Saturday, June 14, 2025
Homeशैक्षणिकशिक्षा नको, सुसंवाद हवा

शिक्षा नको, सुसंवाद हवा

अर्चना कुलकर्णी

दुपारी चार वाजता राऊंड घेऊन मी माझ्या केबिनकडे वळले. केबिनच्या बाहेर एक गृहस्थ माझी वाट पाहत उभे होते; मला पाहताच त्यांनी हसून नमस्कार केला. मी देखील हसून नमस्कार केला, ‌चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. चालता चालताच मी त्यांना म्हटलं, “या.”

“थँक्यू,” असं म्हणत ते केबिनमध्ये आले. मी त्यांना खुर्चीत बसण्याची विनंती केली. ‌खुर्चीत बसल्यावर ते बोलू लागले, “मी चंद्रकांत देशपांडे. अकरावीतला अनीश देशपांडे माझा मुलगा.”

“अच्छा आपण अनीशचे वडील..!”

“हो, आज ऑफिसमधून लवकर घरी जात होतो. तुम्हाला भेटायला मुद्दाम आलो.”

ते उत्साहाने बोलत होते.

“अनीश तुमच्या कॉलेजमध्ये रमला आहे. ‌त्याला मार्क्सदेखील चांगले मिळाले आहेत‌, पहिल्या सत्रातल्या परीक्षेत. मुख्य म्हणजे तो नियमित येतो. चांगला वागतो. याचा मला फार आनंद होतो.”

देशपांडे यांचे बोलणे ऐकता ऐकता अनीशचा पहिल्या सत्रातला इतिहास माझ्या डोळ्यांसमोर झरझर येऊन गेला.

अनीश देशपांडे, अकरावीच्या दोन्ही तुकड्यांमध्ये सर्वात जास्त बेशिस्त मुलगा. वारंवार गैरहजर राहणे, जॉब, जर्नल्स, ट्युटोरिअल्स, होमवर्क अपूर्ण असणे अशी सर्व शिक्षकांची त्याच्याविरुद्ध तक्रार असायची. वर्गात, प्रयोगशाळेत आणि वर्कशॉपमध्ये काम करताना त्याचे लक्ष नसायचे‌. अतिशय बेजबाबदार आणि बेफिकीर विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या वागणुकीत सुधारणा होण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ गेले.‌ पहिल्या सत्रात त्याच्या पालकांना पाचवेळा बोलावले‌. विशेष म्हणजे, प्रत्येक वेळी त्याची आईच भेटायला आली. अनीश विषयीच्या तक्रारी त्या निमूटपणे ऐकून घ्यायच्या.

“तुम्हीच सांगा मॅडम आता मी काय करू?” या प्रश्नाने चर्चेची सांगता व्हायची‌. दुसऱ्या सत्रात त्या आल्या त्यावेळी मी त्यांना निक्षून सांगितले, “पुढच्यावेळी तुमच्याबरोबर अनीशचे बाबा आले तरच अनीशविषयी चर्चा केली जाईल.”

या पार्श्वभूमीवर देशपांडे यांचे बोलणे ऐकून मला फारच आश्चर्य वाटले. देशपांडे यांचे बोलणे थांबवत मी त्यांना विचारले, “एक मिनीट मिस्टर देशपांडे, आपण हे जे बोलत आहात ते आपल्याला कोणी सांगितलं?”

“कोणी म्हणजे अनीशची आई सांगते नेहमी, तुमच्या कॉलेजविषयी आणि अनीशविषयी‌.”

“आय एम सॉरी टू से मिस्टर देशपांडे, पण वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे.”

देशपांडे यांच्या चेहऱ्यावरील रेषा भराभर बदलल्या.

“म्हणजे काय? काय म्हणायचे काय तुम्हाला?”

“यावर्षीच्या अकरावीच्या बॅचमध्ये सर्वात irregular स्टुडंट म्हणजे अनीश..! त्याचं वर्गात शिक्षकांच्या शिकवण्याकडे तसेच प्रयोगशाळेत आणि वर्कशॉपमध्ये काम करण्याकडे अजिबात लक्ष नसतं‌, त्याचे सबमिशनही कधी पूर्ण नसतं.

“असं कसं शक्य आहे…?”

पूर्ण परिस्थिती लक्षात येताच देशपांडे खूप संतापले… “मी बघतोच आता दोघांकडे,” असं म्हणून खुर्चीतून उठून ते जायला निघाले. मी त्यांना थांबवत म्हटलं, “शांत व्हा मिस्टर देशपांडे, प्लीज बसा तुम्ही. आपण शांतपणे बोलूया या विषयावर.”

“अहो कसा शांत राहू…? मला खोटे रिपोर्ट दिले. त्याला काही अर्थ आहे का?”

“प्लीज तुम्ही शांत व्हा आधी.”

त्यांना पाण्याचा ग्लास देत मी म्हटलं. चहा घेतल्यानंतर देशपांडे जरा शांत झाल्याची खात्री पटल्यावरच मी त्यांना विचारलं,

“मिस्टर देशपांडे, अनीश कॉलेजमध्ये बरेचदा अॅबसेंट असतो, हे त्याच्या आईने तुम्हाला सांगितले असते तर काय झालं असतं…?”

“दोन मुस्कटात मारल्या असत्या मी त्याच्या. एक दिवस उपाशी ठेवलं असतं, मग बरोबर ठिकाणावर आला असता.”

देशपांडे तावातावाने उत्तरले.

“म्हणूनच या गोष्टी तुमच्या कानावर पडल्या नाहीत, मिस्टर देशपांडे.”

आता देशपांडे भुवया उंचावून माझ्याकडे पाहू लागले. मी पुढे म्हटले, “मुलांच्या वागणुकीत सुधारणा करण्यासाठी त्यांना मारणं, त्यांना उपाशी ठेवणं हा उपाय असूच शकत नाही.”

देशपांडे यांच्या चेहऱ्यावर आता कुतूहल उमटले.

“मुलांना मारणे, शिक्षा करणे यापेक्षा त्यांच्यावर विश्वास ठेवावा. त्यांच्याशी प्रेमाने वागावे. काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या कराव्यात, त्या आपल्याला पटत नसल्या तरी. मुख्य म्हणजे, मुलांशी आपला सुसंवाद असला पाहिजे. तरच ते त्यांच्या मनातल्या गोष्टी,  शाळेतल्या मित्रां-मित्रांमधील सर्व गोष्टी आपल्याला विश्वासाने सांगतील. त्यांच्या सांगण्यावरून ते चुकीचे वागतात असं वाटलं तर, सौम्य भाषेत त्यांना समजवावे आणि युक्तीने त्यांना चुकांपासून परावृत्त करावे. आपण मुलांपेक्षा बरेच पावसाळे जास्त पाहिलेले असतात. आपलं नातंदेखील ज्येष्ठत्वाचे असते, त्याप्रमाणे आपल्या वागण्यात, बोलण्यात, आचरणात प्रगल्भता असली पाहिजे. मुलं आनंदी राहिली, आपल्या पालकांचे आपल्यावर खूप प्रेम आहे, खूप विश्वास आहे याची खात्री त्यांना असली तर, ते चुका करणार नाहीत.

असं बघा आपल्या घरातलं वॉशिंग मशीन जर बिघडलं, म्हणजे चांगलं काम करत नसेल तर, आपण त्याला मारतो का? त्याचं खाणं म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय बंद करतो का? नाही ना? आपण काय करतो? ते का चालत नाही? काय दुरुस्ती केली म्हणजे ते चांगलं चालेल? आपलं काही चुकलं का ऑपरेट करताना? असा विचार करतो. त्याला दुरुस्त करण्याची सोय करतो.”

काही क्षण थांबून मी पुढे बोलले, “अहो, निर्जीव मशीनचा आपण इतका विचार करतो आणि आपल्या पोटच्या मुलांच्या चुकांच्या बाबत, त्याच्या बिघडण्याच्या बाबत हा विचार का करत नाही?”

माझे बोलणे देशपांडे यांना पटते आहे, असे वाटल्यामुळे मी पुढे बोलले,

“अनीशला शिस्त लावण्यासाठी तुम्ही कठोर वागत असाल, ते नक्कीच त्याच्या भल्यासाठी. पण या कठोर वागण्याचा त्याच्या मनावर काय परिणाम होत आहे, याचा विचार तुम्ही कधी केला का? मन दुखावलेला, संतापलेला मुलगा चांगलं काम करण्याची अपेक्षा कशी पूर्ण करू शकेल?”

बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. ती शांतता भंग करून मीच मग बोलले, “अनीश खूप चांगला मुलगा आहे. हुशार आहे. त्याची काळजी घ्या. बघा तुमच्या अपेक्षेपेक्षा तो जास्त चांगला वागेल.”

“ठीक आहे,” असे म्हणून देशपांडे खुर्चीतून उठले.

“थँक्स,” एवढेच बोलून ते केबिन बाहेर पडले. मला खात्री होती आता अनीशच्या विरुद्ध यापुढे कुठलीही तक्रार येणार नाही आणि तसेच झाले…!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!