दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 18 नोव्हेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 27 कार्तिक शके 1947; तिथि : त्रयोदशी 07:11; नक्षत्र : स्वाती अहोरात्र
- योग : आयुष्मान 08:08; करण : विष्टी 20:26
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:46; सूर्यास्त : 18:00
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
शिवरात्री
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. नवीन ठिकाणांना भेट द्याल. मित्रांचा सहवास तुम्हाला फ्रेश करेल. स्पर्धेत बाजी माराल. नव्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणू शकता, त्यामुळे त्यांचा वापर सर्जनशील कामासाठी करा. मात्र कोणतेही नवीन काम आज सुरू करू नका; चांगल्या वेळेची वाट पहा. आज धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता.
वृषभ – आजचा दिवस चांगला असेल. घरातील सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. शुभ कार्यांमध्ये रस घ्याल. नवीन व्यावसायिक संबंध दृढ होतील. तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी खास करायचे असेल तर, हा योग्य काळ आहे. तथापि, राग आणि खर्च यावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा.
मिथुन – आजचा दिवस सकारात्मक असेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कलात्मक कौशल्य आणखी बहरेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. कामासाठी अधिक वेळ देण्याचा विचार करा. त्यासाठी आळस टाळा.
कर्क – आज काही सकारात्मक बदल घडेल. कामात व्यग्र राहाल. तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. समाजात तुमचे कौतुक आणि आदर होईल. अनपेक्षित खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण येईल. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे बेत कराल. आहाराची काळजी घ्या, कारण त्यामुळे आरोग्य बिघडू शकते.
सिंह – आजचा दिवस चांगला जाईल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल, कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या ज्ञानाने आणि बुद्धीने इतरांना प्रभावित कराल. यश आणि सहकार्य या दोन गोष्टींबद्दल सकारात्मक संकेत आहेत. तुम्ही करत असलेले नवीन प्रयत्न सर्वांना आकर्षित करतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या – आजचा दिवस संमिश्र असेल. वैयक्तिक पातळीवर आनंदी असाल. लोकांकडून तुमची प्रशंसा होईल. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. अनोळखी लोकांशी फारशी जवळीक साधायला जाऊ नका. अनावश्यक वाद टाळा. आज धार्मिक कार्यांकडे कल असेल. खर्चावर नियंत्रण ठेवून गुंतवणुकीवर भर द्या.
हेही वाचा – आठवणींचा जागर…
तुळ – आजचा दिवस फारसा चांगला असणार नाही. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. कठोर परिश्रम आणि समर्पण यामुळे तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल. सहकारी आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. कामावर थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. गरजूंना मदत करा, यामुळे मानसिक शांती मिळेल.
वृश्चिक – आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होत राहतील. जीवनशैलीशी निगडीत वस्तूंच्या खरेदीकडे तुमचा कल वाढेल. घरात आनंद, समृद्धी वाढेल. पदोन्नतीची शक्यता आहे. कोणत्याही कामात अडथळे येत असतील तरी ते नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज कुटुंबाची विशेष काळजी घ्याल. रागावर नियंत्रण ठेवा.
धनु – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. तुम्ही जे काही कराल त्यात ती उत्कृष्ट कामगिरी असेल. मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीला जाणाऱ्या जातकांना अपेक्षेनुसार निकाल मिळतील. व्यवसायाच्या निमित्ताने लहान प्रवास करावा लागेल, जो फायदेशीर ठरेल. काही कारणास्तव अतिरिक्त खर्च करावा लागेल.
मकर – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. सहजतेने आणि साधेपणाने पुढे जात राहा. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकेल. एखादा नवीन प्रकल्प राबवू शकाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. काही कारणांनी मानसिक अवस्थता जाणवेल.
कुंभ – आजचा दिवस चांगला जाईल. दिवस व्यावसायिक कामांमधील तुमची आवड वाढवणारा असेल. व्यवसायात फायदेशीर करार होतील. सर्व कामे सहज पूर्ण कराल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. भागीदारीतील कामामध्ये मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत. वाढलेला आदर आणि सन्मान यामुळे खूप आनंद देईल. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील.
हेही वाचा – निर्णय… योग्य की अयोग्य?
मीन – आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम कराल, ज्याचे भविष्यात चांगले फळ मिळेल. एखाद्या शुभ कार्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आहाराकडे लक्ष देण्यासोबतच सभोवतालच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. बोलण्यावर संयम ठेवा, अन्यथा अनावश्यक वादात अडकण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
प्रयोगशील निर्माता, दिग्दर्शक व्ही. शांताराम
टीम अवांतर
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत, प्रयोगशील निर्माता, दिग्दर्शक, नट आणि पटकथाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्ही. शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. लहान वयातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय तसेच पाश्चात्त्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले. 1914 साली त्यांनी बालगंधर्व यांच्या नाटक मंडळी नट म्हणून प्रवेश केला. फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापलेल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त शांतारामबापू 1920 साली सहभागी झाले. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपट कलेची मुळाक्षरे गिरविली. नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, Special Effects अशा प्रत्येक गोष्टींमधील बारकावे व्ही. शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे ‘व्ही. शांताराम’ असे नामकरण केले. 1929 साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाल्यानंतर. या कंपनीने व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण, खुनी खंजर, रानीसाहिबा, उदयकाल, जुलूम, चंद्रसेना यासारखे पौराणिक आणि स्टंट मूकपट निर्माण केले. 1932 सालचा आयोध्येचा राजा हा मराठी (हिंदी – अयोध्या का राजा) पहिला बोलपट व्ही. शांताराम यांनीच निर्माण केला. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘बायपॅक’ पद्धतीने तयार केलेला पहिला रंगीत बोलपट म्हणजे व्ही. शांताराम दिग्दर्शित सैरंध्री. तर, अमृतमंथन या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले. चमत्कृतिपूर्ण थरारक दृश्ये, तसेच नामवंत अभिनेते यामुळे हा भारतातील पहिला रौप्यमहोत्सव साजरा करणारा चित्रपट ठरला. शांताराम दिग्दर्शित चंद्रसेना हा पौराणिक चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ अशा तीन भाषांमध्ये होता. अमरज्योती हा दर्यावर्दी जीवनाची पार्श्वभूमी असलेला पहिला भारतीय चित्रपट शांतारामबापूंनी दिग्दर्शित केला ज्यात बॅक प्रोजेक्शन पद्धतीचे चित्रीकरण, पार्श्वगायनाच्या प्रथेचा प्रारंभ अशी ऐतिहासिक महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. याशिवाय कुंकू, माणूस, शेजारी यासारखे सामाजिक आशय व्यक्त करणारे चित्रपटांचे दिग्दर्शन शांतारामबापूचं होते. 1942 साली त्यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडून ‘राजकमल कला मंदिर’ या चित्रसंस्थेची स्थापना केली. शकुंतला हा राजकमलचा पहिला चित्रपट मुंबईच्या ‘स्वस्तिक’ चित्रपटगृहात 104 आठवडे चालला. अमेरिकेत व्यापारीदृष्ट्या प्रदर्शित झालेला म्हणून देखील हा पहिलाच भारतीय चित्रपट होय. त्यानंतर आलेला ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा हिंदी चरित्रपट या प्रतिभावंत कलावंताच्या कारकिर्दीतील एक यशोशिखर ठरला. राजकमलचे व्ही. शांताराम दिग्दर्शित आणखी काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे अपना देश, दहेज, अमर भूपाळी, परछाई, तीन बत्ती चार रास्ता, सुबह का तारा, सुरंग, झनक झनक पायल बाजे, तुफान और दिया, दो आँखे बारह हाथ, नवरंग, स्त्री, सेहरा, गीत गाया पत्थरोंने, इये मराठीचिये नगरी, बूंद जो बन गई मोती, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, पिंजरा… यापैकी अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मान मिळाले. व्ही. शांताराम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळजवळ 80 चित्रपट निर्माण केले तर सुमारे 60 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी काही बालचित्रपटही निर्माण केले. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘चित्रपती’ हा सन्माननीय किताब दिला, तर नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. 1992 साली ‘पद्मभूषण’ पुरस्कार तर 1986 साली प्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. “शांतारामा” हे त्यांचे आत्मचरित्रही वाचकप्रिय झाले. अशा या श्रेष्ठ चित्रपतींचे 30 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईत निधन झाले.


