द. मा. मिरासदारांनी अनेक विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांनी ललित लेखन, वगनाट्य, नाटिका, चित्रपटाचे संवाद या सर्व साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं आहे. व्यंकूची शिकवणी ही त्यांची गाजलेली कथा. माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म आणि हुबेहूब हे विनोदी कथासंग्रह मला आवडतात. त्यांच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. माणसाच्या रूपाचे वर्णन करताना ते गमतीदार शब्द वापरतात. उदा. नानाचे नाक नम्रपणे खाली वाकलेले असून टोकाशी फुगा आला होता. ते नम्रपणे हा शब्द असा वापरतात की, वाचताना प्रत्येक वेळी हसू येते. समाजातल्या कुरीती, अंधविश्वास आणि माणसाच्या स्वभावातले दोष यावर मार्मिक टिप्पणी करत ते कथा लिहितात. कोणीतरी आपली चूक दाखवून टपली मारावी तसेच!
‘भुताचा जन्म’ या कथासंग्रहात अकरा कथा आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या कथा आहेत. त्यांची विशिष्ट अशी मिश्किल शैली आहे. ते गांभीर्याने बोलत आहेत, असं वाटतं आणि मग त्यातला विनोद लक्षात येतो. उदा. भुताचा जन्म या कथेची सुरुवात करताना ते लिहितात, ‘गुंडगळ्याचा माळ भुताचा जन्म होण्याच्या दृष्टीने अजिबात सोयीचे ठिकाण नव्हते. कुठे जन्म घ्यावा हे कुणाच्याच हातात नसते. कुठल्याही शहाण्या भुताने अशा ठिकाणी जन्म घेतला नसता’ आणि इथून कथा रंगायला सुरुवात होते. उत्सुकता वाटत राहते आणि हसूही येत राहतं. माणसाच्या स्वभावातल्या विसंगती त्यांनी बरोबर टिपल्या आहेत. पहलवान माणूस आणि काळीज सशाचे अशीही विसंगती, ते दाखवून देतात. ‘नदीकाठचा प्रकार’ कथेतून माणसे सगळीकडे सारखीच स्वार्थी असतात, हे दाखवून देताना आपल्याला हसायला लावतात. ‘भवानीचा पक्षकार’ ही एका नव्या वकिलाची कथा. पहिली वहिली केस मिळाल्यावरचा त्याचा उत्साह दाखवताना शेवट धक्कादायक होतो आणि हसू फुटते. ‘भिमूच्या कोंबड्या’ ही विलक्षण कथा आहे. कोंबड्यांचा धंदा कोणी असा करू शकेल, असं मनातही येणार नाही. ‘कंटाळा’ या कथेत कंटाळा करणाऱ्या आळशी माणसाचे वर्णन करताना ते लिहितात, ‘तसा तो हुशार होता. मनात आणले तर एखाद्याला ज्या कामाला दिवस लागेल तो ते दोन तासांत करून दाखवेल; पण तो मनात आणतच नसे.’
हेही वाचा – बोल माधवी…; मनात चाललेले महाभारत!
‘पंचाक्षरी’ कथेत तात्याला मांत्रिक व्हायचे असते. त्याला विंचवाचे विष उतरवायची सिद्धी मिळालेली असते. तो आपले स्वप्न कसे पूर्ण करतो, ते या खुमासदार कथेत लिहिले आहे. ’आमच्या स्वयंपाकीण बाईंचा नवरा’या कथेत तर स्वयंपाकीण बाईची चतुराई सांगताना गांभीर्याचा आव आणला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता राहते. ‘ऊब’ ही एका न्हाव्याची कथा आहे. न्हाव्याला ग्राहकाच्या कानाला लागून बातम्या सांगायची सवय असते, या सवयीवर ही कथा आहे. ‘सोळा आण्याचा वतनदार’ या कथेत पैसा नसल्यामुळे मुलांचे लग्न करू न शकणारा गावचा कुलकर्णी काय शक्कल लढवतो, ते दाखवले आहे. ‘उपद्व्याप’ कथेत उपद्व्याप करून शाळेत सर्वांच्या नाकी दम आणणाऱ्या मुलाचे एक दिवस मुख्याध्यापक कौतुक करतात. त्यासाठी कारणच तसे घडते! ‘निरोप’ कथेत पाटील बायकोच्या बाळंतपणासाठी तालुक्याहून डॉक्टर बाई आणायला गड्याला पाठवतो आणि गडी कंटाळा करत उशीर करतो… कथेचा शेवट अनपेक्षित आहे.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
मुखपृष्ठावर भुताचा नख वाढलेला, लांबलचक बोटे असलेला पंजा आणि घाबरून पळणारा माणूस आहे. या आधीच्या आवृत्तीत धोतर नेसलेला हात पाठी करून काठी धरून चालणारा खेडूत दाखवला होता. शि. द. फडणीसांची शैली ओळखू येते…
त्यांच्या कथांत गावातली माणसे प्रामुख्याने दिसतात. कथेतल्या वर्णनामुळे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मोकळा माळ, देऊळ, वडाचे झाड, त्याभोवतीचा कट्टा, जमलेले गावकरी वगैरेची आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे कथेत रमून जातो. कुठेही अपशब्द न वापरता मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद. गालातल्या गालात हसवणारा, प्रसन्न करणारा…
हे पुस्तक कधीही कपाटातून बाहेर काढावे आणि वाचावे असे आहे.


