आराधना जोशी
नुकताच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यानिमित्त सोशल मीडियावर मी एक फोटो शेअर केला होता. मी, माझी लेक, आई आणि आजी अशा चार पिढ्या त्या फोटोत दिसतात. अनेकांनी त्या फोटोला लाइक केले. त्यानिमित्ताने माझी शिरा आजीची (आईची आई) आठवण शेअर करते.
विजया कृष्णाजी महाबळ म्हणजे माझी शिराआजी 17 मे 2017 रोजी अनंतात विलीन झाली आणि नऊ दशकांचा एक प्रदीर्घ प्रवास संपला. अवघ्या चार दिवसांवर तिचा वाढदिवस आला होता. या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे, आजी आणि आई यांचा वाढदिवस एकाच दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिच्या नातीचा म्हणजे माझा वाढदिवस. त्यावरून ती नेहमी मला म्हणायची, ‘जरा काही तास आधी जन्माला यायचं की!’ चूल, स्टोव्ह, गॅस आणि आता मायक्रोवेव्ह असा प्रवास शिरा आजीने जवळून पाहिला होता. समाजातल्या, कुटुंबातल्या कित्येक स्थित्यंतरांची ती मूक साक्षीदार होती.
धोपावकरांची माहेरवाशीण महाबळांची सून होऊन एकत्र कुटुंबात आली. माझ्या आजोबांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. पण एकत्र कुटुंबात कोणीही ना आजोबांना दुजेपणाची वागणूक दिली ना आजीला. अर्थात, आजीनेही आपल्या वागणुकीमुळे सर्वांना धरून ठेवलं होतं. गाठीशी खूप पैसा नव्हता, पण नात्यांनी आजी-आजोबा गर्भश्रीमंत होते. त्यांचा हा माणसांना धरून ठेवण्याचा, नाती जपण्याचा गुण त्यांच्या मुलांनी आणि नंतर नातवंडांनी उचलला, याचा तिला खूप अभिमान होता.
बाळंतपणात आजीच्या कानांवर परिणाम झाला होता. ऐन तारुण्यात बहिरेपणा तिच्या वाट्याला आला. त्यातच एका गवताची अॅलर्जी होऊन गोऱ्या आजीच्या त्वचेचा रंग आयुष्यभरासाठी काळा झाला. त्यामुळे ती काहीशी अबोल, अंतर्मुख झाली. पण समोरच्या माणसाच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय बोलतोय, हे ती अचूक ओळखायची. तरी, कधीही “तुम्ही माझ्याबद्दलच बोलताय,” हे वाक्य तिने उच्चारलं नाही.
हेही वाचा – संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव
बहिरेपणामुळे हिंडण्याफिरण्यावर काहीशी बंधनं आली होती. पण आजोबांनी खंबीरपणे तिला साथ दिली होती. एकदा मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये आजी-आजोबांची चुकामूक झाली होती. यावर घाबरून न जाता आजी आत्मविश्वासाने ज्यांच्या घरी जायचे होते तिथे जाऊन पोहोचली. आम्ही मात्र घाबरून तिचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. हा किस्सा जेव्हा तिला कळला आणि आजोबा कसे हवालदिल झाले होते, हे समजलं तेव्हा पदर तोंडावर धरून काय मस्त लाजली होती ती!
पप्पांची आई म्हणजे ‘लोणी आजी’! ती रोज ताजं लोणी काढून त्यातला एक गोळा माझ्या हातावर ठेवायची म्हणून लोणी आजी. तर, आईची आई म्हणजे ‘शिरा आजी’ कारण कणकेचा शिरा करून रोज मला खायला घालायची. ही नावं मी त्यावेळी माझ्या बालबुद्धीने ठेवली होती, पण कालांतराने ही नावं सर्वांच्याच मुखी झाली. कणकेच्या शिऱ्याबरोबर फडताळात सोवळ्यात ठेवलेलं लोणचं खास माझ्यासाठी काढलं जायचं. त्यानंतर आजपर्यंत कणकेचा शिरा हा माझा विकपॉइंट ठरला. आता मी बनवलेला कणकेचा शिरा अनेकांना आवडतो. पण ही चव आजीकडूनच परंपरेनं माझ्या हातात आली आहे, हे नक्की.
एकदा आजीनं गुळपापडीच्या वड्या केल्या होत्या आणि नेमक्या त्याच दिवशी माझे दोन दात काढून टाकले होते. आता आपण सोडून बाकी सगळेजण वड्या खाणार म्हणून मला रडू येत होतं. तेव्हा आजीनं गुपचूप एका डब्यात फक्त माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेल्या वड्या मला दाखवून माझं रडणं थांबवलं होतं.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
आजीला आमच्या लहानपणापासून कधी झोपलेलं पाहिलंच नव्हतं. सकाळी साधारणपणे साडेतीन-चारला तिचा दिवस सुरू होत असे. त्यावेळी आम्ही साखरझोपेत असायचो आणि संपायचा कधी हेही कधीच कळायचं नाही; कारण त्याच्याआधीच आमचा दिवस संपायचा. दुपारी नातवंडांना एकत्र करून बैठे खेळ शिकव, नाहीतर काहीतरी शिवणकाम कर अशीच आजी कायम आम्ही बघत आलो होतो. माझ्या मुलीच्या म्हणजे तिच्या पणतीच्या बारशाला स्वतः तयार केलेली कुंची तिने आणली होती. ही कुंची आतापर्यंत मी आजीची आठवण म्हणून जपून ठेवली होती. आता यापुढे मात्र आजी फक्त आमच्या सगळ्यांच्या आठवणीतच राहणार.