भाग – 2
नीरजने मुंबईतल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतली, पण पहिल्याच वर्षी अभ्यासात त्याची पीछेहाट पाहायला मिळाली. एक दिवस अचानक नीरज घरी आला. रात्री सर्व एकत्र बसले असताना ‘मी इंजिनीअरिंग सोडण्याचा निर्णय घेतलाय,’ असा बॉम्बगोळा त्याने टाकला. तो म्हणाला, “माझ्या लक्षात आलंय की, इंजिनीअरिंग माझ्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे. म्हणून मी इंजिनीअरिंग सोडण्याचा निर्णय घेतलाय… बाबा, मला काय म्हणायचंय, ते समजून घ्या. तुम्ही जुन्या पिढीतले लोक. आज काय ट्रेंड्स सुरू आहेत? कमी शिकलेले लोकही कसा खोऱ्याने पैसा कमावताहेत, हे आमच्या नव्या नेटसॅव्ही पिढीला जास्त कळतंय. सध्या फूड इंडस्ट्रीज तुफान पैसा कमवतेय. मॅक्-डोनाल्ड, डॉमिनोज याबरोबरच स्विगी, झोमॅटो यासारख्या ॲपवरूनही माणसं प्रचंड पैसा कमावताहेत. अशी वेळ येणार आहे की, माणसं घरी स्वयंपाकच करणार नाहीत. सगळं बाहेरूनच मागवणार आहेत. इंजिनीअरिंगची डिग्री घेऊन पाच-पाच हजारांवर नोकऱ्या करण्यापेक्षा अशा फूड इंडस्ट्रीजमध्ये बिझनेस केलेला चांगला!”
“तुझ्या मनात आहे तरी काय?” राजेशने उद्विग्न होऊन विचारलं.
“माझे सगळे मित्र म्हणतात, ‘तू एवढा चांगला स्वयंपाक करतोस, तुला नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड आहे तर तू इंजिनीअरिंगला का आलास? तू हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं…! मलाही जाणवतंय की, माझी लाइन चुकलीय!”
“पण मेकॅनिकल इंजिनीअरिंगला जायचा चॉईस तुझाच होता. आम्ही तुझ्यावर कुठलीच जबरदस्ती केली नव्हती…” जयू रागाने म्हणाली
“हो मला त्यावेळी एवढं नॉलेज नव्हतं. मी खूप रिसर्च केला आणि मला माझी आवड कळली.”
“मग आतापर्यंत तुझ्यासाठी एवढा खर्च केला, तो पाण्यात गेला म्हणायचा!” राजेश निराशेने म्हणाला.
“चार वर्षं इंजिनीअरिंग केलं तर खूप पैसा वाया जाणार आहे बाबा… आणि उपयोग शून्य. मग आताच आपण शहाणं झालेलं काय वाईट?”
जयूने राजेशकडे पाहिलं. राजेशला काय बोलावं समजेना. मोठी द्विधा मन:स्थिती झाली होती त्याची. क्षणभराने तो म्हणाला,
“हे बघ नीरज, तू इंजिनीअर व्हावं हे माझं स्वप्न होतं. ते तू पूर्ण करावंस, असं मला वाटतं. एकदा इंजिनीअरिंग झालं, एकदा का तुझ्या हातात डिग्रीचे कागद पडले की, तू वाटेल ते करायला मोकळा. तोपर्यंत प्लीज आम्हाला त्रास देऊ नकोस. आम्हाला तुझे ते कागदच हवे आहेत. लक्षात आलं ना तुझ्या?”
हेही वाचा – नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!
नीरजचा चेहरा आक्रसला… तो रडू लागला.
“मला इथे कुणी समजूनच घेत नाहिये. माझ्या काय इच्छा, महत्वाकांक्षा आहेत याचं कुणालाच काही देणंघेणं नाही. स्वतःच्या इच्छा मात्र लादताय माझ्यावर…”
जयूने त्याच्याजवळ जाऊन त्याला जवळ घेतलं…
“नको रडूस. याच्यातूनही काही मार्ग निघेल…” तिने राजेशकडे पाहून त्याला शांत रहायची खूण केली. राजेश तिथून उठला आणि बैठकीत जाऊन बसला. त्याच्या मनात वादळ उठलं होतं. नीरजचा निर्णय त्याला अजिबात आवडला नव्हता.
नीरजला फोन आला म्हणून तो बाहेर अंगणात जाऊन बोलू लागला. ही संधी साधून जयू राजेशजवळ जाऊन म्हणाली,
“अहो, त्याच्यावर चिडू नका. तुम्हाला माहितीय ना आजकाल मुलं थोडं काही बोललं की, लगेच जीवाचं बरंवाईट करून घेतात…”
राजेशने मान डोलावली. त्याच्याच मित्राच्या मुलाने “सदोदित मोबाइलवर गेम का खेळत असतो?” असं विचारून त्याच्या हातून मोबाइल हिसकावून घेतल्यामुळे आत्महत्या केली होती, ते त्याला आठवलं. आजकालच्या मुलांमध्ये अपमान, कष्ट, दुःख सहन करण्याची ताकत उरली नव्हती, हे त्यालाही माहीत होतं; पण आपल्या मुलाने असं करिअरशी खेळत रहावं, हे त्याला अजिबात पसंत नव्हतं.
“हो, पण म्हणून नेहमी त्याच्या मर्जीसारखंच वागायचं का?” तो रागाने म्हणाला, तशी जयू तोंडावर बोट ठेवत म्हणाली,
“ओरडू नका, तो ऐकेल. जरा शांततेने घ्या…”
खूप काही बोलायचं असूनही राजेश चूप बसला.
जेवताना राजेश त्याला समजावत म्हणाला, ” हे बघ नीरज. आता लगेच तुला हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन मिळणार नाही. त्यासाठी जून महिन्याचीच वाट पहावी लागणार. आमचं असं म्हणणं आहे की, हे वर्ष तू पूर्ण करावंस. समजा तुला नाहीच जमलं तर, घे तू हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन. पण समजा तुला मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्येच इंटरेस्ट वाटू लागला, सगळे विषय सुटलास तर, हे सुद्धा तू सुरू ठेवू शकतोस.”
हा मुद्दा नीरजला पटला. त्याचा चेहरा उजळला… “हो चालेल. पण मला नाही वाटत माझे विषय निघतील…”
“ठीक आहे, पण तू निगेटिव्ह थिंकींग का ठेवतोस? जे करशील ते फुल्ल डिव्होशनने कर, एवढंच आमचं म्हणणं आहे…” जयू म्हणाली. नीरजने हसून मान डोलावली. बाप-लेकातला तणाव दूर झालेला पाहून जयूला हायसं वाटलं.
वार्षिक परीक्षा झाल्या. नऊपैकी तीनच विषयांत नीरज पास झाला. अर्थातच, त्याचं पुढचं वर्ष वाया जाणार होतं. राजेशपुढे त्याला हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेऊन देण्याव्यतिरिक्त मार्ग उरला नाही. पुन्हा दोन लाख खर्च करून त्याने पुण्याच्या एका कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घेऊन दिली. परत एकदा होस्टेलचा, मेसचा खर्च सुरू झाला.
पहिले सहा महिने नीरजचा उत्साह चांगला होता. जयू आणि राजेशलाही ते पाहून आनंद वाटत होता. हॉटेल मॅनेजमेंटलाही सध्या चांगला स्कोप होता. मोठ्या शहरातल्या थ्री स्टार, फाइव्ह स्टार हाँटेल्समध्ये अनेक संधी उपलब्ध होत्या. काही संधी विदेशातही होत्या. नीरजने मनावर घेतलं तर, या फील्डमध्येही चांगलं करिअर घडू शकलं असतं. का कुणास ठाऊक पण त्याला आणि जयूला आपला मुलगा विदेशातल्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरीला लागलाय, अशी स्वप्नं पडू लागली.
एक दिवस जयूने नीरजला फोन केला. त्याची चौकशी केली… पण त्याचा सूर काही तिला योग्य वाटला नाही…
“काय झालं बेटा, काही प्रॉब्लेम आहे का?”
“आई तुला खरं सांगू का, इतकं कंटाळवाणं आहे ना सगळं! काय काय ते विषय आहेत… फूड प्रॉडक्शन, हॉस्पिटिलिटी, हाऊस कीपिंग, लाँड्री… अक्षरशः बोअर आहे सगळं! इथे येऊन तर माझी स्वयंपाक करण्याची इच्छाच मरून गेलीय…”
जयूला त्याचा खूप राग आला. ती संतापाने म्हणाली, “हे बघ नीरज. तुझ्या इच्छेनेच तू तिथे ॲडमिशन घेतलीय. आम्ही तर तयारच नव्हतो. आता तुला ते पूर्ण करावंच लागेल. तुला बाबांनी समजावलं होतं की, अरे, हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणं नाही. तो फक्त एक भाग आहे. हॉटेल चालवणं म्हणजे गंमत नसते. त्यात अनेक गोष्टी असतात. त्यातल्या काही कंटाळवाण्या पण असू शकतात. अरे बाबा, रोजचा तीन-चार माणसांचा स्वयंपाक करणंही काही सोपं नसतं. हे तर हॉटेल असतं. सांगितलं होतं ना बाबांनी?”
“सांगितलं होतं. पण ते इतकं किचकट असतं, असं मला वाटलं नव्हतं”
“शांत रहा. मन एकाग्र कर. आता तुला कुठलाही चॉईस नाही. हेच तुला पूर्ण करावं लागेल…”
नीरजने फोन ठेवला, पण जयू उदास झाली. त्याच्याशी झालेलं बोलणं नवऱ्याला सांगायची जयूची हिंमत झाली नाही.
मध्यंतरी काही कामानिमित्त राजेशला पुण्याला जायची संधी मिळाली. नीरजला सरप्राइज देऊया, असा विचार करून त्याला काही न कळवता राजेश त्याला भेटायला गेला. पण नीरज बाइकने लोणावळ्याला गेल्याचं कळलं. राजेशने इतर मुलांकडे चौकशी केली, तेव्हा नीरज बऱ्याचदा कॉलेजला दांडी मारून बाईकने भटकत असतो, असं त्याला कळलं. राजेशला वाईटही वाटलं आणि संतापही आला. त्याने ताबडतोब त्याला फोन केला, पण त्याने उचलला नाही. चडफडत राजेश घरी परतला.
संध्याकाळी नीरजचाच फोन आला. आपला मोबाइल रूमवरच राहून गेला होता, त्यामुळे उचलता आला नाही, असं तो म्हणाला. तसंच, आपण बाईकवर निष्कारण भटकत नसून हॉटेल्सची कार्यपद्धती बघायला जातो, असं त्याने राजेशला समजावलं. राजेश काही बोलू शकला नाही, पण नीरजच्या उत्तराने त्याचं समाधान झालं नाही.
वार्षिक परीक्षेनंतर नीरज घरी आला, पण त्याच्या चेहऱ्यावर कसलाही उत्साह दिसत नव्हता.
“काय झालं? आता का नाराज आहेस?” जयूने विचारलं.
“आई मला पेपर बरे गेलेत, पण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काही मजा नाही. सध्या इथंही खूप सॅच्युरेशन आहे. एक तर आपल्याकडे चांगल्या हॉटेल्सची कमतरता आहे, त्यात लाखो मुलं हॉटेल मॅनेजमेंट करताहेत. त्यामुळे नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसलंय.”
“हे बघ बेटा, आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी अफाट आहे. त्यामुळे प्रत्येक फील्डमध्ये गर्दी ही ठरलेली. मग काय आपण शिक्षणच नाही घ्यायचं? त्या देवाने सगळ्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था करून ठेवलीय. न शिकलेली माणसंही नोकरी, व्यवसाय करतातच ना? तू तुझं शिक्षण पूर्ण कर. नाही नोकरी मिळाली तर एखादं हॉटेल टाक!”
“आई, थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेल सुरू करण्यासाठी किती प्रचंड पैसा लागतो माहितीय? तेवढी ऐपत आहे का आपली?” त्याने एकदम ऐपत काढल्यावर जयूने संतापाने त्याच्याकडे पाहिलं.
“आमची ऐपत काढू नकोस. हॉटेल काय फक्त थ्री स्टार, फाइव्ह स्टारच असतात? आपल्या अकोल्यात किती अशी हॉटेल्स आहेत रे? साधारण हॉटेल्सही चालतातच ना अकोल्यातली? तुम्हा आजकालच्या मुलांना सगळं काही उच्च दर्जाचं लागतं. रस्त्यावर वडे-भजी विकणारेही पुढे मोठ्या हॉटेल्सचे मालक होतात. त्यांचा आदर्श तुम्ही घेणार नाहीत. मुंबईच्या ऑर्किड हॉटेल्सचे मालक विठ्ठल कामत यांचं चरित्र वाच एकदा…”
“माहितेय मला ते!”
“…आणि तरीही असं बोलत़ोस?”
नीरज चूप बसला.
मुलाच्या या दिशाहीन वागण्याला कंटाळून जयू त्याची कुंडली घेऊन ज्योतिषाकडे गेली. बरंच निरीक्षण केल्यावर ज्योतिषी म्हणाले, “अहो तुम्ही त्याला चुकीचं शिक्षण देताय. त्याच्या कुंडलीत इंजिनीअरचे योगच नाहियेत आणि हॉटेल व्यवसायाचेही कुठलेच योग दिसत नाहियेत. तुम्ही त्याचं आयुष्य वाया घालवताय!”
नीरजने आईकडे आनंदाने पाहिलं.
“पण मग करायचं तरी काय?” जयूने वैतागून विचारलं.
“मला विचाराल तर, मी सांगेन की, त्याने सरळ डी.एड. किंवा बी.एड करून शिक्षकाची नोकरी पत्करावी. कुंडलीत शिक्षकी पेशाचे योग प्रबळ आहेत. तो प्राध्यापकही होऊ शकतो.”
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
जयूने कपाळावर हात मारून घेतला. परत नवीन फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायची, या कल्पनेनेच तिचा जीव घाबराघुबरा होऊ लागला. तिने नीरजकडे पाहिलं. नीरजला शिक्षक होण्याची कल्पना अजिबात पसंत पडलेली दिसत नव्हती.
“हा असा चंचल मनाचा आहे. एक धड काही करत नाही. याला काही उपाय नाहीत का?”
ज्योतिषाने बरेच उपाय सांगितले. पन्नास हजाराच्या आसपास खर्च सांगितला. जयू त्याला तयार झाली .काही इलाजच नव्हता. आपल्या मुलाने आयुष्याची महत्त्वाची वर्षं अशी धरसोड करून वाया घालवावी, असं कोणत्या आईला वाटेल? अर्थात, राजेश काही ते उपाय करायला तयार झाला नाही. दिशाहीन मनाला ताळ्यावर आणणं हाच खरा उपाय आहे, असं त्याचं म्हणणं पडलं.
क्रमश:


