगत होतं की, हा खेळ फार मोठा आहे!
गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात आशीर्वाद दिला… “देव तुझं रक्षण करो. तुला धैर्य आणि चातुर्य देवो.”
आराध्याने डोळे मिटले. त्या क्षणी तिला जाणवलं — आता तिचं आयुष्य आधीपेक्षा वेगळं वळण घेणार आहे.
त्या दिवसापासून आराध्या सावध झाली होती. ती घरात वावरताना अगदी सावधपणे वागत होती. सुमित्रा आजींच्या घरातील वातावरण शांत होतं, पण त्या शांततेतही कुठेतरी एक अदृश्य अस्वस्थपणा मिसळलेला होता.
माधव मात्र गुपचूप तिच्या हालचालीवर लक्ष ठेवत होता. तो जाणून गेला होता की, आराध्याच्या जवळ काहीतरी महत्त्वाचं आहे! रात्रीच्या वेळी, अंधारात तो तिच्या खोलीबाहेर दबकत उभा राहत होता… आवाज न करता तिच्या दरवाज्याकडे पाहात राहायचा. एका रात्री, आराध्या झोपलेली असताना, अचानक तिला बारीकसा आवाज आला, जणू कुणीतरी हळुवारपणे तिच्या खोलीचा दरवाजा ढकलत होतं. ती घाबरली… क्षणात तिला गुरुजींच्या शब्दांची आठवण झाली — “कोणावरही विश्वास ठेवायचा नाही.”
हेही वाचा – आराध्याला घरी आणण्याचा सुमित्रा आजीचा पूर्वनियोजित प्लॅन!
आराध्या गुपचूप उठली आणि बेडखाली ठेवलेली त्या बॉक्सची छोटीशी पिशवी घट्ट धरली आणि दाराबाहेरची चाहूल घेऊ लागली… दरवाजा किंचितसा उघडला… पण समोर कुणी नव्हतं, फक्त काळोख आणि एक सावलीसारखा थरथरणारा हलकासा आकार… तेवढ्यात, एक प्रकाशाची क्षीण रेषा तिच्या कपाटावर पडली… आराध्या धडधडत्या काळजाने पुढे झाली. कपाट उघडताच तिथे एक लहानसा कागदाचा गोळा दिसला — जणू कोणीतरी ठेवून गेला होता. तिने थरथरत तो उचलला… त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं :
“वेळ फार थोडा आहे. जे तुला सांभाळायचं आहे, ते फक्त विश्वासाने सांभाळ.”
आराध्याच्या हातातून कागद खाली पडला. ती चटकन मागे फिरली. तिला जाणवलं, ती एकटी नाही. त्या अंधारात कोणीतरी अजूनही तिच्याकडे पाहात होतं…
पहाटेचा गारवा हवेत पसरलेला होता. आराध्या संपूर्ण रात्र घाबरलेली, अस्वस्थ होती. पहाटेच तिने स्वतःला सावरलं आणि गुरुजींकडे धाव घेतली…
गुरुजी आपल्या नेहमीच्या जागेवर ध्यानस्थ बसले होते. त्यांना आराध्याच्या घाईघाईने पडणाऱ्या पावलांचा आवाज येताच त्यांनी डोळे उघडले. आराध्या जवळ जवळ रडवेल्या स्वरात सगळा रात्रीचा प्रकार सांगत होती — दार उघडणं, सावली दिसणं, कपाटात सापडलेला तो अज्ञात इशारा…
गुरुजी शांतपणे तिचं सगळं ऐकत राहिले… शेवटी मंद हसत त्यांनी तिला शांत केलं,
“आराध्या, घाबरायचं नाही. तुझं काहीही वाईट होऊ देणार नाही. तुझ्यावर एक अदृश्य संरक्षण आहे. पण…”
ते थोडं थांबले आणि गंभीर स्वरात म्हणाले, “आता वेळ आली आहे की, तू काही काळासाठी तुझ्या घरी परत जावं. मी स्वतः सुमित्रा मावशींना सांगतो. तू निश्चिंत राहा.”
आराध्या थोडी बावरलेली होती, पण गुरुजींच्या शब्दांत एक असा भारदस्त आत्मविश्वास होता, ज्याने तिच्या मनाला थोडं समाधान मिळालं.
गुरुजींनी तिला एक छोटंसं लॉकेट दिलं आणि म्हणाले, “हे आपल्या जवळ ठेव… तुला असं वाटलं की, संकट जवळ आलंय, तर फक्त डोळे मिटून मला आठव. मदत ताबडतोब पोहोचेल.”
आराध्याने दोन्ही हातांनी ते लॉकेट धरून गुरुजींना वाकून नमस्कार केला. तिच्या मनात एक नवं बळ संचारलं होतं… जणू आता ती एकटी नव्हती.
त्या दिवशी सुमित्रा आजींनी आपल्या जुन्या सखीला — लक्ष्मीला खास बोलावलं होतं. लक्ष्मी खूप वर्षांनी त्यांच्या घरी येणार होती, त्यामुळे आजींचा चेहरा विशेष उजळलेला होता. लक्ष्मीबरोबर प्राजक्ताही आली होती, कारण सुमित्रा आजींचं बोलावणं तिला टाळता येणारच नव्हतं. पण आश्चर्य म्हणजे, सगळ्यांच्याच मागे निशाही स्वतःहून त्यांच्याबरोबर निघाली होती!
तिला आतून एक वेगळीच उत्सुकता होती — “ही म्हातारी असं काय करतेय? कोणते गुरुजी? कसले सल्ले?” हे सगळं तिच्या डोक्यात वादळासारखं घोंगावत होतं.
गाडी सुमित्रा आजींच्या प्रशस्त घराजवळ थांबली तेव्हा निशाने अवाक् होऊन पाहिलं… इतकं मोठं, देखणं घर! बाहेरून दगडी काम केलेलं, सुंदर बागेने भरलेलं अंगण आणि वातावरणात एक वेगळीच शांत, गांभीर्य जाणवत होतं. तिच्या मनात असूयेची लहर उठली —
“ही म्हातारी कशी काय एवढ्या मोठ्या घरात राहतेय आणि आम्हाला उपदेश देते?”
लक्ष्मी आणि प्राजक्ता तर आत गेल्या. सुमित्रा आजी आनंदाने त्या दोघींना भेटत होत्या, प्राजक्ताला त्यांनी जवळ घेतलं. निशा मात्र दारातच उभी राहून घराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे संशयाने पाहत होती — आता जणू एखादं रहस्यच उलगडेल!
आजींनी तिला पाहिलं आणि सौम्य हसत म्हणाल्या, “अगं निशा, आत ये. आपलंच घर आहे, कसला संकोच?”
निशा मात्र चेहऱ्यावर कृत्रिम हसू आणून आत गेली. तिच्या मनात विचारचक्र सुरू होतं — “इथं काहीतरी गुपित आहे. या म्हातारीवर विश्वास नाही.” त्या घरातल्या गूढ शांततेने आणि आजींच्या निरागस हसण्यात लपलेल्या दृढतेने निशा आणखीनच अस्वस्थ होत गेली. तिला अजिबात कल्पना नव्हती की, ती स्वतःहून एका मोठ्या रहस्याच्या जवळ येऊन पोहोचली आहे. निशा अजूनही घराची भव्यता आणि आजूबाजूची गूढ शांतता जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. तिची नजर जिथे जिथे फिरत होती, तिथे काहीतरी गुप्त शोधण्याचा प्रयत्न सुरू होता.
तेवढ्यात एका कोपऱ्यात उभा असलेला माधव सगळं बारकाईने पाहात होता. त्याने निशाच्या चोरट्या चमकदार नजरेला झटकन ओळखलं. तो मनातून सुखावला… “ही तर तयार सापडली… नशिबानं एक प्यादं मिळालं!”
त्याच्या डोक्यात विचार सुरू होते — आराध्याच्या जवळ काहीतरी मौल्यवान वस्तू आहे, याची त्याला कल्पना होती. पण ती सरळपणे आराध्याकडून मिळवणं शक्य नव्हतं. आता मात्र निशाचा लोभ, तिची असूया, तिचा स्वार्थी स्वभाव पाहता, माधवला वाटलं, “ही बाईच आराध्याच्या भोवती दबाव टाकून, गोड बोलून किंवा डिवचून, तिच्याकडून ते मिळवू शकेल.”
माधवने कट रचायला सुरुवात केली. तो सहज निशाच्या दिशेनं गेला आणि स्मित करत म्हणाला, “काय वहिनी, आपल्यालाही या घरात काहीतरी गुपित वाटतंय ना? तुम्ही आणि मी दोघं मिळून थोडं लक्ष ठेवलं तर काय वाईट आहे?”
निशाला त्याच्या बोलण्यात आपलंच प्रतिबिंब जाणवलं. तिचा चेहऱ्यावरचा ताण थोडासा मोकळा झाला… “हो ना, असंच काही वाटतंय…” निशा म्हणाली, थोड्या संकोचाने पण आतून समाधानाने.
माधवने मग सावधपणे चाचपणी सुरू केली… “अगदी योग्य वेळ आली की, मी तुम्हाला काहीतरी मोठं दाखवीन… पण त्यासाठी थोडं संयम ठेवायला लागेल… आणि आराध्याच्या जवळ काही असेल तर, ते आपल्या बाजूला असायलाच हवं, हो ना?”
निशाच्या मनात स्वार्थाची ठिणगी पेटली होती. तिला अजूनही समजत नव्हतं की, आपण नकळतपणे एका धोकादायक जाळ्यात अडकत चाललो आहोत… त्या क्षणापासून निशा जणू आराध्याच्या मागे हात धुऊन लागली होती.
कधी मधुर शब्दांत, तर कधी टोमणे मारत ती आराध्याच्या भोवती घुटमळायला लागली… “काय गं आराध्या, इकडे आल्यावर काही नवीन सापडलं का? घर तर मोठं आहे, काहीतरी मौल्यवान गुपित असतीलच ना?”
निशा नकळत आराध्याच्या मनात संशय निर्माण करायचा प्रयत्न करायची. पण आराध्या आता सावध झाली होती. गुरुजींनी दिलेली सूचना — “काहीही झालं तरी कुणाकडे उगाच काही सांगायचं नाही” — तिने मनावर कोरून घेतल होतं. ती आता निशाच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करत होती.
दुपारी निशा आणि माधव एकांतात भेटले… माधवने निशाला अधिक फितूर केलं… “आराध्याच्या जवळ काहीतरी आहे… तिने काही सापडलंय. ते आपल्याला मिळालं तर आपलंही नशीब बदलू शकतं… पण तिला गोड बोलून फसवायचं, लक्षात ठेव.”
निशा तर स्वप्नात रंगली होती… तिला वाटू लागलं, “आपण जर ते गुपित मिळवलं तर आराध्या आणि प्राजक्ता दोघींवर वरचढ होऊ…”
त्याच रात्री… सगळं घर शांत होतं… आराध्या आपल्या खोलीत बसून गुरुजींनी दिलेल लॉकेट सावधपणे एका छोट्या रुमालात गुंडाळत होती… तेवढ्यात दबक्या आवाजात तिच्या दाराजवळ हालचाल झाली… आराध्या एकदम सावध झाली, तिने पटकन लॉकेट उशाखाली लपवलं आणि स्वतः झोपेचं नाटक करू लागली.
हेही वाचा – आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?
दार थोडसंच उघडलं गेलं… निशाचा चेहरा दिसला… ती हळूच आत आली अन् आराध्याच्या जवळ वाकून पाहू लागली. आराध्याचं हृदय जोरात धडधडत होतं… पण तिने डोळे घट्ट मिटले आणि श्वास स्थिर ठेवला. निशा हळुवारपणे तिच्या उशाखाली हात घालण्याचा प्रयत्न करत होती — तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली.
खिडकीतून अचानक थंड वाऱ्याचा जोरदार झोत खोलीत घुसला, आराध्याच्या बेडशेजारी ठेवलेला दीपस्तंभासारखा एक मोठा दिवा अचानक खाली कोसळला — जोरात आवाज झाला!
निशा घाबरली, ताडकन मागे झाली… आणि तितक्यात आजींच्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला… ती घाबरून धावतच बाहेर पडली…
क्रमशः


