सुनीता मुकुंद
शिवमहिम्नस्तोत्र हे गंधर्वराज पुष्पदंत याने रचले आहे. पुष्पदंत याचे दात कुंदकळी सारखे, शरीर सुंदर, गुणभक्ती ऐश्वर्य संपन्न अशी होती. त्यांची गणना परम शिवभक्त अशी होते. पुष्पदंत संवत पूर्व 1480 मध्ये होऊन गेला इतिहासकार त्याला घडवी समाजाचा मानतात. पण तसा आधार मिळत नाही.
भगवान शिवशंकरांनी जेव्हा राक्षसांशी युद्ध केले तेव्हा त्यांच्या घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्यातून “वास्तूपुरुष” निर्माण झाला. वास्तूपुरुषाची स्थापना घराच्या मध्यभागी कोठीघर जेथे असते तेथे करावी, असा संकेत आहे. वास्तूशास्त्र हे शिवाच्या ऐश्वर्य संपन्नतेतून निर्माण झालेले आहे. वास्तूपुरुषाच्या कोठ्यांमध्ये (कक्ष) सात देवांची स्थापना केली जाते. ते सात देव म्हणजे नंदी, सुग्रीव, पुष्पदंत, वरूण, असुर, शेष आणि पापयक्ष.
हा पुष्पदंत नावाचा गंधर्व प्रतिदिन एका राजाच्या बागेतून फुले चोरून नेत असे. राजाला चोराचा पत्ता लागत नव्हता म्हणून त्याला वाटले की, कोणीतरी गुप्तशक्ती असलेला चोर असावा. तो राजा मोठा शिवभक्त होता. त्याने ही बाग फुले तोडण्यासाठी आणि त्यांचा वापर भगवान शिवाची दररोज पूजा करण्यासाठी करण्यासाठी विकसित केली होती. दुसऱ्या दिवशी आपल्या बागेचे रक्षण करण्यासाठी राजाने आणखी पहारेकरी नेमले…
चोराच्या शक्तीचा नाश करावा म्हणून राजाने बागेमध्ये शिवनिर्माल्य टाकले. निर्माल्य म्हणजे देवांना श्रद्धेने अर्पण केलेल्या वस्तूंची, पूजा झाल्यानंतर ते विसर्जन करायचे आधी, त्यावरील एका वस्तूचा वास घेऊन, उजव्या खांद्यावरून ते पाठीमागे टाकायचे असते. यात कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये. परंतु पुष्पदंतकडून बागेत चोरी करताना त्या निर्माल्याचे उल्लंघन झाल्याने पुष्पदंतची शक्ती क्षय झाली. तेव्हा आपली चूक लक्षात आल्यावर त्याने शंकराची कृपा व्हावी, याकरिता शिवमहिम्न स्तोत्राची रचना केली आहे. तो भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता.
आपली शक्ती परत मिळविण्यासाठी पुष्पदंतने भगवान शिवाच्या नावाने एक श्लोक रचला. पुष्पदंत गंधर्व असल्याने जन्मजात गायन वादन संगीत नृत्य वगैरे कलांमध्ये निपुण होता. त्यामुळे या स्तोत्राची रचना शब्द मधुर, तालबद्ध, हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण आहे. तो श्लोक ऐकायला खूप सुंदर होता… जेव्हा भगवान शिव यांनी तो श्लोक ऐकला तेव्हा ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी गंधर्वांना तत्परतेने क्षमा केली. या स्तोत्रावर शिवशंकराने देवी सरस्वतीच्या सहकार्याने अर्धनारी नटेश्वर (स्त्री कोमल, पुरुष कठोर रूपात) नर्तन करून सर्व विश्व आणि आसमंत प्रेम तसेच भक्ती भावाने भरून टाकलं. हा श्लोक सुंदर विचारांनी आणि अर्थांनी भरलेला आहे.
(संग्रहित माहितीच्या आधारावर)