मनोज जोशी
सकाळीच नाशिकहून फोन आला, उमा वहिनी गेली. माझा मेहुणा महेश गोखलेची पत्नी. आयुष्यामध्ये ‘होत्याचे नव्हते,’ कसे एका क्षणात होते, याचे उदाहरण द्यायचे झाले तर, या महेशदादाचे देता येईल. दोघेही सरकारी नोकरीमध्ये. दोघेही मोठ्या पोस्टवर. पण साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी उमा वहिनीला मेंदूमध्ये गाठ असल्याचे निदान झाले. पण नंतर ती कॅन्सरची असल्याचे समोर आल्यावर सगळेच हादरले. ऑपरेशन झाले. पण तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. ती पटकन माणसे ओळखत नव्हती. कालांतराने तिला हळूहळू नातेवाइकांची ओळख पटायला लागली. त्यांच्याशी त्याच आपलेपणाने ती बोलू लागली. पण हे कुठपर्यंत? ते कोणालाच माहीत नव्हते.
जळगाव, पुणे, कोल्हापूर असे करत-करत हे दाम्पत्य नाशिकलाच स्थायिक झाले होते. योगायोगाने हा आजार होण्यापूर्वीच मुलींना वेळ देण्यासाठी वहिनीने नोकरी सोडली होती. गेल्यावर्षी मी आणि माझी पत्नी आराधना नाशिकला गेलो होतो. तेव्हाही ती आमच्याशी व्यवस्थित बोलली. पण एक गोष्ट हुरहूर लावणारी होती. उच्चशिक्षित, मोठ्या हुद्द्यावर काम करणारी उमा वहिनी अक्षरओळख विसरली होती! गाण्याची खूप आवड. त्यामुळे पुण्याला असताना गाण्याचा क्लासही जॉइन केला होता. नाशिकला स्थायिक झाल्यावर ऑनलाइन गाणे शिकणे सुरू ठेवले होते. तिला गायनाचे धडे देणारी गुरू देखील तिच्या या मेहनतीवर खूश होती. पण अक्षरओळखच विसरल्याने तिच्या गाण्याच्या वह्या केवळ दाखविण्यापुरत्याच राहिल्या होत्या. मग महेशदादा तिला आपल्या मोबाइलमध्ये तिचे रेकॉर्ड केलेले गाणे ऐकवायचा. ती गाणे गुणगुणायची. पण शब्द माहीत नव्हते! हे खूप वेदनादायी होते.
गेल्या महिनाभरापासून तिची तब्येत ढासळली होती. शनिवारी (15 मार्च 2025) सकाळी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. माझ्या सासू-सासऱ्यांसह आराधना अंत्यदर्शनासाठी लगेच नाशिकला गेले. डॉक्टर असलेल्या मोठ्या मुलीला आईबद्दल साशंकता होतीच. अंदाज असूनही असे काही घडणे वेदनादायकच असते, हे सत्य.
माझ्या आयुष्यात असे दोन प्रसंग आले होते. 4 जानेवारी 2011मध्ये माझे बाबा गेले. तो धक्का पचवणे माझ्यासाठी कठीणच होते. रात्री साडेदहा वाजता माझ्याशी फोनवर बोलले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वहिनींचा फोन आला की, तुम्ही लगेच निघा. त्यावेळी ओला-उबरची सोय नसल्याने प्रायव्हेट गाडी ठरवली. रात्री अडीचच्या सुमारास हायवेला नॅशनल पार्कजवळ असतानाच, बाबा गेल्याचा फोन आला. शेवटची भेट झाली नाही, ही सल आजही माझ्या मनात आहे. बाबा माझे गुरूही होते. त्यामुळे त्यांची उणीव आजही जाणवते. विशेषत:, एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना. पण आता ‘जे होईल ते,’ या मानसिकतेने बेधडक निर्णय घेतो.
आई तशी हिंडती-फिरती होती. पण 2018मध्ये घरात पडण्याचे निमित्त झाले आणि तिचा आत्मविश्वासच गेला. सुरुवातीला घरात भिंतींना धरून-धरून चालत होती. नंतर तिने तेही बंद केले. मग ती बेड-रिडन होती. 28 जुलै 2023ला हॉस्पिटलमध्ये माझ्यासमोरच ती गेली. डिसेन्ट्री झाली म्हणून तिला पवईच्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले होते. ते केवळ निमित्त ठरले. तिचे ते जाणे, आजही अनेकदा माझ्या डोळ्यासमोर येते आणि मी अस्वस्थ होतो.
अतिशय हुशार आणि हिंडत्या-फिरत्या वहिनीची स्थिती बघता जे झाले, त्यातून ती सुटली, अशी अनेकांची भावना होती. माझ्या आईच्या बाबतीतही भेटायला येणाऱ्या अनेकांनी याच शब्दांत सांत्वन केले. बिछान्याला खिळून असलेली आई, पुढे आणखी हाल होण्याआधी गेली, असेच आप्तांचे म्हणणे होते. बाबांच्या वेळीही अनेक आप्त-स्वकीय भेटायला आले. अगदी हिंडत्या-फिरत्या बाबांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तासा-दीड तासात सर्वच संपले. भेटायला आलेल्या अनेकांनी सांगितलं – ‘मरण चांगलं आलं… बिछान्याला खिळून राहिले नाहीत… सेवा करून घेतली नाही…’ वगैरे वगैरे…
या तीन मृत्यूंच्या घटनांबाबतीत आप्त, मित्र यांनी दोन प्रकारची मते मांडली. पण काय असते, आपली प्रिय व्यक्ती जेव्हा जाते ना, त्या दु:खाची तीव्रता खूप असते… मग ती आजारपणाने गेलेली असो वा अचानक धक्का देऊन! तो घाव खूप खोलवर असतो, जखम भरली तरी व्रण हा राहतोच… आणि आतमध्ये कमी-अधिक प्रमाणात ठसठसणे सुरूच असते. कधी तरी विषय निघाल्यावर किंवा एकांतात त्या व्यक्तीची आठवण बेचैन करून जाते, तेव्हा त्या व्यक्तीचे ‘सुटणं’ किंवा ‘मरण चांगलं आलं’ हे त्या-त्या परिस्थितीनुरूप आप्तमित्रांचे सांत्वनाचे शब्दच या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम करतात… अन् त्यावेळी तरी तोच एक रामबाण उपाय असतो.