प्रदीप केळुस्कर
भाग – 1
साल 1980… मी दहावीत होतो. आमची एसएससी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार होती. आम्ही तालुक्याच्या गावाला राहात होतो. त्यामुळे आमच्याच शहरात एसएससी सेंटर होते. पण आमच्या तालुक्यातील अन्य शाळांमधील मुलांना आमच्या शहरात परीक्षेसाठी यावे लागायचे. मग अन्य शाळांतील मुले-मुली 7-8 जणांचा ग्रुप कोणीतरी ओळखीच्या घरात एक खोली घेऊन राहायचे. एखाद्याची आई सोबत जेवण करायला यायची. दरवर्षी आमच्या घरात कुठली ना कुठली मुले यायचीच. आम्हाला पण आनंद वाटायचा. ते दहा-बारा दिवस फार गजबलेले असायचे. त्या गावातील मुलांशी आणि पालकांशी आमचा घरोबा व्हायचा.
माझे वडील समाजात प्रिय. नोकरी सांभाळून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. समाजवादी विचारसरणी त्यामुळे साधे राहणे, पैशांच्या मागे न धावणे आणि सर्वांना मदत करणे हा आमच्या कुटुंबाचा बाणा. त्यामुळे तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या गावातील मुले परीक्षेच्या वेळी आठ-दहा दिवसांकरिता यायचीच. यंदा सुद्धा आजगांव, साळगांव भागातील सात मुली, तीन मुले आणि एका मुलीची आई आली. येताना तांदूळ, डाळ, वाटाणे, कुळीथ पीठी आणि थोडीफार भांडी घेऊन आली. जास्त काही भांडी लागली की, आमची वापरत. आम्ही एक पडवी त्यांच्याकरिता ठेवली होती. तेथे येऊन त्यांनी चूल मांडली आणि थोडीफार लाकडे, माडाची चुडते, पोई घेऊन त्यावर स्वयंपाक आणि आंघोळीला गरम पाणी करत.
आमच्या शाळेतील मी सर्वात हुशार आणि सर्व परीक्षांमध्ये जिल्ह्यात पहिला येणारा होतो. त्या मुलांना पण त्यांच्या शिक्षकांनी सांगितले होते, तुम्ही ज्यांच्याकडे परीक्षेसाठी रहायला जाताय, त्यांचा मुलगा जिल्ह्यात एक नंबर येणारा आहे. एवढेच नव्हे तर, पुणे बोर्डात पहिल्या काही नंबरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यापासून ही मुले दबून गेली होती. पण एक मुलगी मात्र बिनधास्त होती. याच मुलीची आई या मुलांसोबत आली होती. मी माझ्या खोलीत अभ्यास करत असताना त्या मुलीची आई त्या सर्व मुलांना माझ्या खोलीत घेऊन आली. मी वह्या, पुस्तके यांच्या गराड्यात बसलेला पाहून ती त्या मुलांना म्हणाली, ‘‘बघा, ह्यो कसो पुस्तका समोर घेऊन रात दिवस अभ्यास करता हां, नाय तर तुमी गजाली आणि सिनेमातली गाणी! काय तरी शिका हेच्याकडून.’’ अनोळखी गावात आलेली ती खेड्यातली मुले काय बोलतील यावर?
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी
पण एक मुलगी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. त्या सर्व मुलांत लक्ष वेधून घेणारी ही मुलगी होती खरी. तिला बघून माझ्याही हृदयात धडधड वाढली. त्या मुलीच्या आईने त्यांना फर्मान सोडले. ‘‘बसा हयसर आणि उद्याच्या पेपरमधला निदान पास होण्याइतक्या शिका हेच्याकडसून.’’ ती मुलं माझ्या अवती भवती बसली. पण ती मुलगी थेट माझ्या समोर येऊन बसली. मी पुस्तकातील सोपे सोपे प्रश्न, गाळांतरे सांगत होतो. जेणेकरुन किमान 35-40 मार्क मिळविणे कठीण जाऊ नये. पण ही माझ्या समोरील मुलगी मला विचलित करू लागली. या मुलीमध्ये काहीतरी विलक्षण आकर्षण होते. शेवटी एकदाची ती मुले गेली. मी माझा राहिलेला अभ्यास करू लागलो. पण आता माझे लक्ष लागेना. सतत त्या मुलीचाच चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला…
दुसऱ्या दिवशी परीक्षेला जाताना माझ्याबरोबर ही पण मुले निघाली. आता ही मुले धीट बनली होती. मुली एकमेकांत खुसूखुसू हसत होत्या. डोळे मिचकावत होत्या. त्या मुलीला माझ्यावरून चिडवत होत्या, हे माझ्या लक्षात येत होतं. ती मुलगी पण गालातल्या गालात हसत होती. कुठल्यातरी सिनेमातील गाणी मला उद्देशून म्हणत होती. एकंदरीत ही मुले अभ्यासात फार काही उजेड पाडणाऱ्यांपैकी नाहीत, हे लक्षात येत होतं.
हा रोजचा कार्यक्रम होता. हळूहळू त्या मुलांची नावे समजली. त्या मुलीचे नाव विजया हे पण कळले. तिचे बाबा हयात नव्हते. आईचे त्यांच्या गावात लहानसे हॉटेल आहे, हे समजले. तिच्या आईला सर्वजण सरू मावशी म्हणत असत. माझी पण ती सरू मावशी झाली. आम्ही परीक्षेला गेलो की, ही सरू मावशी माझ्या आईला घरात मदत करे. वेगवेगळे खाण्याचे पदार्थ करण्यात तिचा हातखंडा होता. चूनकापे, आंब्याचे रायते, कोळंबीचे लोणचे, शेवेचे लाडू हे मालवणी पदार्थ माझ्या आईला जमत नव्हते. ते सरू मावशीने आईला शिकवले. दोघांनी मिळून लिंबाचे, कैरीचे लोणचे घातले. पापड घातले. एकंदरीत माझी आई या सरू मावशीवर खूश होती. सायंकाळी बाबा घरी आले की, रोज त्यांना नवीन नवीन पदार्थ चाखायला मिळत होते.
पेपर संपला की, आम्ही मुले पण नवीन नवीन पदार्थ हादडत होतो. दिवस मस्त होते. मला पेपर सोपे जात होते. कारण माझा अभ्यास पक्का होता. विजया आणि बाकीची मुलं यथातथाच होती. पास झाली तरी काठावर होतील एवढी!
शेवटी एकदाची परीक्षा संपली आणि आम्ही वर्षभराच्या टेंशनमधून मुक्त झालो. आमच्या गावात तीन महिन्यांसाठी टुरिंग टॉकिज यायचे. यंदापण गणेश टुरिंग टॉकिजचा मुक्काम गावाबाहेर होता. तंबू सिनेमा, रोज दोन शो असत. तिकिटे माफक दरात असत. त्याकाळात काजू, कोकम, आंबे यांचा सीझन. त्यामुळे सर्वांच्या खिशात पैसे खुळखुळत. म्हणून तंबूतील सिनेमाला गर्दी होई. विजया आणि बाकीच्यांनी सिनेमाला जायची टूम काढली आणि मला पण बोलावले. आईने सुद्धा परवानगी दिली आणि आम्ही सर्वजण सिनेमाला गेलो. ऋषी कपूर, टिना मुनीम यांचा कुठला तरी सिनेमा होता. प्रेक्षकांना आत सोडायची वेळ झाली आणि ती मुले घुसून सर्वांत पुढे जाऊन जमिनीवर बसली. मी त्यांच्या मागून गेलो. तेव्हा ती मुले आधीच जागा अडवून बसली होती. त्यांनी विजयाच्या बाजूला मला जागा ठेवली होती. मी माझ्या जागेकडे गेलो, तेव्हा सर्व मुलांनी खुसूखुसू हसत विजयाची मस्करी करणे सुरू केले. विजयाला बहुतेक तेच हवे होते. तिने माझा हात पकडून मला खाली बसविले. मला अशा मुलींच्या सलगीची सवय नव्हती आणि आपल्या गावातील लोक माझ्याकडे पाहात असतील, या शंकेने मी लाजत होतो. पण विजयाला आणि या मुलांना कोण ओळखत नव्हते. त्यामुळे ती बिनधास्त हसत होते. नेत्रपल्लवी चालू होती. 15-16 वयाच्या मुलामुलींची गम्मत चालली होती. काळोख झाला आणि सिनेमा सुरू झाला. बाजूला बसलेली विजया मला टेकून बसली. हीरो-हीरॉइनचा प्रेमप्रसंग आला की, ती माझा हात दाबत होती. मला ते आवडत होते, पण आजूबाजूला कोण पाहत नाही ना? हे मी मागेपुढे मान करून पाहत होतो…
एकदाचा सिनेमा संपला आणि रात्रीच्या चांदण्यात आम्ही आमच्या घराकडे जायला निघालो. परीक्षेचे दडपण संपलेले आणि ऋषी कपूर – टिना मुनीम यांचे प्रेमप्रसंग पाहून चेकाळलेली ती मुले आता जोराजोरात सिनेमातली गाणी म्हणू लागली. मग कुणाला बॉबी सिनेमा आठवला. त्यातील प्रेम प्रसंगांचे रसभरीत वर्णने होऊ लागली. यात माझ्या बाजूला विजया होतीच. गाणे म्हणता म्हणता हळूच मला धक्का मारत होती. एकदाचे आम्ही घरी पोहोचलो. सकाळी जाग आली, तो विजया माझ्या खोलीत येऊन मला हलवून मला जागे करत होती. ‘‘उठ रे मनीष, आम्ही चल्लव!’’ ती हसत हसत हात हालवत बाहेर गेली. मी डोळे चोळत चोळत बाहेर आलो. सरू मावशी आणि विजयासह सर्वांची जाण्याची तयारी झाली होती. गोणत्यात भांडी भरली होती. सर्व मुलांच्या पिशव्या खांद्याला लावल्या होत्या. माझ्या लक्षात आले. आज सकाळच्या एसटीने सर्वजण त्यांच्या गावी जायचे होते. माझे आईबाबा पण बाहेर आले होते. त्या मुलांचा समवयस्कर म्हणून सर्वजण ‘मनीष’ ‘मनीष’ असा ओरडा करत होते. सरू मावशी म्हणाली, ‘‘अरे मनीष, दरवर्षी रामनवमीक आमच्या गावात मोठो उत्सव असता, मुंबई पुण्यापासून लांबलांबसून लोक येतत, मोठी जत्रा असता, देवाचो रथ आणि पालखी देवळाभोवती फिरता, तू ये एकदा आमच्याकडे, माझ्याच कडे रवाक ये… येशीत मां, आदल्या दिवशीच ये.’’
मी मान हलवली. सर्वजण जाणार विशेषतः विजया जाणार म्हणून मन खट्टू झाले. माझी आई सरू मावशीला म्हणाली, ‘‘तुम्ही होतात म्हणून घरात जाग होती, या अधी-मधी, आम्हीपण जत्रेला येऊ.’’ मंडळी गेली. माझे मन उदास झाले. गेले दहा दिवस आणि काल रात्रीचा सिनेमा चांदण्यातला परतीचा प्रवास पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत राहिला.
मला मेडिकलला जायचे होते. डॉक्टर बनून समाजातल्या गरीब रुग्णांची सेवा करता येते, हे मला माहीत होते. दहावीनंतर पुण्याला अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. एस.एस.सी. परीक्षेचा रिझर्ल्ट लागला आणि मी बोर्डात दहावा आलो. सर्व पेपरमध्ये माझे आईवडीलांसह फोटो आणि मुलाखती छापून आल्या. त्या विजया आणि इतर मंडळींचे काय झाले काही कळले नाही. त्या काळात फोन वगैरे काही नव्हतेच.
हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’
आता पुण्याला जायचे होते. जाण्याआधी विजया एकदा भेटावी अशी इच्छा होती. पण ते शक्य नव्हते. बाबांसोबत मी पुण्याला आलो. पुण्याला सदाशिव पेठेत माझे मामा राहात होते. मामांचा मी लाडका भाचा, शिवाय हुशार. मामा-मामी माझी वाट पाहत होते. तिथल्या जवळच्याच शाळेत मी अकरावीकरिता प्रवेश घेतला आणि अभ्यासात बुडालो. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स जोरात सुरू. आजूबाजूला खूप सुंदर मुली होत्या, पण माझे मन विजयाने केव्हाच जिंकले होते. अकरावी संपली, बारावी नंतर मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. त्याची तयारी म्हणून मी गावी न येताच पुण्याच्या एका क्लासमध्ये नाव घातले.
बारावीपण संपली आता रिझल्ट लागायला वेळ होता. मधल्या सुट्टीत मी दोन वर्षांनी गावी आलो. आई वडील वाट पाहत होते. आता मी अठरा वर्षांचा झालो होतो. मी आल्यानंतर आईने माझ्या आवडीचे अनेक पदार्थ करून घातले. दोन वर्षानंतर मी आमची बाग, बागेतली झाडे, वर्गातील मित्र यांना भेटत होतो. चार दिवसांनी रामनवमी होती. मला विजयाला भेटण्याची ओढ होती. सरू मावशीने रामनवमीला येण्याच्या दिलेल्या आमंत्रणाची आठवण होती. मुंबईहून माझा आतेभाऊ अमर पण सुट्टीत आला. त्याची माझी लहानपणापासूनची गट्टी. तो आल्यावर मी त्याला म्हटले, सरू मावशीच्या गावी रामनवमीला जाऊया. तो पण खूश झाला. आईबाबांची परवानगी घेतली आणि आम्ही एसटीने रामनवमी दिवशी त्यांच्या गावी गेलो.
क्रमश:
मोबाइल – 9422381299


