अद्वैत
छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मराठी माणसाचं रक्त उसळतंय आणि हा चित्रपट बॉलीवूडचा असल्यामुळे तो जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचतोय. मी हा चित्रपट अजून पहिलेला नाही, पण लोकांचा प्रतिसाद बघून आणि त्याची प्रशंसा ऐकून मी तो कदाचित लवकरच बघेन.
हिंदू वीरांचा इतिहास समजायचा एकमेव मार्ग जर आता बॉलीवूडचे चित्रपट असतील, तर ते सत्य कदाचित स्वीकारायला हवे. हे सत्य भारताच्या फाजील शिक्षणव्यवस्थेचं प्रतिबिंब आहे, पण हा लेख त्या घसरत्या शिक्षणव्यवस्थेबद्दल नाही, त्यामुळे हा विषय आता नको.
मी लहानपणी जेव्हा पन्हाळगड बघायला जायचो आणि औरंगजेबाच्या क्रूरतेच्या गोष्टी ऐकायचो, तेव्हा माझं रक्त उसळून यायचं. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर केलेल्या अतिरेकी जुलमानंतर, मी सुद्धा त्या राक्षसाला माझ्या पायाखाली ठेचून मारायची स्वप्न बघायचो. पण डोळ्यात अश्रू दाटण्याशिवाय आणि काळाच्या क्रूर सत्यासमोर हतबल होण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच उपाय नव्हता. छावा चित्रपट पाहिल्यानंतर खूप लोकांचा सुद्धा असाच अनुभव आहे, असं दिसतंय. चित्रपटाच्या शेवटी थिएटरमध्ये पूर्ण शांतता असते, प्रेक्षक सुन्न होतात, असं मी ऐकले आहे. संभाजी महाराजांनी सोसलेले अनन्वित अत्याचार जेव्हा डोळ्यासमोर जिवंत उभे राहत असतील, तेव्हा कोणीही सुन्न होणारच!
जसा काळ सरला आणि मी मोठा झालो, एक सत्य प्रखरपणे माझ्यासमोर आलं. औरंगजेब हा तर आपला पिढ्या-पिढ्यांचा दुश्मन होता. त्याची नीयत सर्वांना ठाऊक होती. तो या भारतभूमीवर आलेला, ते हिंदू संस्कृती नष्ट करायलाच! पण त्याला साथ देणारे कोण होते? आपलेच होते ना! हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की, औरंगजेबाच्या लालसेपेक्षा, या आपल्याच लोकांची लालसा मोठी नाही का? त्यांचा दळभद्रीपणा हा औरंगजेबापेक्षा मोठा नाही का? स्वराज्याने ज्याला आपल समजलं, संभाजी महाराजांनी ज्याला आपलं समजलं, ते औरंगजेबचे गुलाम निघाले, हा इतिहास सुद्धा खरा आहेच ना?
संभाजी महाराजांना औरंगजेबसारख्या मगरीच्या तोंडात नेऊन सोडणारे आपलेच होते. आपला इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, अशा दगा-फटक्यांनी भरलेला आहे, ही गोष्ट वेगळी सांगायची काही गरज नाही. दुश्मन लाख मारले, तरी, आपल्या लोकांचा दगा हा सर्वात धोकादायक असतो. 16 वर्षांच्या शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची पाहिली शिक्षा ही कुठल्या मुसलमानाला नाही, तर एका पाटलाला दिली होती.
स्वराज्याचे मजबूत दरवाजे चंदनाचे होते, नक्कीच… पण ते लाकूड कमजोर करणारी वाळवी ही आपल्याच लोकांची होती. संभाजी महाराजांच्या मृत्यूमागे हिंदूही होता, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण जो शिकवत नाही, तो इतिहास कसला.
आजसुद्धा देशामध्ये राजकारणी नेते आपल्याला विभागण्याची कामं करतात. फोडा आणि झोडा, ही संकल्पना जरी ब्रिटिशांची असली, तरी त्या संकल्पनेचा पूर्ण फायदा आपलेच राजकारणी आता उचलतायत. जाती, धर्म, प्रथा इत्यादी गोष्टींचा विषारी वापर करून ते त्यांचे खिसे भरतात. त्यांच्या ऐषोरामासाठी विकले जातो ते आपण. आपणसुद्धा त्या भेदाभेदांमध्ये स्वतःच वर्चस्व आणि आपली श्रेष्ठता शोधायचा प्रयत्न करतो. ही भेदाभेद, कटूता जोपर्यंत या भारत देशात जिवंत आहे, तोपर्यंत आपण कोणाचे ना कोणाचे तरी गुलाम म्हणूनच जगणार. अल्पशा फायद्यासाठी अशा शंभर स्वराज्यरक्षक संभाजींना आपण अजून औरंगजेबांसारख्या शत्रूच्या हाती देऊ.
बाहेरचा शत्रू संपवण्याआधी, आपासातलं शत्रूत्व मिटवणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय स्वराज्य कधीच सुराज्य होणार नाही.
P.S: As the philosopher and historian Will Durant has rightly said, “A great civilisation is not conquered from without, until it is destroyed from within.”