भाग – 1
जोशी काकूंचं जाणं जितकं अचानक होतं, तितकंच धक्कादायक देखील होते आमच्या सगळ्यांसाठी. हिंडत्याफिरत्या काकू एक दिवस अशा जातील असं खरंच वाटलं नव्हतं. आपल्या रोजच्या बघण्यातला माणूस अचानकपणे कायमचा निघून जातो, हे अजूनही मानायला मन तयार होत नाही. आम्हा सगळ्या मित्रांना बसलेला धक्का अजूनही कायमचा संपलेला नाही. आमचा मित्र म्हणजे काकूंचा मोठा मुलगा सुबोधकडे तर बघवत नाहीये अजूनही… त्याच्या समोर जाऊन उभं राहायला हिंमत होत नाहीये माझी.
आजवर जोशी काकूंनी आयुष्यात नि:स्वार्थीपणे फक्त देण्याचं काम केले. मग ते त्यांच्या तीन मुलांना वाढवताना दिलेले संस्कार आणि शिकवण असो नाहीतर, त्यांच्या लाडक्या शाळेतील विद्यार्थ्यांना केलेलं ज्ञानदान असो. त्यांच्या आयुष्याचा आणि बुद्धिमत्तेचा हात कधीच आखडता ठेवता आला नाही त्यांना…
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
सुबोधने एक दिवस त्याच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि जोशी काकूंची डायरी मला आणून दिली आणि म्हणाला मला की, आईवर लिही काहीतरी. मी सगळा मजकूर शांतपणे वाचला. माझ्या लक्षात आलं की, त्या सगळ्या सुबोधच्या आठवणी आहेत. त्यावर मी ठरवलं की, आपण काहीतरी नव्याने कथानक लिहिण्यापेक्षा सुबोधचंच लिखाण आणि काकूंच्या डायरीतील मजकूर जसंच्या तसं कथेत समाविष्ट करावं म्हणजे त्यांच्या भावनांचा योग्य तो आदर राखला जाईल. सुबोधने लिहिले होते की,
“बाबांच्या अकाली अपघाती निधनानंतर खरंतर घरची बाई हादरली असती, कोसळली असती. पण त्याही परिस्थितीत आई कमरेला पदर खोचून उभी राहिली. बाबांचे त्यांच्या भावाबहिणींसोबतचे नातेसंबंध सुरुवातीपासूनच ताणलेले होते. अशा परिस्थितीत देखील बाबांचं दिवस-कार्य आईनं स्वतःच्या हिमतीवर केले. बाबांच्या भावंडांत जरी संवाद नव्हता तरी, बाबा त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्यांच्या मदतीला सदैव पुढे असायचे. मग ती ऑफिसच्या कामकाजातील मदत असो किंवा सहकाऱ्यांच्या वैयक्तिक पातळीवरची मदत असो! त्या सर्वाची परतफेड म्हणून बाबांच्या ऑफिसतर्फे त्यांच्या वैयक्तिक कायदेशीर देण्याव्यतिरिक्त त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे जमवून आईच्या हातात मोठ्या रकमेचा चेक ठेवला होता… तेव्हा आईला आपल्या नवऱ्याचं त्याच्या ऑफिसमधलं स्थान कळलं आणि ती गहिवरून गेली होती.
आईने त्यानंतर मोठ्या हिमतीने शाळेत नोकरी मिळवली आणि आम्हा तिघांनाही डोळ्यांत तेल घालून वाढवलं. आईचा त्याग किती उच्च कोटीचा आहे, हे समजण्याचं आमचं वय तेव्हा नव्हते. पण जेव्हा आम्ही भावंडं समजण्याच्या वयात आलो, तेव्हा मात्र तिला तिचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल, याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष दिले. सुदैवाने माझी (सुबोध) आणि बंधू अरविंदची बायको तसेच केतकीचा नवरा श्रीरंग म्हणजे तिचा जावई सगळेच समजूतदार होते त्यामुळे आमच्या संसारात सुद्धा तिचं स्थान अबाधित राहिले. केतकीच्या बाळंतपणासाठी तिला अमेरिकेला नेण्यासाठी श्रीरंगने आधी तिच्याकडे हट्ट धरला आणि नंतर तिचा होकार मिळताच तिला न्यायला देखील आला होता तो मुंबईत… केतकीच्या बाळंतपणासाठी आई अमेरिकेला गेली. तिच्या नातवाने मान धरायला सुरुवात केली आणि मग सहा महिन्यांनी आईला परतीचे वेध लागले.
आम्हा तिघांनाही आयुष्यात चांगल्याप्रकारे स्थिरस्थावर करून तिने तिची जबाबदारी पूर्ण केली. दिवस खरे आनंदात जात होते, पण म्हणतात ना सगळं सुरळीत सुरू असताना अचानकपणे काही तरी घडतं आणि होत्याच नव्हतं होऊन जाते…
सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट. अरविंद पुण्याला चालला होता कामासाठी. पावसाळ्याचे दिवस होते. आईनं त्याला विचारले देखील होते की, काम पुढे ढकलता येण्यासारखं असेल तर पुढे ढकल. खरं, तसं शक्य होते. पण अरविंद हट्ट करून निघाला. आईच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. अरविंद नेहमीप्रमाणे तिच्या पाया पडला, पण नेहमीचा आशीर्वाद न देता आई बोलून गेली की, तू संध्याकाळी परत येईपर्यंत मी उपास धरणार आहे. अरविंद तेव्हा म्हणाला देखील होता आईला की, पाऊस थोडाच सतत असाच जोरात पडणार आहे. तो थांबेल की, काही वेळाने. तू नको उपाशीपोटी राहूस, मग तुला पित्ताचा त्रास होईल विनाकारण. पण ती आईच होती ना. तिने काही ऐकलं नाही आणि हिरमुसला होऊन अरविंद निघाला.
हेही वाचा – फुलपाखरू… 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी
पाऊस खरंच कोसळत होता पाठीमागे वाघ लागल्यासारखा. आईचंच काय, पण न थांबणारा पाऊस बघून मी सुद्धा थोडा काळजीत पडलो होतो. थोडा उशिराच अरविंदचा फोन आला पुण्याला पोहोचल्यावर आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. पुढे 3-4 तास काम करून अरविंद परत यायला निघाला. आईचा रूसवा दूर करण्यासाठी त्याने चितळ्यांच्या दुकानातून बाकरवडी आणि आंबा बर्फी घेतल्याचे कळवलं.
दिवेलागणीची वेळ झाली तरी, अरविंद घरी पोहोचला नव्हता. घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तसतसा आईचा चेहरा काळजीने ग्रासत चालला होता. नऊ वाजले, पण अरविंद घरी पोहोचला नव्हता. त्याचा फोन देखील लागत नव्हता त्यामुळे माझी काळजी देखील वाढली होती. आई तर डोकं धरून बसली होती. अखेर दहाच्या सुमारास फोन वाजला. मी भीतभीतच घेतला तो. समोरून जे सांगितले, त्याने माझे डोके सुन्न झाले. शेवटी काळाने घाला घातला होता. घाटात एका अवघड वळणावर अरविंदच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यातच त्याचा दुःखद अंत झाला होता. लोणावळा पोलिसांनी आम्हाला बोलावलं होतं, ओळख पटवून अरविंदच्या देहाचा ताबा घेण्यासाठी. मी फोन ठेवला. आई माझे खांदे गदागदा हलवून मला विचारत होती की, फोन कोणाचा आहे आणि समोरच्या माणसाने तुला काय सांगितले म्हणून. पण मी बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. माझी दातखिळी बसली होती.
क्रमशः


