आराधना जोशी
आम्ही मूळचे जळगावचे. पण बाबांच्या नोकरीमुळे मुंबईत लहानाचे मोठे झालो. रेल्वेच्या नोकरीमुळे मुंबईतल्या मुंबईतही घरं बदलावी लागली. मात्र ही सगळी घरं, मुंबईत जास्त पाऊस पडल्यावर ज्या ज्या सखल भागात पाणी साठतं, तिथल्या परिसरात होती. उदाहरणार्थ, ग्रान्ट रोड, माटुंगा रोड… त्यामुळे आईची पावसाळ्यासाठीची तयारी कायम लक्षात राहिली. आज माझ्या संसारात ती कायम मदतीला येते.
- पावसाळ्याच्या किमान चार महिने दुधाची पावडर घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला तरी घरी एक पर्याय तयार असेल. मी पण आता पावडर आणून ठेवते. पण त्याच्या बरोबरीने रेडिमेड चहाची पाकिटंही भरून ठेवते. (नवऱ्याचा आग्रह)
- अमावस्या, पौर्णिमा असतील तर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे घरात कांदे, बटाटे, मिरच्या, कोथिंबीर, एखाद-दोन पटकन खराब न होणाऱ्या भाज्या, कणिक आणि डाळ, तांदूळ भरलेले असलेच पाहिजेत. संपलं की आणू, यापेक्षा संपायला आलं की, लगेच आणू यावर तिचा कटाक्ष असे. त्यामुळे ती सवय आज मलाही लागली आहे.
- पावसाळ्यात पाणी साठल्यावर घराला होणारा पाणीपुरवठा ठप्प होतो. यासाठी कायम जास्तीचं पाणी भरून ठेवायचं. त्यामुळे सलग दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा झाला नाही तरी त्यावाचून आपलं अडणार नाही. वॉशिंग मशीनचा वापर बंद करायचा.
- युद्धसज्जता जशी करावी लागते, तशी पावसाळा सज्जताही करावी लागते. त्यामुळे मोबाइल पूर्ण चार्ज करून ठेवायचा. पॉवर बॅंक, घरातील रेडिओ, बॅटऱ्या पूर्ण चार्ज करून ठेवायच्या. बॅटरी सेल आणून ठेवायचे.
- घरात इन्व्हर्टर असला तरी तो गरज असेल तरच वापरायचा. त्यामुळे चार-पाच दिवस लाइट नाहीत, अशी परिस्थिती उद्भवलीच तरी, मोबाइल चार्ज करायला आणि रात्री स्वयंपाक करताना, जेवताना इन्व्हर्टर वापरता येतो.
त्यामुळे एरवी पावसाळ्यात कामानिमित्त घराबाहेर पडण्यासाठी छत्री किंवा रेनकोट, पावसाळी चपला किंवा बूट याची खरेदी केली जाते. तशीच सज्जता घरी अडकून पडल्यावर करणे आवश्यक आहे.
हेही वाचा – गोष्ट माझ्या शिरा आजीची