भाग – 10
आई तिच्याकडे पाहत होती, अशा नजरेनं जणू तिने मुलीला नव्यानं ओळखायला सुरुवात केली होती.
“कुठे होतीस गं एवढे दिवस?” आईचा आवाज हळू, पण गंभीर होता.
आराध्या तिच्याजवळ गेली, तिचा हात हातात घेत म्हणाली, “जिथं स्वतःला शोधता आलं… आणि जिथून तुला बाबांना या घरातून बाहेर काढायची ताकद मिळाली.”
आईचं मन भरून आलं. डोळे पाणावले. पण आता ती कधीच रडणार नव्हती… कारण, तिला समजलं होतं, तिची मुलगी आता कोलमडणारी नाही. आराध्याने डोळे मिटून विचार केला —
“शिवा… हे तूच केलंस. माझ्या आत मी होती, पण तू मला स्वतःला दाखवलंस. आता मी लढेन… आणि जिंकून दाखवेन.”
सकाळचं वातावरण थोडं तणावपूर्ण होतं. आराध्या आणि अन्वी दोघींचाही बी.ए. फायनलचा निकाल लागणार होता. काकूने तर रात्रीच ठामपणे सांगून ठेवलं होतं, “अन्वीचा फर्स्ट क्लास येणारच, माझी मुलगी आहे ती!”
घरात सर्वांची नजर दरवाजाकडे होती, दोघींच्या वाटेकडे!
प्राजक्ता मात्र शांत होती. ना उत्साही, ना काळजीत… पण तिच्या नजरेत एका आईची खोल आतून येणारी प्रार्थना सतत सुरू होती.
अन्वीचा पत्ता नव्हता. फोन लागत नव्हता… सगळ्यांना वाटत होतं, ती येईल आणि सगळं कळेल. अचानक दार उघडलं… आराध्या थेट घरात शिरली. चेहऱ्यावर ना हसू, ना तणाव – पण डोळ्यांत चमक होती.
आई प्राजक्ताने तिला पाहिलं आणि अनाहूतच डोळे भरून आले. ती पटकन धावत गेली, आराध्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले –
“काय झालं गं?”
आराध्याने काहीच न बोलता तिच्या हातात एक पेपर दिला…
कॉलेज – पहिली. युनिव्हर्सिटी – दुसरी.
क्षणभर शांतता होती… आणि नंतर प्राजक्ताचा संयमाचा बांध मोडला… “माझी आराध्या पहिली आली! पहिली!” ती उचंबळून सगळ्यांना सांगत होती.
काकू अजूनही अन्वीच्या फोनची वाट पाहात होती.
तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून एक शेजारीण म्हणाली… “तुमचं बरंय, आराध्या इतकी अभ्यासू… तिच्यासारखी मुलगी मिळणं नशीबच.”
काकूचा चेहरा उतरलेला होता… अन्वी मात्र, कॉलेजबाहेर एका रेस्टॉरंटमध्ये तिच्या मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करत होती… मोठे गिफ्ट्स, फोटोशूट आणि मोठं बिल… कसला निकाल? कसली जबाबदारी?
हेही वाचा – आराध्याचा संघर्षाचा निर्णय… सोबत आहे शिवा!
घरात मात्र त्या दिवशी खरं यश आणि खरं सोनं ओळखलं गेलं होतं… प्राजक्ताच्या डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते… ते अभिमानाचे होते.
आराध्या मात्र शांत उभी होती. कारण, तिला माहीत होतं, शब्दांपेक्षा जास्त वजन आता तिच्या कृतीचं होतं. हो… अन्वीचं आणि आराध्याचं नातं दिसायला जरी चुलत बहिणींचं असलं, तरी त्यात आपुलकीपेक्षा स्पर्धा आणि हेवेदावे जास्त होते. रुपानं गोरी, बोलकी आणि चकाचक राहणारी अन्वी, सगळ्यांना हवीहवीशी वाटायची. आराध्या मात्र… काळ्या सावळ्या रंगाची, शांत, सौम्य आणि कष्टकरी.
घरात अन्वीचं कायम कौतुक व्हायचं –
“काय दिसते आपली अन्वी… मिस कॉलेज होणार बघा!”
“आमच्या घरातच सोनं जन्माला आलंय!” काकू तर नेहमीच फुशारक्या मारायची…
आराध्याचं अस्तित्व जणू केवळ एक सावलीच होतं. तिला कितीही बक्षिसं मिळाली, शिष्यवृत्ती घेऊन आली, कविता, निबंध, वक्तृत्व… तरीही काकूचं एकच वाक्य असे – “पण दिसायला कशी ती?”
अन्वीला नेहमी हे बोचायचं की, ती दिसण्यात भारी असली तरी, लोक आराध्याच्या बुद्धीला दाद देतात. कॉलेजमध्ये अनेकदा आराध्या तिला मागे टाकायची, तेही केवळ अभ्यासात नाही, तर एकूणच व्यक्तिमत्त्वाने… आणि आता तर निकालानंतर परिस्थिती अधिकच चिघळली होती. आराध्या काँलेजमध्ये पहिली आली आणि युनिव्हर्सिटीमध्ये दुसरी!
अन्वीच्या अहंकाराला जबर धक्का बसला होता. तिचं बाहेरचं ‘फेक पर्सनॅलिटी’ आणि ‘टाइमपास गँग’ याचं खरं रूप घरात फारसं कोणालाच माहीत नव्हतं. म्हणूनच जेव्हा तिचा निकाल काहीसा मागे पडला आणि आराध्याचा डंका वाजला, तिला हे सहनच झालं नाही. ती उगाच मुद्दाम खोचक बोलायला लागली –
“रिझल्ट काय आलाय… पण चालणं, बोलणं तरी शिकावं आधी! अरे, पहिली आली म्हणून काय झालं, बघू नंतर कुठे जॉबला लागते ती…”
आराध्या मात्र शांत होती. कुणी कितीही बोलो… आता ती स्वतःच्या मूल्यांवर ठाम होती. तिच्या डोळ्यांत हलकासा आत्मविश्वास झळकत होता… तो असा की, गोडगोड बोलणाऱ्यांपेक्षा, खरं काम करणारीच खरी ठरते… आणि वेळ आली की, स्वतःची जागा ती स्वतः बनवते!
त्या दिवशी दुपारच्या वेळी, घराच्या अंगणात वाळवण पाहात बसलेल्या प्राजक्तासमोर एक टवटवीत, शालीन पण मिश्कील चेहऱ्याची स्त्री उभी होती. सुमित्रा मावशी — त्यांच्या आजीची जुनी मैत्रीण… कपाळावर गंध, केसाचा साधा अंबाडा आणि डोळ्यांत अनुभवी चमक.
“ओह, किती वर्षांनी पाहते गं तुला, लक्ष्मी! (आजीचं माहेरचं नाव) बदललीच नाहीस!” असं म्हणत तिने आजीला मिठी मारली.
घरात काही क्षण एक वेगळीच चैतन्याची लाट उसळली. दोन्ही आजींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या… सुमित्रा मावशी वागायला सरळसोट आणि स्पष्ट बोलणाऱ्या होत्या. कोण काय विचारेल याची फिकीर न करता त्या पटेल ते बोलत.
थोड्याच वेळात अन्वी कुठून बाहेरून आली. फोन कानाला लावून, मस्त ब्रँडेड कपड्यात, अंगभर परफ्यूमचा सुगंध, चेहऱ्यावर गोड हास्य… पण डोळ्यांत एक छुपा तुच्छताभाव अन् श्रीमंतीची ऐट…
सुमित्रा मावशींनी तिथूनच नजर फिरवली… “ही कोण गं? फारच देखणी आहे, पण अगदी टीव्हीवरच्या मुलींसारखी… हीच का तुझी नात?” त्यांनी आपल्या मैत्रिणीला म्हणजेच आराध्या, अन्वीच्या आजीला विचारले…
“हो, आमची अन्वी ना कॉलेजात सगळ्यात पुढे असते… ब्युटी क्वीन म्हणतात तिला !” काकू गर्वाने म्हणाली.
तितक्यात स्वयंपाकघरातून आराध्या बाहेर आली, ओढणीला हात पुसत, साधासा ड्रेस… जरा विस्कटलेली पण चेहऱ्यावर एक शांत, प्रसन्न तेज…
“नमस्कार आजी… बसा. प्यायला पाणी आणते.”
सुमित्रा मावशींनी क्षणभर तिच्याकडे पाहिलं… तिच्या डोळ्यांत होता एक ठामपणा!
“ही दुसरी कोण?”
“आराध्या… आमच्या धाकट्या सुनबाईची मुलगी…” आजीने ओळख करून दिली.
सुमित्रा आजींचा मुक्काम चांगला चार-पाच दिवसांचा होता. आपल्या आजीसोबत आराध्या सुमित्रा आजी सोबतही गप्पा मारायची… त्यांना हवं नको ते सारं पाहायची…
अन्वीला काही काम सांगितलं तर, ती आराध्यालाच आवाज द्यायची… बघावं तेव्हा आपल्या मोबाइलवर एक तर बोलत असायची नाही तर, टाइप करत असायची… आराध्या मात्र काहीही सांगितलं तरी, करायला तत्पर असायची, जणू नाही म्हणणं तिच्या शब्दकोशात नव्हतं…
काही दिवसांतच सुमित्रा मावशींच्या लक्षात आलं, अन्वी कामाला हातच लावत नाही, आराध्या मात्र सतत काहीतरी करतच असते. अन्वीचं फोनशिवाय जमत नाही, आराध्या मावशींच्या बोलण्याकडे लक्ष देत होती, काही हवं नको, पाहात होती घरात मदत करत होती…
संध्याकाळी चहा घेताना त्यानां राहवलं नाही, त्यांनी स्पष्टच विचारलं, “ही गोरीवली, गोडगोड बोलणारी अन्वी फक्त बोलणं चांगलं करते की, काही काम ही करते?”
काकू तर प्रश्न ऐकूनच गप्प…
प्राजक्ता मात्र शांतपणे म्हणाली,
“हो, अन्वी हुशार आहे, पण आराध्या मात्र खूप मेहनती आहे.”
पण निशाच्या तोंडून आराध्यासाठी एकही कौतुकाचा शब्द निघाला नाही… प्राजक्ता मात्र आपल्या पुतणीचं कौतुक करत होती.. जी मुलगी तिच्याच मुलीला पाण्यात पाहत होती!
सुमित्रा मावशीला हसू आलं… “बोलणं नाही, मन पाहिलं जातं… आणि खरी रत्न मातीमध्येच सापडतात… तुझ्या या आराध्याला मी लवकरच काहीतरी विशेष सुचवणार आहे… ही मुलगी काहीतरी मोठं करणार हे मी आजच सांगते.”
सुमित्रा आजींच्या तोंडून आराध्यासाठी आशीर्वाद आणि कौतुकाचे शब्द ऐकून प्राजक्ता मात्र धन्य झाली… मात्र त्या क्षणी, आराध्याच्या चेहऱ्यावर एक तेज उमटलं, तिच्या गुणांची कदर आज कोणीतरी केली होती — आणि तेही मनापासून! आराध्याच्या आनंदाला तर पारावार उरला नाही… मन करत होतं नाचावं गावं पण आपला आनंद इतक्यातच दाखवण्यासारखं अजून तरी काही घडलं नव्हतं… अजून बराच प्रवास व्हायचा होता…
हेही वाचा – आराध्या घरी परतली, पण एका निर्धाराने!
इथे आराध्या आनंदात होती तशीच प्राजक्ताच्याही डोळ्यात आनंदाश्रू भरून आले होते… मात्र त्याच घराच्या एका खोलीत कुणीतरी धुसफूसत होतं… राग राग करत होतं? आराध्यासाठी अपशब्द बोलत होतं… एकीकडे आनंद होता तर, त्याच क्षणी दुसरीकडे द्वेषातून नवीन संकट विणलं जातं होतं…
काय असेल ते संकट? कशी तोंड देईल आराध्या त्याला?
क्रमशः


