अर्चना कुलकर्णी
ऑगस्ट महिन्यातला शेवटचा आठवडा होता. खूप पाऊस पडत होता… दुपारी तीन-साडेतीनची वेळ होती.. मी माझ्या कार्यालयात दुपारचा चहा घेत घेत, टेबलावरची पत्रे पाहत होते. त्याच वेळी टेलिफोन खणखणला. रिसिव्हर उचलून मी बोलू लागले,
“हॅलो…!”
“नमस्कार मॅडम…! मी, भाटे. समीर भाटेचा डॅडी बोलतोय. मॅडम, अकरावीचे क्लासेस सुटले का?”
“हो, केव्हाच सुटले. का हो, काय झालं?”
“समीर अजून आला नाही घरी म्हणून…!”
“मित्राकडे गेला असेल. येईल लवकरच. काळजी नका करू. तो घरी आल्यावर मला कळवा मात्र.”
मिस्टर भाटेंना धीर देऊन मी रिसिव्हर खाली ठेवला.
समीर भाटे…! मी आठवू लागले, आणि आठवले. त्याचे असे झाले, साधारण जुलैचा दुसरा आठवडा होता तो. अकरावीच्या ऍडमिशनस् सुरू होत्या त्यावेळी. मिस्टर भाटे म्हणजे समीरचे बाबा, समीरच्या ऍडमिशनसाठी ऑफिसमध्ये आले होते. समीरही त्यांच्याबरोबर होता. मला आठवते, समीर निर्विकार चेहऱ्याने तर मिस्टर भाटे खूपच उत्साहाने केबिनमध्ये आले होते.
हेही वाचा – शिक्षा नको, सुसंवाद हवा
आमच्याकडे ऍडमिशन देण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले होते. फक्त मॅनेजमेंट कोट्यातील दोन जागा शिल्लक होत्या. मिस्टर भाटेंनी समीरचे मार्कशीट मला दिले. मी मिस्टर भाटेंना खुर्चीत बसण्याची विनंती करून मार्कशीट हातात घेतले. एकूण गुण 50% होते. गणित आणि सायन्समध्ये तर फारच कमी गुण होते. मी समीरला ऑफिसबाहेर थांबायला सांगितले आणि मिस्टर भाटेंना म्हटले,
“हे बघा मिस्टर भाटे…! समीरला मी ऍडमिशन देऊ शकते, काहीच प्रश्न नाही; पण माझ्या मते तुम्ही त्याला सायन्सला पाठवू नका. त्याच्या मार्कशीटवरून त्याला सायन्सचा अभ्यास झेपेल, असं मला नाही वाटत.”
“म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? एसएससीला जरा कमी मार्क मिळाले म्हणजे त्या मुलाला बुद्धीच नाही?” भाटे ताडकन् बोलले.
“नाही, तसं नाही… मिस्टर भाटे… बुद्धीची मोजमाप करायला एसएससीचे मार्कस् हा एकमेव मार्ग मुळीच नसतो. आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे. प्रत्येक मुलाचा कल वेगळ्या-वेगळ्या विषयांत असतो. त्याच्या आवडत्या विषयात तो नक्कीच पारंगत होतो. चांगले गुण मिळवतो.”
थोडे थांबून विषयाचा ट्रॅक बदलून मी पुढे म्हणाले, “सायन्सला गणित आणि सायन्स खूप कठीण असते. ज्यांना या विषयांत रस असतो त्यांना ते चांगले समजते. समीरच्या मार्कशीटवरून मला असे वाटते की, त्याला गणित आणि सायन्समध्ये फारसा रस नाहीये.”
“तुम्ही त्याच्या मार्कांवर जाऊ नका मॅडम. अहो, त्याने अभ्यासच केला नव्हता. आता मी स्वतः त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देईन. चांगल्या क्लासला घालीन. ती सर्व जबाबदारी माझी. तुम्ही प्लीज ऍडमिशन द्या,” राग गिळून मिस्टर भाटे उत्साहात म्हणाले.
हेही वाचा – संपत्ती…. शैक्षणिक संस्थेची
मी समीरला केबिनमध्ये बोलावून घेतले. “समीर, तुला नक्की सायन्स व्होकेशनलकेला अॅडमिशन घ्यायची आहे का?” समीर काहीच न बोलता खाली मान घालून उभा राहिला.
“अहो, त्याला काय विचारता? त्याला काय समजते?” मिस्टर भाटे लगेच बोलले.
“ठीक आहे,” असं म्हणून मी समीरच्या फॉर्मवर सही केली.
माझ्या डायरीत समीरचे नाव आणि त्याच्या वडिलांचा मोबाइल नंबरही लिहिला. ट्रस्टींची चिठ्ठी आणल्यामुळे त्यापेक्षा जास्त विरोध करणे, मला योग्य वाटले नाही.
“काऊंटरवर फी भरा आणि उद्यापासून त्याला कॉलेजमध्ये पाठवा. बाकी सर्व माहिती काऊंटर मिळेल.” असे म्हणून मी त्यांना नमस्कार केला.
“थँक्यू मॅडम.” असं म्हणत, मोठी लढाई जिंकल्याच्या थाटात मिस्टर भाटे समीरला घेऊन केबिनच्या बाहेर पडले.
समीरच्या क्लास-टीचर राणेंना मी सांगितले, “समीरकडे विशेष लक्ष असू द्या. त्याला सायन्स आणि गणित जमते का पहा. पंधरा दिवसांनी त्याचा रिपोर्ट मला द्या.”
क्लास-टीचरकडून बरोबर पंधरा दिवसांनी मला समीरचा रिपोर्ट मिळाला. तो वाचून आणि ऐकून मी लगेच समीरच्या वडिलांना फोन केला. त्यांना म्हटलं, “नमस्कार मिस्टर भाटे…! मी कुलकर्णी बोलतेय.”
“नमस्कार मॅडम…! बोला काय म्हणताय?” खूप उत्साहात बोलत होते मिस्टर भाटे.
“सॉरी, मी कामाच्या वेळेत तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण विषयच महत्त्वाचा आहे. मला वाटते की, समीरला सायन्स व्होकेशनलचा अभ्यास जमत नाही. गेल्या पंधरा दिवसांच्या ऑब्झर्वेशनचे रिपोर्ट माझ्याकडे आले आहेत. त्यावरून स्पष्ट दिसते की, समीरला वर्गात विषयाचे आकलन नीटसे होत नाही. तसेच, तो नेहमी नाराज असतो. प्रॅक्टिकल्स देखील उत्साहाने नाही करत. मिस्टर भाटे, आधीच समीरला गणित आणि सायन्समध्ये मार्क कमी आहेत. त्यात आपण त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला सायन्सकडे पाठवलंय. त्याचे वर्गात नीट लक्ष नसतं. या परिस्थितीत त्याला विषय समजायला अजून कठीण होईल. मला वाटतं, तुम्ही अजूनही विचार करा. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला शाखा, विषय निवडू द्या. त्याला जर हा अभ्यास जमला नाही तर, त्याचा आत्मविश्वास कमी होईल हो.”
“मॅडम, तुम्ही उगाचच फार काळजी करत आहात. आय विल टेक केअर. थँक्यू.”
“वेलकम…” असं म्हणून मी रिसिव्हर खाली ठेवला आणि तो विषय तिथेच संपला.
हे सर्व प्रसंग काही क्षणांतच माझ्या डोळ्यासमोरून सरकले. मी वर्तमानात आले. क्लास-टीचर राणे सरांशी याबाबत फोनवरून बरीच चर्चा केली आणि समीरच्या मित्रांची नावे विचारली. ऑफिस रेकॉर्डवरून त्यांच्या घरचे नंबर मिळवले आणि त्यांना फोन केला. सर्वजण घरी होते किंवा क्लासला गेले होते, पण कॉलेजमधून घरी पोहोचले होते. समीरच फक्त घरी पोहोचला नव्हता. समीरच्या वडिलांकडून त्याचा मोबाइल नंबर घेतला त्यांनी आणि आम्हीही त्याला कॉल्स केले, परंतु त्याचा मोबाइल फोन बंद होता. समीरचा, त्याच्या बाबांचा तसेच मित्रांचे मोबाइल फोन मी माझ्याकडे नोट करून घेतले. सायंकाळी सहा वाजता मी घरी जाण्यास निघाले. रात्री आठ वाजता समीरच्या बाबांना फोन केला. समीर अद्याप घरी आला नव्हता, त्याचा मोबाइल फोन अजूनही ‘स्विच ऑफ’ येत होता. पोलिसांकडे रिपोर्ट करण्यासाठी ते पोलीस स्टेशनला गेले होते. समीर घरी आला की, मला लगेच कळवा, असे त्यांना सांगून मी घरातल्या कामाकडे वळले. खरे तर, कशातच लक्ष लागत नव्हते.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीपेक्षा खूप लवकरच शाळेत गेले. समीरचे शिक्षक आणि मित्र, सर्वांशी चर्चा केली; पण फारसे काहीच समजले नाही. तो फारसा कोणात मिसळतच नव्हता .त्याच्याबरोबर नेहमी असणाऱ्या त्याच्या मित्राला देखील तो कुठे गेला, त्याबाबत काहीच माहिती नव्हते. राणेंना मी दुपारी दोन वाजता घरी जायला सांगितले. ते सकाळी सात वाजता कामावर आले होते. अतिशय अस्वस्थ मनस्थितीत दिवस जात होता. अत्यंत महत्त्वाच्या सह्या करणे एवढेच काम मी करत होते.
दुपारी तीन वाजता समीरच्या बाबांचा फोन आला, “मॅडम…! समीर सापडला. सुखरूप आहे, काळजी करू नका. मी येतो उद्या ऑफिसमध्ये.”
माझ्या जीवात जीव आला. मनावरचे फार मोठे दडपण कमी झाले. मी लगेच राणेंना कळवले. दुसऱ्या दिवशी समीरचे वडील ऑफिसमध्ये आले. खूपच थकलेले आणि हिरमुसलेले दिसत होते. मी त्यांना लगेच विचारले, “या मिस्टर भाटे. कसा आहे समीर?”
“छान आहे. आराम करतोय घरी. समीर त्याच्या मित्राकडे गेला होता. त्याने दुपारी त्याचा मोबाइल फोन बंद ठेवला होता. त्याच्या मित्राचा फोन तो वापरत होता. मित्र दुपारी क्लासला गेल्यावर काही वेळाने तो मोबाइल डिस्चार्ज झाला. त्या मोबाइलचा चार्जर सापडला नाही म्हणून एका फोनसाठी स्वतःचा मोबाइल त्याने सुरू केला. पोलीस त्याच्या मोबाइलवर नजर ठेवूनच होते. ज्या क्षणी त्याने त्याचा मोबाइल सुरू केला, त्याच क्षणी पोलिसांना त्याचे लोकेशन कळले .
हेही वाचा – आशिष…. एक उत्तम विद्यार्थी
“ठीक आहे ना? ते सर्वात महत्त्वाचे. सध्या त्याला काहीच विचारू नका,” मी त्यांना म्हटले.
“नाही, आम्ही त्याला काहीच विचारले नाही की, रागावलोही नाही. तोच खूप रडला आणि एकच वाक्य त्याच्या आईला बोलला, “मला सायन्स नाही जमत, खूप टेन्शन येतंय गं…! मी काय करू?”
एकच समीर भाटे असता तर बरे झाले असते. दुर्दैवाने, त्यावेळी जी परिस्थिती होती तशीच आजही आहे; आपल्याभोवती अनेक समीर असतात जे आई-वडिलांच्या इच्छेसाठी, त्यांच्या दबावतंत्रामुळे आवड नसलेल्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. त्यातील काही जण बंडखोरी करून उशिरा का होईना, योग्य मार्ग निवडतात. हे सर्वांनाच जमत नाही. पण हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे, हे नक्की.