यश:श्री
जंगली हत्ती माणसाळवण्याचे काम हुशार आणि तज्ज्ञ माहुतांवर सोपविले जाते. कळप सुटलेल्या हत्तीला प्रथम शांतं करावे लागते. यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. पण याउलट, अनेकदा माहुताला वाचविणारा हत्तीच त्याच्यासाठी यम बनून येतो आणि त्याचा जीव घेतो.
वास्तविक, हत्तीला प्रशिक्षित करण्याची जशी कला आहे, तशीच त्याला पकडण्याचीही एक कलाच आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात याचा उल्लेख केला आहे. यासाठी त्यांनी ‘एलिफन्ट इन दि तामिल लॅण्ड (अन्नामलाई विद्यापीठ – 1945) या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. यात हत्ती पकडण्याची पद्धत विशद केली आहे. याशिवाय, भारतीय ज्ञानकोशात (एनसायक्लोपेडिया इंडिया) हत्तीला कशा प्रकारे पकडले जाते, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. फनेलच्या आकाराचे कुंपण केले जाते. जेव्हा हत्तीचा कळप फनेलच्या आकाराच्या कुंपणातून जात असतो, तेव्हा पाळीव हत्ती तसेच माहुताच्या आज्ञा पाळणाऱ्या हत्तींद्वारे त्या कळपातील एका हत्तीला बाजूला काढले जाते आणि नंतर त्याला लहान कुंपणामध्ये पकडले जाते.
हेही वाचा – हत्ती आणि युद्ध…
तर, ‘इंडियन अॅन्टिक्वेरि’मध्ये यासंदर्भात असा उल्लेख आहे की, हत्तीला पकडण्यासाठी एखादी रखरखीत जमीन निवडतात आणि तिथे एक मोठा खड्डा खणतात. माती आणि भरपूर पेंढा पसरवून त्याला आच्छादन केले जाते. नंतर त्याच्या दोन्ही बाजूला छोट्या टेकडीसारखे उंचवटे तयार करतात आणि त्याचा भिंतीसारखा वापर केला जातो. नंतर त्या टेकडीवजा भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खणून त्यात स्वत:पुरती जागा तयार केली जाते. उजेड येण्यासाठी तसेच बाहेरच्या हालचाली पाहण्यासाठी त्याला लहान-लहान भोकं तयार केली जातात. त्या खड्ड्याच्या आसपास तीन किंवा चार उत्तम प्रशिक्षित अशा हत्तीणी उभ्या केल्या जातात. जेणेकरून, या हत्तीणींचे ओरडणे एकून कळपातील एखादा हत्ती बेसावधपणे त्या कमकुवत पुलावरून जातील आणि त्या खड्ड्यात पडतील. हत्ती खड्ड्यात पकडल्यावर त्याला जेरबंद केले जाते. अनेकदा त्यांना बिथरवून त्या खड्ड्याजवळ आणण्यासाठी ढोल आणि झोजा वाजविले जातात. अशा रीतीने हत्तींना पकडले जात असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे.
माणसळवलेला हत्ती हा बहुउपयोगी असतो. प्रामुख्याने अवजड वस्तू वाहून नेण्यासाठी या हत्तींचा वापर केला जात होता. तमिळ भूमिवरील युद्धामध्ये हत्तींना खूपच महत्त्व असे. बुरुज तसेच किल्ल्याच्या दरवाजांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यासाठी तसेच, आवश्यक असलेली वजनदार आयुधे वाहून नेण्यासाठी हत्तींचा उपयोग करण्यात येत असे, असे दुर्गाबाई भागवत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…
प्राचीन काळी सैन्याचे हत्तीदळ, घोडदळ, रथदळ आणि पायदळ असे चार स्तर होते. सर्वात पुढे पायदळ असे. पायदळातील सैनिक ‘जिंका किंवा मरा’ या त्वेषाने लढत असे. त्यांच्या मागे हत्तीदळ असे. कारण त्यांचे माजलेलेपण आणि त्वेषाचा त्या युद्धात वापर करता येतो. तथापि, हे गुण घोडदळामध्ये कमी असल्याने हत्तीदळाच्या मागे ते असत. तर, रथ वजनाने भारी असल्यामुळे त्यांची शीघ्रगतीने हालचाल होत नाही. त्यामुळे ते सर्वात मागे ठेवण्यात येत असे. अशाप्रकारचा उल्लेख ‘पुराणनुरू’ मधील अनेक श्लोकात तसेच, तत्कालीन साहित्यात आढळतो.
केवळ दाक्षिणात्य राज्यांतच नव्हे तर, उत्तर भारतातही मुघल काळातही युद्धात हत्तींचा वापर करण्यात आला. त्याकाळी हत्तींना युद्धात महत्त्वपूर्ण स्थान असे. युद्धात अद्वितीय कामगिरी बजावणाऱ्या हत्तींचा उल्लेखही अनेक तत्कालीन कवींनी आवर्जून केल्याचे आढळते.


