दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 4 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 25 मे 2025
वार : रविवार
तिथि : त्रयोदशी 15:52
नक्षत्र : अश्विनी 11:12
योग : सौभाग्य 11:06
करण : विष्टी 26.02
सूर्य : वृषभ
चंद्र : मेष
सूर्योदय : 06:01
सूर्यास्त : 19:09
पक्ष : कृष्ण पक्ष
मास : वैशाख
ऋतू : वसंत
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
शिवरात्री
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
व्यायामविद्येचे जनक माणिकराव
आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे जनक गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1878 रोजी बडोदे येथे झाला. वस्ताद जुम्मादादांचे शिष्य आणि अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव असा त्यांचा लौकिक होता. माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक तसेच शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, लकडी, बनेटी, जोडी, असे देशी खेळ आणि त्याच्या जोडीला व्यायाम प्रकारांचे शास्त्र निर्माण करून माणिकरावांनी याला सांघिक व्यायामाचे स्वरूप प्राप्त करून दिले. दोन्ही राज्यांचा विचार करता, सैनिकी संचलन तसेच कवायतींसाठी त्यांनी हिंदी आज्ञाशब्द बनवले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माणिकरावांना बडोदा सरकारने ‘राजरत्न’ आणि ‘राजप्रिय’ अशा पदव्यांनी गौरवले. बडोद्याच्या ‘लक्ष्मीविलास’ राजवाड्यात भव्य शस्त्रसंग्रहालय उभारणाऱ्या माणिकरावांनी ‘प्रतापशस्त्रागार’, ‘भारतीय व्यायाम’ हे ग्रंथ लिहिले. 25 मे 1954 रोजी त्यांचे निधन झाले.
अग्रणी क्रांतिकारी रासबिहारी बोस
रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी क्रांतिकारकांपैकी एक. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा जन्म बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील सुबालदह गावात 25 मे 1886 रोजी झाला. क्रांतिकारक जतीन मुखर्जींच्या नेतृत्वाखालील युगांतर नामक क्रांतिकारक संघटनेचे अमरेंद्र चॅटर्जी यांच्याशी रासबिहारी बोस यांची ओळख झाली. अशाप्रकारे ते बंगालमधील क्रांतिकारकांशी जोडले गेले. 1912च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बंगाली तसेच पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली. 22 डिसेंबर 1912ला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून तर, त्यांचे मित्र बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. दुसर्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बॉम्ब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. अनेक भाषांवर प्रभुत्व, हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी असल्यामुळे रासबिहारी पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहिले. शेवटी जून 1915मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले. अशा या महान क्रांतिकारकाचे 21 जानेवारी 1945 रोजी निधन झाले.