दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 फेब्रुवारी 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 17 माघ शके 1947; तिथि : पंचमी 25:18; नक्षत्र : हस्त 24:23
- योग : धृति 23:36; करण : कौलव 12:44
- सूर्य : मकर; चंद्र : कन्या; सूर्योदय : 07:12; सूर्यास्त : 18:33
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसाय चांगला राहील, आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी इच्छित बदली किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवन देखील आनंददायी राहील. मात्र रागावर नियंत्रित मिळवा, अन्यथा तुम्ही वादात अडकू शकता. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. अनुकूल ग्रहांच्या स्थितीमुळे नशीब पालटणार आहे. व्यवसायात भरभराट होईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण असेल, मात्र सहकाऱ्यांच्या मदतीने तुमची कामे यशस्वी होतील. पदोन्नती शक्य आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या सहलीचे नियोजन केले जाऊ शकते.
मिथुन – व्यावसायिक कामे सुरळीतपणे पार पडतील. त्यातही तुम्हाला किरकोळ समस्या येऊ शकतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. जोखीमेचा आर्थिक व्यवहार आणि कोर्टकचेरीपासून दूर राहणेच चांगले. आरोग्याची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
कर्क – व्यवसायात नेहमीचीच गती राहील. कामाचा जास्त ताण असल्याने संपूर्ण दिवस धावपळीचा असेल. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने चिंता निर्माण होईल. शिवाय, खर्चाचे प्रमाण जास्त असेल. आज एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल.
सिंह – आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. व्यवसाय चांगला राहील आणि त्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना खूप काम असेल. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आज या राशीच्या जातकांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल, मात्र आपल्या बोलण्याने कोणीही दुखावणार नाही याची काळजी घ्या.
कन्या – आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय विस्तारासाठी एखादी योजना तयार कराल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामे पूर्ण करणे सोपे होईल. आज कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे.
हेही वाचा – मी मज हरपून बसले गं…
तुळ – कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल, सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. मात्र तरीही कामात अपेक्षित यश न मिळाल्याने अस्वस्थ वाटेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातील तुमची आवड वाढेल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल, परंतु वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. गाडी चालवताना काळजी घ्या. खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.
वृश्चिक – आजचा दिवस शुभ आणि फलदायी असेल. व्यवसायात नफा तर नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजनेवर काम सुरू कराल. मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कामात यश मिळाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंब आणि मित्रांसोबत सहलीला किंवा पिकनिकला जाऊ शकता. आरोग्यही चांगले राहील.
धनु – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसाय चांगला चालेल आणि विस्ताराच्या योजना आखल्या जातील. मात्र नवीन प्रकल्प लगेचच सुरू करणे टाळा, अन्यथा मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. आज प्रलंबित निधी वसूल करू शकता. आर्थिक फायदा होईल, परंतु अनावश्यक खर्चही मोठ्या प्रमाणात होईल. कर्ज घेणे टाळा. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक असेल.
मकर – आजचा दिवस चांगला जाईल. कामात यश मिळाल्याने आनंद होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जोखीम घेतली तर नुकसान होऊ शकते, म्हणून हुशारीने निर्णय घ्या. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. आज तुम्हाला आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची विशेष आवश्यकता आहे.
कुंभ – कामाचे नियोजन केल्याने यश मिळेल. अर्थात, कठोर परिश्रम करावेच लागतील. त्यातच संपूर्ण दिवस जाईल. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आज जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकाल. प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. मालमत्तेच्या वादात अडकू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमचे वर्तन तुमच्या जोडीदाराला आनंद देईल.
मीन – आजचा दिवस संमिश्र असेल. काम चांगले होईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र किरकोळ समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. जोखीमेचे आर्थिक व्यवहार मात्र टाळणे योग्य ठरेल. नोकरीच्या ठिकाणी प्रचंड काम असेल. यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल. तुमचा राग आणि शब्द यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल.
दिनविशेष
सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी प्रदीप
टीम अवांतर
सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी मध्य प्रदेशमधील बडनगर (जि. उज्जैन) या छोट्या शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव होते रामचंद्र नारायण द्विवेदी. कवी प्रदीप यांचे मोठे भाऊ कृष्णवल्लभ द्विवेदी हे प्रसिद्ध लेखक होते. लहानपणापासून दोघेही सतत सोबत राहिल्याने कवी प्रदीप यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या साहित्यिक रुचीचा खोल प्रभाव पडला.
तेव्हाच्या अलाहाबाद येथील महाविद्यालयीन जीवनापासूनच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्याबरोबरच त्यांची काव्यलेखनाची आणि काव्यवाचनाची आवड दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होती. ते त्यांच्या कवितांचे गायन करून त्या ऐकवत असत. याच काळात त्यांनी रामचंद्र नारायण द्विवेदी ‘प्रदीप’ या नावाने कवितालेखन करायला सुरुवात केली. अलाहाबादमधील साहित्यिक वातावरणात त्यांच्या या आवडीला पोषक वातावरण मिळाले. तसेच तेथे हिंदी साहित्य जगतातील अनेक थोर साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला.
मुंबईमधील एका कविसंमेलनामध्ये कवी प्रदीप यांच्या कविता बाँबे टॉकीजचे सहदिग्दर्शक एन. आर. आचार्य यांनी ऐकल्या आणि त्यांची ओळख बाँबे टॉकीजचे मालक, दिग्दर्शक हिमांशू राय यांच्याशी करून दिली. त्यातूनच अशोककुमार आणि देविका रानी अभिनित कंगन या चित्रपटासाठी त्यांनी चार गीते लिहिली. अशाप्रकारे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या गीतलेखनाची सुरुवात झाली. शशधर मुखर्जी दिग्दर्शित बंधन या चित्रपटासाठी त्यांनी 12 गाणी लिहिली. ‘चल चल रे नौजवान’ हे त्यातले गीत विशेष गाजले. 1943 साली आलेल्या किस्मत या चित्रपटातील ‘हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो ए दुनियावालों हिंदुस्तान हमारा है’ या त्यांच्या गीताने स्वातंत्र्यसेनानींच्या देशप्रेमाच्या स्फुल्लिंगाला चेतना दिली. देशभक्तिपर या गीतामुळे इंग्रजांची वक्रदृष्टी कवी प्रदीप यांच्यावर पडली आणि त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाले. त्यामुळे कवी प्रदीप काही दिवस भूमिगत राहिले.
हेही वाचा – संगीत मजूर नव्हे, कलावंत!
त्यानंतर त्यांनी लिहिलेली ‘देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इन्सान’, ‘हम लाए हैं तूफ़ान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के’, ‘आओ बच्चों तुम्हें दिखायें झाँकी हिंदुस्तान की’ यांसारखी त्यांची गीते आजही लोकप्रिय आहेत. याशिवाय ‘दे दी हमें आज़ादी बिना खङग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ ही गाणी देखील तितकीच रसिकांना आवडली.
भारत-चीन युद्धानंतर शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे अतिशय भावनिक गीत लिहिले आणि 26 जानेवारी 1963 मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर लता मंगेशकर यांनी हे गीत सादर केले. या गीताच्या सादरीकरणावेळी उपस्थित सर्व श्रोतृसमुदायासोबतच पंतप्रधानही भावनिक झाले होते. या गाण्याच्या हक्काद्वारे मिळणारे मानधन युद्धामध्ये वीरमरण आलेले सैनिक यांच्या विधवा पत्नींकरिता असणाऱ्या मदत निधीमध्ये जमा करण्याबाबतचा करार त्यांनी ध्वनीमुद्रण कंपनीसोबत केला.
कवी प्रदीप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1961 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय ‘राष्ट्रीय कवी’ म्हणून 1995 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाकरिता भारत सरकारने त्यांना 1998 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविले. 11 डिसेंबर 1998 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.


