आराधना जोशी
प्रमोद महाजन यांच्या निधनाला यंदा 3 मे रोजी 19 वर्षे झाली. त्यांचा अकाली झालेला मृत्यू हा सगळ्यांनाच चटका लावून गेला. महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील जे हजरजबाबी नेते होते, त्यात विलासराव देशमुख आणि प्रमोद महाजन यांचं नाव अग्रस्थानी आहे. (दुर्दैवानं आता दोघेही हयात नाहीत.) प्रमोद महाजन यांचं एप्रिल 1997मधील लोकसभेतील भाषण मध्यंतरी व्हायरल झालं होतं. सर्वपक्षीय चीन दौऱ्यातील एक किस्सा त्यांनी सभागृहात सांगितला होता. “तिथे भारतातील लोकशाहीबद्दल उत्सुकता दिसली. तेव्हा मी लोकशाही काय असते ते समजावलं. मी त्यांना म्हणालो, मी प्रमोद महाजन आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचा खासदार आहे; आम्ही विरोधी बाकांवर आहोत. हे ऐकून चीनचे नागरिक हैराण झाले. त्यानंतर मी श्रीबल्लव पाणिग्रही (काँग्रेस) यांच्याकडे हात दाखवून म्हणालो, हे दुसऱ्या मोठ्या पक्षाचे खासदार आहेत. त्यांचा पक्ष सरकारमध्ये नाही, पण सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्यानंतर मी एम ए बेबी (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी) यांची ओळख करून दिली. हे तिसऱ्या मोठ्या पक्षाचे खासदार आहेत आणि ते सत्ताधारी आघाडीत असले तरी, सरकारच्या बाहेर आहेत. नंतर मी रमाकांत खलप (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी) यांच्याबद्दल सांगितलं. ते आपल्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत आणि ते सरकारमध्ये आहेत…” प्रमोद महाजन यांनी हे सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ उठला.
प्रमोद महाजन यांच्या संभाषणकौशल्याला तोड नव्हती. ई टीव्ही मराठीसाठी वार्ताहर म्हणून काम करताना अनेकदा प्रमोद महाजन यांना प्रत्यक्ष भेटण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. अनेक प्रसंगांमध्ये समोरच्या व्यक्तीनुसार कसं बोलायचं, कसं वागायचं याचं कसब त्यांच्याकडे होतं. अर्थात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मुशीत घडलेलं व्यक्तिमत्व होतं ते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या गुडघ्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी अख्ख्या हॉस्पिटलला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. मात्र त्यातही सामान्य पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खात्री करण्यासाठी प्रमोद महाजन यांचेच नाव पुढे आले. याशिवाय, पंतप्रधानांच्या हेल्थ बुलेटिनलाही महाजन जातीने हजर असायचे. त्यावेळीही जमलेल्या पत्रकारांशी वैयक्तिक पातळीवर अनेकदा ते संवाद साधायचे. हॉस्पिटलमुळे येणारं दडपणही त्यांनी त्यांच्या सहज वावरामुळे कमी केले होते. सतत तब्येतीची काळजी करण्यापेक्षा “चला, जरा क्रिकेटची मॅच बघूया,” असं म्हणत आमच्यासोबत टीव्ही असलेल्या रूममध्ये बसायचे.
सन 1999 साली महाराष्ट्रातील शिवसेना – भाजपाचे सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार स्थापन झालं होते. मात्र, केंद्रात वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार सुरू होता. केंद्र सरकारला भक्कम साथ देणाऱ्या शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे तसेच भाजपा यांच्यात अनेक मुद्द्यांवरून बेबनाव निर्माण होत असे. त्याप्रत्येक वेळी केंद्रातून वाजपेयी यांनी प्रमोद महाजन यांनाच बाळासाहेबांची समजूत काढायला पाठवलं होतं. एकतर मराठी असणं आणि आपला मुद्दा समोरच्याच्या गळी उतरवणं, यात त्यावेळी तरी महाजनांचा हात धरणारा दुसरा नेता नव्हता.
हेही वाचा – संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव
बाळासाहेबांची समजूत काढायला येणाऱ्या महाजन यांचा एक बाईट मिळावा यासाठी सकाळपासून ‘मातोश्री’वर वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचा जथ्था उभा असायचा. ऊन, पाऊस, तहानभूक यांची तमा न बाळगता आपल्या कामासाठी उभ्या असणाऱ्या पत्रकारांना जेवलात का? हा प्रश्न विचारून मगच प्रमोद महाजन मातोश्रीवरून बाहेर पडायचे. बाळासाहेबांबरोबरची चर्चा मनासारखी पार पडली की, खुशीत येऊन महाजन स्वतः मीडियासमोर येऊन चर्चेबद्दल माहिती द्यायचे. याउलट, चर्चा फसली किंवा मनाजोगता मार्ग निघाला नाही की, मीडियाकडे न बघता आपल्या गाडीत बसून ते लगेच रवाना व्हायचे. त्यांच्या अशा देहबोलीतून मीडियाला ‘between the line’ अनेक गोष्टी समजून घेता यायच्या.
संघाच्या एका वरिष्ठ माजी पदाधिकाऱ्यांचे निधन झाल्यावर मुंबईतील त्यांच्या शोकसभेला प्रमोद महाजन उपस्थित राहणार होते. त्याआधी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची मनधरणी करण्याचे त्यांचे प्रयत्न काहीसे असफल झाले होते. त्यामुळे मीडियाला टाळून महाजन मातोश्रीवरून रवाना झाले होते. त्यामुळे या शोकसभेला आल्यावर त्यांच्याकडून बाईट घेण्यासाठी मी ई टीव्ही मराठीकडून, माझी पत्रकार मैत्रीण प्रिया आजतककडून आणि एनडीटीव्हीकडून एक पत्रकार असे तिघेजणच उपस्थित होतो. त्यामुळे प्रमोद महाजन सुद्धा कदाचित काहीसे टेन्शन फ्री होत आमच्याकडे आले आणि पहिलाच प्रश्न मी युतीच्या तणावपूर्ण संबंधांवर विचारताच “नो कमेंट्स” एवढं उत्तर देऊन ते तिथून निघूनही गेले.
बाकीचे दोघेजण माझ्यावर वैतागले. पहिलाच प्रश्न मी असा विचारल्याने आता बातमी काय करायची? आणि कशी करायची असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. मी पण असा-कसा उतावीळपणा दाखवला म्हणून स्वतःवरच चिडले होते. मात्र ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत desk department ने बातमी तयार करून ठेवली होती.
मी गेल्यावर तीन सेकंद महाजन जे बोलले (नो कमेंट्स) ते बाईट म्हणून त्या बातमीत पेस्ट केलं. त्या दिवशी ती बातमी बऱ्यापैकी चालली. नंतर प्रमोद महाजन यांची भेट झाल्यावर त्यांनी त्या बातमीचा उल्लेख करत बातमी आवडली, अशी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ऋजू व्यक्तिमत्व
दुसरा एक किस्सा तर आयुष्यात न विसरता येण्यासारखाच आहे. नरिमन पॉइंटला एक कार्यक्रम होता. रानकवी ना. धों. महानोर यांचा प्रमोद महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता. ईटीव्हीकडून मी त्या कार्यक्रमाला गेले होते. पण एक गोष्ट तिथे खटकली. मान्यवरांची भाषणे सुरू असताना स्टेजजवळ काही जण उभे राहून ‘आमचे पैसे परत करा…’ अशा घोषणा देत होते. त्यामुळे महानोर यांच्यासह अनेकांनी आपली भाषणे गुंडाळली. त्याबद्दल माहिती घेतली असता समजले की, प्रत्यक्षात एक कृषीविषयक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यासाठी शुल्कही घेण्यात आले होते. आयोजकांनी त्या कार्यशाळेदरम्यान हा सत्काराचा कार्यक्रम घेतला आणि याची पूर्वकल्पना उपस्थितांना दिली नव्हती. त्यामुळे कार्यशाळेला आलेल्या संतप्त सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती.
सर्वात शेवटचे आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रमोद महाजन बोलायला उभे राहिले. त्यांचे भाषण सुरू झाल्यावर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना दम दिला… “खाली येऊन एकेकाच्या कानफटात मारीन. मी कोणाचेही पैसे घेतलेले नाहीत, ज्यांनी घेतले आहेत, त्यांना विचारा.” त्यांचा हा रुद्रावतार पाहून वातावरण गंभीर बनले. सर्व चिडीचूप होते. त्यानंतर काही सेकंदाचा पॉझ घेऊन प्रमोद महाजन यांनी आपले भाषण सुरू केले, “हे घोषणाबाजी करतायत त्यांचीही काही चूक नाही. त्यांचं असं झालंय की, मुलगी दाखवली एक आणि प्रत्यक्षात बोहल्यावर दिसतेय दुसरीच…” ते असं म्हणताच वातावरणातील ताण एका झटक्यात निवळला… आणि त्यांनी जणू काही घडलंच नाही, असं नेहमीप्रमाणे भाषण सुरू केलं.