Saturday, June 14, 2025
Homeललितसंवेदनशील साहित्यिक... पी.व्ही. नरसिंह राव

संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव

आराधना जोशी

1999 सालचा एक रविवार… रविवार असूनही त्या दिवशी मुंबईत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. अल्फा मराठीसाठी (आताचे झी मराठी) काम करणारे सगळेच रिपोर्टर त्यावेळी फिल्डवर काम करत होते. खरंतर, रविवारच्या दिवशी एवढं काम आणि त्याचं वार्तांकन, तोपर्यंतच्या माझ्या नोकरीत कधीच बघितलं नव्हतं. मी स्वतः त्या दिवशी जवळपास पाच घडामोडींचे रिपोर्टिंग करून साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता ऑफिसला पोहोचले.

संध्याकाळच्या सातच्या बातमीपत्रासाठी कोणत्या बातम्या लगेच पाठवायच्या आणि कोणत्या बातम्या रात्री 9 वाजताच्या बातमीपत्रात घ्यायच्या, याबद्दल बुलेटिन प्रोड्युसरशी बोलणं सुरूच होतं; आणि आमच्या पॉलिटिकल बीट कव्हर करणाऱ्या मंदार परबने अचानक मला बोलावून घेतलं. हातात एक निमंत्रणपत्रिका देत “हा एक कार्यक्रम आहे, आता 6 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. माजी पंतप्रधान पी. व्ही.  नरसिंह राव तिथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. तू जा या कार्यक्रमाला आणि रिपोर्टिंग करून ये.” क्षणभर मला काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचलंच नाही. हातातल्या बातम्या पूर्ण करू की, या कार्यक्रमाला जाऊ? मनात प्रश्न आलाच. अर्थात, तो चेहऱ्यावरही उमटला असावा, कारण मंदारने लगेच घाईघाईने, “तुझ्या बातम्या मला दे, मी बघतो त्याचं काय करायचं ते! पण या कार्यक्रमाला तूच जाणार आहेस,” असं सांगितलं. मला कारणच कळत नव्हतं. राजकारणी माणसाच्या कार्यक्रमाचे रिपोर्टिंग मी का करायचं? आणि दिवसभर झालेल्या धावपळीमुळे आता काहीवेळ तरी शांतपणे बसावं, असं वाटतं होतं. काहीशा रागात आणि चरफडत मी माझ्या कॅमरामन, असिस्टंट आणि ड्रायव्हर अशा टीमबरोबर यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. रागाच्या भरात कार्यक्रम नक्की काय आहे, ते हातात निमंत्रणपत्रिका असूनही बघितलं नव्हतं.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले तर, त्यावेळच्या सगळ्या चॅनल्सचे प्रतिनिधी तिथे हजर. त्यावेळी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी सोडली तर, अल्फा मराठी हेच एकमेव मराठी भाषेतलं खासगी चॅनल होतं. त्यामुळे हिंदी, इंग्रजी भाषेतल्या चॅनल्सबरोबरच आपल्याला नरसिंह राव यांचा बाइट घ्यावा, लागेल याची जाणीव झाली. पण हेही नसे थोडके, असं म्हणत माध्यमांसाठी राखीव जागेमध्ये जाऊन बसले. आजूबाजूला बघत कोणकोण आहेत, याचा अंदाज घेतच होते तेवढ्यात नरसिंह राव कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले.

हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

पांढरी लुंगी, वर बुशशर्ट आणि दोन्ही खांद्यांवरून घेतलेली शाल अशा चिरपरिचित वेशातील माजी पंतप्रधानांचे दर्शन झाले. अक्षरशः पाच फुटांवर असलेल्या स्टेजवर ते स्थानापन्न झाले आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करण्याचा इशारा त्यांनी दिला. कार्यक्रम साहित्य क्षेत्राशी निगडीत होता, त्यामुळे नरसिंह राव भाषणाला जेव्हा उभे राहिले आणि अस्खलित मराठीत त्यांनी बोलायला सुरूवात केली, त्यावेळी सुखद धक्काच बसला.

भाषणात सुरुवातीला एक दोन वाक्यं मराठीत बोलतील मग इंग्रजीत भाषण करतील, असं बाकी चॅनलच्या सहकाऱ्यांची समजूत होती. पण, पाच मिनिटांनंतरही मराठीतच भाषण सुरू राहिलं, तेव्हा मात्र त्यांची पंचाईत झाली होती आणि मी आश्चर्याने आ वासला होता. साहित्याची किती खोलवर जाणीव त्यांना आहे, याचा प्रत्यय त्या भाषणात वारंवार येत होता आणि अचानक मला आठवण झाली की, केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या हरि नारायण आपटे यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे ‘अबला जीवितम्’ हा तेलुगू अनुवाद त्यांनी यशस्वीपणे प्रकाशित केल्याची.

मराठीतील अनेक उत्तम साहित्याचा त्यांनी तेलुगू भाषेत तसंच तेलुगू साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला. याशिवाय, विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे टोपण नावाने अनेक लेख प्रकाशित झाले. माजी पंतप्रधानांची ही बाजू आठवल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर आणखी दुणावला. एका खूप सुंदर कार्यक्रमाला मला पाठवल्याबद्दल मंदारचे मी मनोमन आभारही मानले.

कार्यक्रम संपल्यावर माजी पंतप्रधानांचा बाइट घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यातच मी अल्फा मराठीचा बुम पुढे सरकवला. नरसिंह राव यांनी त्या बुमकडे बघत मला जवळ येण्याबद्दल खूण केली. काहीसं टेन्शनच आलं… मी जवळ गेल्यावर ‘तू मराठी वाहिनीकडून आली आहेस? मग मी तुझ्याशी मराठीतून बोलतो. जरा थांबशील का? या बाकी वार्ताहरांशी बोलतो आणि मग शांतपणे आपण बोलू. चालेल नं? तुला उशीर तर नाही नं होणार?’ त्यांनी ‘चालेल नं’ असं विचारल्यावर ‘चालेल काय धावेल’ असं मनात म्हणत, ‘मी थांबते,’ असं त्यांना म्हटलं आणि बाजूला जाऊन शांतपणे उभी राहिले. आपण या मुलाखतीत मराठी साहित्यावरच त्यांना प्रश्न विचारायचे, हे मी नक्की केलं. या दरम्यान आमच्या कॅमेरामनने या मुलाखतीसाठी स्वतंत्रपणे बसून बोलता येईल, अशी जागा निवडली, तिथला सगळा सेटअप केला.

हेही वाचा – नवी पिढी, ब्रॅण्डेड पिढी

अवघ्या 10 मिनिटांमध्ये बाकी चॅनल्सना एकत्रितपणे बाइट देऊन त्यांनी मला पुढे बोलावलं. “चला, आता तुझ्याशी बोलतो,” असं त्यांनी मला सांगितल्यावर कॅमेरामनने केलेल्या सेटअपकडे बोट दाखवत मी, ‘आपण तिथे जाऊन मुलाखत रेकॉर्ड करूया का?’ असं विचारलं. त्यावर कोणतेही आढेवेढे न घेता ते स्टेजवरून उठले आणि खाली उतरून समोर मांडलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.

आमची मुलाखत सुरू झाली. मराठी साहित्याची त्यावेळची वाटचाल, विविध भाषांमधून मराठीत होणारे अनुवाद, मराठी साहित्यात होणारी स्थित्यंतरे अशा मुद्द्यांवर नरसिंह राव यांनी अस्खलित मराठीतून मुलाखत दिली. मुलाखतीत आवश्यक तिथे विनोदाचाही त्यांनी वापर केला. राजकारणात असले तरी, ते किती विद्वान व्यक्ती आहेत, याची जाणीव मला तर झालीच, शिवाय त्यांना भाषा कोविद असं का म्हणतात, हे सुद्धा पुरेपूर पटलं. मुलाखत संपल्यावर ‘तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नं? की अजून काही बाकी आहे?’ अशीही त्यांनी विचारणा केली. ‘तुझ्यामुळे खूप दिवसांनी मराठीत आणि तेसुद्धा साहित्यावर बोललो. नाहीतर राजकारणाशिवाय हल्ली कोणी काहीच विचारत नाही,’ असंही म्हणाले.

‘तुला साहित्याची इतकी जाणीव असेल याची मला कल्पना नव्हती. हल्लीची पिढी वाचन करत नाही. तुला आहे का वाचनाची आवड?’ असं विचारत, नवीन कोणती पुस्तकं मी वाचली आहेत किंवा सध्या वाचतेय याचीही विचारणा केली. आपण कोणते मराठी पुस्तक नुकतेच वाचून संपवले याचीही मला माहिती दिली. नंतर आमचा निरोप घेऊन ते निघाले.

त्या दिवशी ऑफिसमध्ये पोहोचले आणि मंदारला भेटून त्याला खास थँक्स म्हटलं‌. “जाताना तुझ्यावर प्रचंड चिडून निघाले होते मी. पण तिथे गेल्यानंतर जो काही अनुभव मिळाला तो आयुष्यभर न विसरता येणारा होता,” असंही त्याला म्हटलं. खरंच त्याच्यामुळे त्या दिवशी राजकारणी किंवा माजी पंतप्रधान यापेक्षाही चोखंदळ साहित्यिकाशी आपली भेट झाली, हा आनंद अवर्णनीय होता. साहित्याचा अभ्यास करणारीला आणि काय हवं, नाही का?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!