जी. भालचंद्र
जवळपास सर्वांचाच बँकेशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठे तरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतो. बँकांधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा दुसरा अनुभव आता कथन करीत आहे.
हा अनुभव महाराष्ट्रीयन कुटुंबांना एकेकाळी जवळची वाटणाऱ्या एका राष्ट्रीयीकृत बँकेबाबतचा आहे.
काही वर्षांपूर्वी माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघांनी या बँकेच्या आमच्या घराजवळील शाखेत लॉकर उघडण्याचा निर्णय घेतला. लॉकर उघडण्यासाठी करावयाचे सर्व सोपास्कार आम्ही बँकेत पूर्ण केले. त्याचवेळी आम्ही बँकेला असे निर्देश दिले होते की, आमच्या लॉकरचे वर्षाचे भाडे आमच्या जॉइंट अकाऊंटमधून वळते करण्यात यावे. पहिली चार-पाच वर्षं लॉकर भाडे आमच्या खात्यातून नियमितपणे वळते करण्यात येत होते.
सप्टेंबर 2024मध्ये मी लॉकर उघडण्यासाठी बँकेत गेलो असताना माझे लॉकर सील केलेले आढळले आणि त्यावर “लॉकर रेंट इन अरिअर्स” असा स्टिकर लावलेला होता. याबाबत मी जेव्हा बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या कॉम्प्युटरवर याबाबतची माहिती घेतली आणि लॉकरचे भाडे थकलेले नाही, याची खातजमा करून घेतली. नंतर त्या लॉकरचे सील काढण्यात आले आणि मला लॉकर उघडण्याची परवानगी दिली.
मी घरी आल्यानंतर मला चैन पडेना की, हे असे का झाले? म्हणून मी माझ्या पासबुकमधील नोंदणीचा आढावा घेतला. तेव्हा मला असे आढळले की, आर्थिक वर्ष 2023-24 तसेच 2024-25 या दोन वर्षांचे लॉकरचे भाडे माझ्या खात्यातून वळते करण्यात आले नव्हते. म्हणून मी बँकेत पुन्हा चौकशीसाठी गेलो. चौकशी खिडकीवरील व्यक्तीस याबाबत सांगितले असता, त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की, असे शक्यच नाही. एकदा तुम्ही बँकेला निर्देश दिले असताना बँक न चुकता त्या निर्देशाचे पालन करते. म्हणून मी बँकेच्या मॅनेजरला भेटलो. त्या मॅनेजरने त्यांच्या क्लार्कला परत चेक करण्यासाठी सांगितले. त्या क्लार्कने कॉम्प्युटरवरती काहीतरी चेक करून मला सांगितले की, माझे केवायसी अपडेट नसल्यामुळे बँकेने पैसे कापलेले नाहीत. मला हे समजेना की, बँकेला माझ्याकडून पैसे घ्यायचे होते तर, त्यासाठी केवायसीची काय गरज होती?
सुदैवाने त्यावेळी माझ्या मोबाइलमध्ये त्या बँकेचे App होते. त्या बँकेच्या Appमध्ये असलेल्या केवायसीबद्दलची माहिती मी बघितली आणि माझ्या लक्षात आले की, माझे केवायसी अजून चार वर्षांनी अपडेट करायचे आहे. ही गोष्ट मी त्या क्लार्कच्या नजरेस आणून दिली. तेव्हा त्या क्लार्कने इतर काही सबबी सांगून मला टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु मी जेव्हा त्याच्या डोक्यावर बसून मला आजच याबद्दल खुलासा हवा, असे सांगितल्यानंतर त्याने मला दोन-तीन दिवसांनंतर परत येण्यासाठी विनंती केली.
दोन-तीन दिवसानंतर मी जेव्हा त्या क्लार्कला भेटण्यास गेलो तेव्हा, त्याच्या कपाळावरती खूपच आठ्या होत्या. पण मी त्याचा पिच्छा सोडला नाही. त्याचवेळी मी बँकेच्या कस्टमर केअरवरती एक ईमेल पाठवून माझ्या तक्रारीचा पाठपुरावा करणे चालू केले. बँकेच्या मॅनेजरला दर दोन-तीन दिवसांनी भेटण्याचा सपाटा सुरूच ठेवला.
शेवटी तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर बँकेने माझ्या लॉकरच्या दोन वर्षाच्या भाड्याची रक्कम माझ्या खात्यातून वळती केली. पण हे करत असताना त्यांनी जवळजवळ 1500 रुपये ज्यादा वळते करून घेतले. याबाबत विचारणा करण्यासाठी बँकेत गेलो असताना बँक मॅनेजरने याबाबत पूर्णपणे अनभिज्ञता दर्शवली आणि मला संबंधित ‘बॅक ऑफिस’कडे चौकशी करण्याचा सल्ला दिला.
शेवटी वैतागून मी बँकेच्या कस्टमर केअरवर ई-मेल करून ज्यादा कापलेल्या पैशांबद्दल खुलासा करण्यास विनंती केली. पहिले दोन ते तीन आठवडे त्यांच्याकडूनं कोणताच खुलासा करण्यात आला नाही. शेवटी मी बँकेला भारत सरकारच्या सीपीजीआरएएमएसकडे (CPGRAMS) जाण्याचा इशारा दिल्यानंतर बँकेने ते कापलेले जादा पैसे माझ्या खात्यात जमा केले.
दुर्दैवाची बाब अशी की, मी त्यांना पाठवलेल्या ई-मेलबद्दल बँकेकडून आजपर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आर्थिक वर्ष 2025-26साठी लॉकरचे आगाऊ भाडे एप्रिल 2025मध्ये अकाऊंटमधून वळते करून घेणार आहोत, असा एसएमएस मला मार्च 2025मध्येच मिळालेला आहे.
…तेव्हा बँक ग्राहकांनो सावधान!