स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मसाल्याच्या रस्सेदार भाज्या, कोथिंबरीची चटणी, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी या टिप्स वापरून पाहा.
- रस्सा किंवा सांबारावर लालभडक तवंग हवा असेल, पण तिखटपणा कमी हवा असेल तर, तेलाची फोडणी करून त्यात थोडा टोमॅटो सॉस आणि एक चमचा लाल तिखट घालून परतावे. नंतर त्यावर उकळते पाणी ओतावे. तेल कमी घालून तवंग छान येतो.
- हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची चटणी करताना वेळेवर घरात खोबरे नसेल तर, कच्च्या बटाट्यावरचे साल काढून तो किसावा आणि चटणीत टाकावा. स्वादात फरक पडत नाही. चटणी चांगली लागते आणि वेळवर काम भागते.
हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर…
- भाजीपाला साफ करून वर्तमानपत्रात गुंडाळून नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवावा. दोन आठवडे सहज ताजा राहतो.
- कोथिंबीर फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत किंवा जाळीच्या डब्यात ठेवली तरी लवकर खराब होते. त्यापेक्षा स्टीलच्या डब्यात खाली-वर वर्तमानपत्राचा कागद दुहेरी करून घातल्यास ती खूप जास्त दिवस टिकते. कारण बाष्पीभवनामुळे सुटणारे पाणी वर्तमानपत्राच्या कागदाने शोषून घेतले जाते. डबा बंद करून ठेवावा.
- फेब्रुवारीपर्यंत भाज्या स्वस्त असतात. त्या वेळी गाजराचा कीस, कोथिंबीर, हरभऱ्याची कोवळी पानं, कोबी बारीक चिरून, मेथी वाळवून ठेवता येते. तसेच, हिरव्या मिरच्यांवर मिठाचे गरम पाणी ओतून नंतर त्या वाळवल्यास त्याचा नंतरही उपयोग करता येतो.
- मसाल्याच्या रस्सेदार भाज्यांमध्ये (चना मसाला, मटर मसाला, मटण, चिकन इत्यादी) तीन किंवा चार लवंगा आणि काबुली चण्याएवढ्या जायफळाची बारीक पूड करून कोथिंबिरीबरोबर घालून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाजी पाचक, सुवासिक होते आणि रंग आकर्षक येतो!
हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स
- अळूची वडी वाफवून न कापता अशीच दोऱ्याने बांधून फ्रीजमध्ये ठेवली असता 25 ते 30 दिवस टिकते.
- सॅण्डविच करताना नारळ-पुदिना चटणीऐवजी पालकाची चटणी लावली तर गॅसेस होत नाहीत. पालकाची चटणी भरपूर होते, तसेच पौष्टिकही. ती चार-पाच दिवस फ्रीजमध्ये टिकते. पालकाच्या चटणीत हिरव्या मिरच्या, एक लिंबू, साखर, मीठ, डाळं, जिरे चवीपुरते घाला. यात डाळं घातल्यामुळे ती पौष्टिक होते, टिकते. तसेच, लिंबू आणि जिरे यामुळे पालकाचा उग्रपणा जातो तसेच चटणी हिरवीगार होते.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


