डॉ. अस्मिता हवालदार
दिवाळी अंक आले की, त्यात सानिया यांची कथा आधी शोधायची आणि वाचायची असा माझा नियम आहे. सानिया सर्वात माझ्या आवडत्या कथालेखिका आहेत. त्यांच्याशी बोलता यावं, म्हणून मी एका कार्यशाळेत भाग घेतला होता, तेव्हा त्यांना विचारलं होतं, “तुमच्या कथेतल्या माणसांची नावं फार छान असतात. अशा नावांची माणसं आपल्या आयुष्यात असावी, असं वाटतं. तर, तुम्ही आधी नावं ठरवता आणि मग कथा लिहिता का?”
ज्यांनी सानियांच्या कथा वाचल्या आहेत, त्या सर्वांचा हाच अनुभव असला पाहिजे! त्यांचे बरेच कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक वलय. 2010 साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात नऊ कथा आहेत… लहान, मोठ्या सर्व प्रकारच्या कथा आहेत. त्यातली पात्र सामान्य जीवन जगणारी आपल्या आसपास असतात तशी असतात, पण सानिया ज्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहतात ती वेगळी असते! बरेचदा मानसशास्त्रीय विश्लेषण केलेलं दिसतं. कथा लिहिताना त्या त्या प्रदेशाच वर्णन, निसर्गाच वर्णन इतकं सहज केलेलं असतं की, दुधात साखर विरघळावी तसं मिसळून गेलेलं असतं आणि गोडवा वाढवत असतं. त्यातल्या पात्रांच्या गुणदोषांचं वर्णन असं असतं की, त्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते… आपल्या कल्पनेत तिचं चित्र उभं राहतं. काही वेळा त्या पात्रांची व्यक्तिमत्व लोभस वाटतात आणि काही वेळा ती नको तितकी खरं बोलत आहेत, असं वाटतं. एवढं खरं ऐकायची आपल्याला सवय नसते! किंबहुना, इतकं खरं आपण स्वत:शीही बोलत नाहीत. कुठलीही व्यक्तिरेखा अगदी खलनायकी नसते किंवा कथेचा शेवट धक्कादायक नसतो. सरळ केलेलं कथन आहे, असं वाटतं. पात्रांच्या आयुष्यात आलेल्या समस्या आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असतात. त्यामुळे कुठल्याही पत्राचा राग येत नाही, उलट कणव वाटत राहते.
यातली पहिली कथा ‘वलय’. हरिहर, ललिता आणि अद्वैत अशी तीनच पात्रं यात आहेत आणि मृत अशोक आहे. ललिताला जे करायचं आहे, त्यासाठी तिचा स्वत:शीच वाद सुरू आहे. एक मन रागाने, त्वेषाने नकार देतंय तर, दुसरं मन होकार देतंय. तिच्या कमकुवतपणाचा तिलाच राग येतोय, पण तो तिचा स्वभावधर्म झालाय. दुसरी कथा ‘घर’. सर्व सामान्य घरातल्या माणसांची कथा. एकमेकांबद्दल असलेले आकस, बोचणारे दोष, त्यातून मधेच लाडवात बेदाणा असावा तसे दिसणारे गुण. तिन्ही व्यक्तींच्या दृष्टीने नात्याचा विचार केला आहे आणि शेवटी प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आहे, याची जाणीव होते. हेच कुटुंब असते.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
‘खेळ’ नावाच्या कथेत उत्तराचे मनाशी चाललेले स्वप्नातल्या घराचे नात्यांचे, कुटुंबाचे खेळ आणि ते ऐकवण्यासाठी भाग पाडली गेलेली रोहिणी यांचं नातं आहे. रोहिणीच्या आयुष्यात असलेली छिद्रं शोधण्याचा प्रयत्न करणारी उत्तरा स्वत:च्या दु:खावर फुंकर घालत होती. रोहिणीला जे दुख आहे, असं वाटत नव्हतं ते आहे, असा एक मनाचा खेळ सुरू होतो. स्वप्नातले जग काही वेळा तसेच राहून दिलेले बरे असते!
या पुढची कथा ‘रीत’. कुमार आपल्या नवविवाहित पत्नीला घेऊन घरी येतो. घरातली मंडळी तिला प्रथमच भेटत असतात. त्याला आपल्या वडिलांवर आलेली आपत्ती समजते. समाजसेवा करणाऱ्या कुटुंबातून आलेली पत्नी अरुणा आणि वडिलांनी नुकताच केलेला घोटाळा या द्विधा मनस्थितीत सापडलेला कुमार… यांच्या नात्याचे काय होणार? याची उत्सुकता वाटत राहते.
दोन मैत्रिणी, त्यांची मुले यावर असलेली कथा ‘वर्तमानाचे रंग’. सुधा आणि मीरा दोन जिवलग मैत्रिणी. सुधाने एकटीने सुदर्शनला वाढवलं आणि मीराचा नवरा विक्षिप्त, मुलगी जाई मंदबुद्धी, दुसरी मुलगी सुचेता बुद्धिमान आणि समाजसेविका. सुदर्शनच्या नजरेतून ही नात्यांची वीण दाखवली आहे. प्रत्येकापुढचे वेगळे प्रश्न, प्रत्येकाची त्याच्याशी झुंज… हा आयुष्याचा कलह अर्थशून्य असतो का? असा प्रश्न मनात उभा राहतो. थोड्या दिवसांसाठी मुलाकडे राहायला आलेल्या, एकटेपणा असहनीय झालेल्या श्रीनाथची कथा ‘माधवी’. माधवी नावाची बालमैत्रीण त्यांना सतत आठवत असते आणि जवळ राहणाऱ्या एका स्त्रीत ते माधवी शोधतात. एकटेपणा सहन करण्यासाठी त्यांच्या मनाने कल्पिलेलं हे पात्र आहे की, खरी माधवी आहे? सगळी आभासी दुनिया आहे का?
संदीप आणि आरती या दोन भावंडांची कथा ‘चौकट’. बुद्धिमान, अविवाहित, कर्तृत्ववान, धनवान, सचोटीने वागणारी आरती आणि तिच्यापेक्षा सर्वार्थाने कमी न्यूनगंड असलेला विवाहित संदीप यांच्या संपत चाललेल्या नात्याला जोडून ठेवणारा धागा म्हणजे वडील अप्पा. तुलना, हेवेदावे या पलीकडे मनात असलेले प्रेम शाश्वत असते. अशा नकारात्मक भावना मनात ठेवल्याचे कालांतराने दुखच होते, हे लेखिकेने पटवून दिले आहे.
हेही वाचा – Bookshelf : एक होता कार्व्हर… विलक्षण कहाणी जिद्दीची, माणुसकीची आणि देशप्रेमाची!
‘नाती’ ही कथा श्रीनिवासाचार्य आणि सून अदितीची आहे. नवरा निरंजन परदेशात पैसा कमावण्यासाठी आदितीला सोबत न घेता गेला आहे. पत्नी गेल्याने रिकामपणामुळे निराश झालेल्या एकेकाळचे नाटककार श्रीनिवासाचार्य आणि एकटी असून आनंदात जगणारी आदिती यांचे नाते आहे. तसेच, शेजारी राहणारी लक्ष्मी, अदितीचा नवरा निरंजन यांच्याबरोबरचे त्यांचे नाते… अशी नात्यांची गुंफण या कथेत आहे.
मृत्यूच्या छायेत असलेला केदार आणि त्याची पत्नी रमा आजारपणाला आत्मविश्वासाने तोंड देताना निर्मल पाहत असतो. तिचे नॉर्मल राहणे इतरांना बोचत असते आणि निर्मलला त्या दोघांचे कौतुक वाटत असते. निर्मलचा परिवार रमाला नावे ठेवत असतो आणि त्याच वेळी निर्मल शक्य तितकी मदत त्या दोघांना करत असतो. यातून परीघांना छेदून जाणारे नाते जन्मते. ही ‘अर्थ’ कथा मोठी आहे, विचारात पाडणारी आहे.
सर्वच कथा सशक्त आहेत. लेखिकेने सगळ्या पात्रांना न्याय दिलेला आहे. कथा वाचताना आपल्या मैत्रिणीने एखादी तिच्या आसपासच्या माणसांत घडलेली गोष्ट सांगावी, असं वाटत राहते म्हणून कथा पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते.


