डॉ. किशोर महाबळ
आत्मविश्वास असलेल्या आणि उत्तम पाठांतर करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची सहसा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षक निवड करतात. असे विद्यार्थी मग अशा स्पर्धामध्ये शिक्षकांनी लिहून दिलेली भाषणे पाठ करून सादर करतात आणि बक्षिसे जिंकतात. याच पद्धतीने बक्षीस जिंकण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना मग वक्तृत्व कला सोपी वाटू लागते. काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच भाषिक बुद्धिमत्ता असते. असे विद्यार्थी संवाद कौशल्ये आणि वक्तृत्व कला सहजगत्या शिकू शकतात, त्यांना शिकण्याची इच्छाही असते. मात्र, अशा विद्यार्थ्यांना पाठ केलेले भाषण म्हणून दाखविणे म्हणजेच वक्तृत्व असे वाटू लागले तर, मात्र त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असते. ते कसे करायचे याचा आता विचार करूया.
वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी भाषिक बुद्धिमत्ता असणे पुरेसे नसते तर त्या बुद्धिमत्तेचा विचारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक विकास करणे गरजेचे असते, हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी उत्तम सद्विचारांचा संस्कार, विविध विषयांची माहिती, कोणत्या तरी एका विषयाचे सखोल ज्ञान, कमीतकमी एका भाषेवर प्रभूत्व, भाषेचा योग्य उपयोग करण्याची क्षमता लागते. याशिवाय, आत्मविश्वास, स्वतंत्रपणे विचार करता येणे, जीवनाकडे तसेच विविध विषयांकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन असणे हेही गरजेचे असते. श्रोत्यांची मन:स्थिती ओळखून प्रभावीपणे आपली मते मांडता यावी लागतात. सभ्य भाषेत आपल्या विरोधकांची मते खोडून काढण्याची क्षमता विकसित करावी लागते. प्रसंगावधान राखून, प्रसंगोचित मुद्देसूद कसे बोलायचे, हेही शिकावे लागते. इतरांचे विचार, दृष्टिकोन, मते समजून घेण्याची क्षमता असावी लागते. आपले विचार मुद्देसूदरित्या मांडता येणे गरजेचे असते. हे सोपे नाही, हे विद्यार्थ्यांना सांगायला हवे.
या सर्वच गोष्टी शालेय जीवनात शिकता येणार नाहीत. त्यासाठी कदाचित आयुष्यभर प्रयत्न करावा लागेल. शिवाय, या सर्व गोष्टी काही प्रमाणातच शिकविता येतात. उत्तम वक्तृत्वासाठी म्हणूनच व्यक्तिगत स्तरावर खूप तयारी करावी लागते. वक्तृत्वकला शिकण्यासाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते. याशिवाय, या सर्व क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही छोटे उपक्रमही आपण वेळोवेळी सुचवू शकतो.
उत्तम वक्ता होण्यासाठी सर्वप्रथम नामवंत वक्त्यांची भाषणे ऐकणे उपयुक्त ठरते. असे वक्ते भाषण कसे देतात, मुद्दे कसे मांडतात, मुद्यांचा सोदाहरण विस्तार कसा करतात, कोणती उदाहरणे देतात, म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, कविता यांचा भाषण रंगविण्यासाठी कसा आणि किती उपयोग करतात, शब्द तसेच वाक्ये कशी उच्चारतात, आपले भाषण श्रोत्यांना आवडावे यासाठी काय करतात, हे सारे विद्यार्थ्यांनी अभ्यासले पाहिजे. या भाषणांतून त्यांना काय आवडले, काय नाही आवडले, याचाही विचार करावा, हे आपण विद्यार्थ्यांना सुचवायचे आहे.
हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचा अभ्यास करू द्या!
चांगले भाषण हे माहितीपूर्ण आणि आशयसंपन्न असते. असे भाषण देता येण्यासाठी सातत्याने विश्वकोशासारख्या संदर्भग्रंथांचे तसेच विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथांचे अध्ययन करणे उपयुक्त ठरते. विविध विषयांचे वाचन करतानाच एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यासही केला पाहिजे. श्रेष्ठ कथा, निबंध, कविता, कादंबऱ्यांचे वाचनही करावे. ताज्या घडामोडींची माहिती होण्यासाठी नियमितपणे वर्तमानपत्रांचे वाचनही केले पाहिजे. या वाचनामुळे माहिती, नवे विचार, नव्या संकल्पना, नवा दृष्टिकोन यांचा परिचय होईल. याशिवाय भाषेचा प्रभावीपणे उपयोग कसा करता येतो, हेही लक्षात येईल. हे सारे वाचन करताना आपण जे वाचत आहोत, ते आपल्याला समजते आहे, याची खात्री करून घेतली पाहिजे. समजले नसल्यास पुन्हा वाचून समजून घेतले पाहिजे. शक्य तेव्हा वाचलेले आठवून बघितले पाहिजे. वाचलेल्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. जे वाचले त्यातील आपल्याला काय आवडले आणि काय आवडले नाही. आवडले तर ते का आवडले? आणि आवडले नसेल तर का आवडले नाही? याचाही विचार करायला हवा. हे सतत करीत राहिल्यास चांगले भाषण करता येऊ शकेल, हे आपल्याला विद्यार्थ्यांना सुचवायचे आहे.
कोणी लिहून दिलेले भाषण पाठ करून म्हणून दाखविण्याऐवजी दिलेल्या विषयावर स्वतःच तयारी करून भाषण देणे योग्य असते, हेही विद्यार्थ्यांना सांगणे आवश्यक आहे. यामुळे दिलेल्या विषयासंबंधी भरपूर माहिती गोळा करण्याची, विषयासंबंधी मुद्दे काढून योग्य उदाहरणे शोधण्याची, उपलब्ध वेळेत काय बोलायचे हे निश्चित करण्याची तसेच अभ्यासाची सवय लागेल.
हेही वाचा – ‘वेगळ्या’ चित्रकारांचा शोध
जो वक्ता नेहमी आत्मपरीक्षण करतो तोच चांगले भाषण करू शकतो. आपल्या भाषणाबद्दल जो वक्ता समाधानी असतो, तो कधीच प्रगती करू शकत नाही. भाषणानंतर आत्मस्तुती न करता भाषणात जे सांगितले ते नीट सांगितले का, दिलेली उदाहरणे योग्य होती का, विषय नीट मांडला गेला का, भाषणात अजून काय सांगता आले असते, विषय मांडतांना काय चुकले, याचा विचार करण्याची तसेच या आत्मपरीक्षणातून लक्षात आलेल्या चुका पुढच्या भाषणात कटाक्षाने टाळण्याची सवय ज्या वक्त्याला असते, त्याची नेहमी प्रगती होते. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. शक्यतो आपले भाषण स्वतःच तयार केले पाहिजे आणि आपले बोलणे नीट मुद्देसूद असले पाहिजे, असा प्रयत्न होतकरू वक्त्याने नेहमी केला पाहिजे. त्यामुळे वक्तृत्व कला आत्मसात करणे सोपे जाईल, हे विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत असल्या तर ते आपली भाषिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतील.


