उमा काळे
आयुष्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळतं… काही प्रसंगातून, काही अनुभवातून शिकायला मिळतं… तर, काही वेळा काही कारण नसतानाही आयुष्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. त्याला आपण नशीब म्हणतो आणि विषय सोडून देतो… खरंच, इतकं सोपं आहे का हे? मला नेहमी प्रश्न पडतो हा!
हे सगळं आपल्या वाट्याला येतं, त्यामध्ये आपलेच लोक असतात. आपलं सुख सोडून ज्यांच्या सुखासाठी अधिक झटतो, तेच सर्वात आधी आपला विश्वासघात करतात. त्याचा परिणाम असा होतो की, बाहेरचे लोक या गोष्टींचा गैरफायदा घ्यायलाही मागे सरत नाही… त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आधी आपलं भविष्य सुरक्षित करा, मग खुशाल दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा…
या कलियुगात प्रामाणिकपणा तसेच नि:स्वार्थी, निस्सीम प्रेम यांचे मूल्य समजणारी खूप कमी लोक आहेत. हल्ली सगळीकडे फक्त स्वार्थ साधण्यासाठी लोक तुम्हाला जमिनीवरून आसमानी नेऊन बसवतात! नंतर तितक्याच वेगाने किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने तुम्हाला ते जोरात जमिनीवर आणून ठेवतात… तुमच्या आयुष्याची केवळ राख होते.
हेही वाचा – Take care… काळजी घे
अजून एक, एखाद्यासाठी काही केलं तर आपण आपलं कर्म करत आहोत, हे पक्कं लक्षात ठेवावं. हे करताना समोरच्या व्यक्तीकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. जे करायचं ते नि:स्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने… त्याचा साधा उच्चारही करू नये. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळू नये, ही भावना मनात असावी! अपेक्षाच नसतील तर अपेक्षाभंगाचे दुःखही झेलायला लागत नाही. फक्त एवढंच की, दान हे नेहमी सत्पात्री आहे ना, याची खातरजमा मात्र नक्की करून घ्यावी.
मनात कोणाबद्दल ही आकस असू नये. माफ करून टाकावं. आपणच आपला वेगळा मार्ग आखावा. कुठलीही गोष्ट करताना प्रत्येक परिणामांची जबाबदारी संपूर्णपणे घ्यावी, अन्यथा त्या वाटेला ही जाऊ नये.
आयुष्य हे खूप सुंदर आहे… ते कसं जगावं ही कला ज्यांना अवगत आहे, ते आपल्याबरोबरच दुसऱ्याचंही आयुष्य सुंदर करतात; त्यासाठी धडपड करतात, त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम करतात… मला नेहमी वाटतं की, या भूतलावर आल्यावर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सप्तरंग भरले… त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य जरी तुमच्या मुळे उमटले तर तुमचं आयुष्य सार्थकी लागले समजायला हरकत नाही…
हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट
खूप काही आहे लिहिण्यासाठी, पण आहे ते फक्त वास्तव हे निश्चित! कारण स्वप्न रंगवण्यात मला तरी रस नाही… ती मूर्त स्वरूपात आणणं मला नेहमी महत्त्वाचं वाटतं. आपणच आपल्याशी शर्यत करावी, म्हणजे आपण नक्की कुठे आहोत, हे वारंवार पडताळणी करून सिद्ध करून दाखवण्यात जो आनंद आहे ना, तो कशात ही नाही…