खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि टवटवीत ठेवायला मदत करत असतो. जसं घराला देण्यात येणारा रंग किंवा कपड्यांच्या रंगाबाबत आपण बोलतो की, या रंगासोबत हा रंग खुलून दिसेल किंवा हा रंग या रंगाबरोबर चांगला दिसतो वगैरे… तसंच आपल्या माणसांचं पण असतं, असं मला वाटतं. काही माणसं त्यांच्या स्वभावामुळे, वागण्याबोलण्यामुळे आपलं लक्ष चटकन् वेधून घेतात. त्यांच्या सहवासात घालवलेला वेळ दीर्घकाळ आपल्या स्मरणात रहातो. त्यांच्यासोबत काही गोष्टी गंमत म्हणून करून बघायची हिंमत आपण करतो!
तोही असाच आहे. एका वेगळ्या वळणावर मला भेटलेला… मनमोकळ्या स्वभावाचा, मिश्किल आणि आमच्यातील वयाचं भलं मोठं अंतर विसरून सतत खोड्या काढत मला पोट दुखेस्तोवर हसवणारा! पण तितकाच माझी काळजी घेणारा… खरंच, गतजन्मीची पुण्याई म्हणूनच अशी माणसं अचानक तुमच्या आयुष्यात येतात, या गोष्टीवरचा माझा विश्वास ठाम झाला, जेव्हा सहा वर्षांपूर्वी हा भेटला मला अचानक! एकमेकांना समजून घेताना आमच्यात कुरबुरी आणि भांडण जरूर झाली. पण आज मात्र आमची मैत्री इतकी छान आहे की, त्याला जवळून बारकाव्यासहीत ओळखणारे त्याचे तरूण मित्र “काका, तुम्ही कसं काय ॲडजस्ट केलंत याच्याबरोबर?” असं म्हणून माझंच कौतुक करतात.
पण ते काही असो. परमेश्वराने आपल्या आयुष्यात काही माणसांची एंट्री सहेतूक केलेली असते, एवढं मात्र नक्की!
तो आज सकाळी व्यावसायिक कामानिमित्त मुंबईबाहेर जायचा होता, भल्या पहाटेच्या विमानाने. आजकाल विमानतळावर दोन-तीन तास तरी आधी पोहोचावे लागते. मी विमानतळाजवळ रहात असल्याने त्याला काल दुपारी मेसेज केला होता की, माझ्या घरी मुक्कामाला येणार असल्यास कळव. त्यांचं उत्तर आलं, ‘बायकोला विचारून कळवतो.’ यावर मी चिडवलं तर, मिश्कीलपणे मला म्हणाला, ‘काका, तुम्हाला माहीत नाही दहशत असते ती लग्न झाल्यावर. काय काय सहन करावं लागतं विचारा तुमच्या लग्न झालेल्या मित्रांना!’ अर्थात, याचा एकंदरीत स्वभाव बघता हा काही सहन करत असेल, यावर कोणाचाही किंचितही विश्वास बसणार नाही हेही तितकंच खरं…
हेही वाचा – गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले…
संध्याकाळी जणू काही लढाईच जिंकल्यासारखा त्याचा मेसेज आला, “परवानगी दिली बायकोने पण मी जेवून निघेन तुमच्याकडे यायला…”
तो रात्री 12.30 ला आला आणि पहाटे 3.30 ला गेला. तो आल्यावर जेमतेम 15 मिनिटे आम्ही गप्पा मारत बसलो आणि नंतर झोपलो. तो निघताना त्याच्या हातावर चिमूटभर साखर ठेवली (तो दही खात नाही म्हणून) आणि म्हणालो, “येत जा असाच अधूनमधून. खूप बरं वाटलं मला तू आलास म्हणून.”
हेही वाचा – आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…
पण 15 मिनिटांच्या त्या गप्पा मला भरभरुन आनंद आणि समाधान देऊन गेल्या. तो आनंद आणि ते समाधान मला आजपासून पुढे कित्येक दिवस टवटवीत ठेवेल एवढं निश्चित.
काही व्यक्तींचा तो सहवास
वाटे मज असावा बारमास
आयुष्याच्या दरवाजावरची
नात्यांच्या दिव्यांची आरास…
आनंदी अन् समाधानी अशी
जीवनाची ती व्हावी दिवाळी
शेवटच्या श्वासापर्यंत टिकावी
अशी अतूट मैत्रीची रांगोळी…
प्रेमाचा आणि आपुलकीचा
खायला मिळावा सदैव फराळ
घट्ट आधाराचा देखणा कंदील
उंच टांगलेला तो सर्वकाळ…
फुटू दे फटाके अधूनमधून
मतभेदाचे अन् भांडणाचे
पण गोडी वाढवती मैत्रीची
लावलेले ते अनार समजुतीचे…
अशीच असू दे अविस्मरणीय
कायम दिवाळी आमच्या मैत्रीची
त्या प्रवासातच होऊ दे माझ्या
कधीतरी ती इतिश्री जीवनाची…


