संगीता भिडे (कमल महाबळ)
पुतळे असावेत की नसावेत, यावर विचार मांडण्यापूर्वी ‘पुतळा’ ही संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे, असं मला वाटतं. कोणता ना कोणता आदर्श समोर ठेवून प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन जगत असते. मगे तो आदर्श कौटुंबिक, सामाजिक, राजकीय शैक्षणिक, अध्यात्मिक वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो. यात काही भाग अनुकरणाचाही असतो. अगदी लहान मूलसुद्धा याला अपवाद ठरत नाही. म्हणूनच, एखादा चिमुरडा सहजपणे सांगतो, ‘मी मोठ्ठा झाल्यावर बाबांसारखा प्राध्यापक, डॉक्टर होणार आहे…’ तर एखादा सांगतो, ‘मला जयंत नारळीकर, सचिन तेंडुलकर व्हायचं आहे…’ एखादी मुलगी मोठ्या ऐटीत सांगते, ‘मी किरण बेदी होणार! लता मंगेशकर होणार!’
थोडक्यात, आमचे हे आदर्श आम्हाला आमच्यासमोर जिवंत वा मृत असल्यास छायाचित्र, चित्र, पुतळा वा अन्य स्वरूपात साकार करावेसे वाटतात. एखाद्या देवाचं शिल्प जेव्हा उभं राहतं तेव्हा ते मूर्ती ठरतं, तर तेच शिल्प एखाद्या व्यक्तीचं असेल तर तो पुतळा ठरतो. मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात होते तर पुतळ्याची सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कचेऱ्या, शाळा, महाविद्यालये, हमरस्त्यावरील प्रमुख चौक वा अन्य ठिकाणी होते.
पुतळे उभारण्यामागील उद्देश लक्षात घेता, पुतळे असावेत असेच मला म्हणावेसे वाटते. किंबहुना, ती आमची भावनिक गरज आहे, असं म्हणणे चूक ठरू नये. गुरू द्रोणाचार्यांनी विद्या देण्याचे नाकारले तेव्हा एकलव्याने त्यांची प्रतिमा बनवली आणि तिच्या साक्षीने सारी विद्या ग्रहण केली. इतकेच नव्हे तर, तो एक उत्कृष्ट धनुर्धारी बनला.
दुर्दैवाने आज मात्र पुतळे नसावेत, असं म्हणण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुतळे उभारण्यामागील जे प्रमुख उद्देश असतात – व्यक्तीची स्मृती चिरंतन ठेवणे, तिच्या आचार- विचारांना अनुसरणे, त्यांच्या चरित्रांचा आणि चारित्र्याचाही अभ्यास करणे इत्यादी – तेच बाजूला फेकले गेले आहेत. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींचे पुतळे उभे आहेत. पण त्यांच्या हयातीत झाली नसेल एवढी विटंबना आज त्यांच्या विचारांची होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रनिष्ठा नको, गांधींची अहिंसा नको, नेहरूंसारखे अथक परिश्रम नको, टिळकांचा बाणेदारपणा नको, विवेकानंदांची धीर-गंभीरता नको, सावरकरांची विज्ञाननिष्ठा नको, तर आंबेडकरांची ज्ञाननिष्ठा-ज्ञानपिपासा नको. मग हवेत कशाला हे पुतळे?
हेही वाचा – गैरसमज…
जयंती वा पुण्यतिथीला त्यांच्या पुतळ्याला एक हार चढवला की पुढल्या वर्षापर्यंत त्यांचा आमचा संबंध संपलेला असतो… इतिकर्तव्यता संपलेली असते. त्या पुतळ्यांची स्वच्छता आणि व्यवस्था बघण्यासही कोणास सवड नसते. हार घालणे इतकीच काय ती आमची कार्यतत्परता! त्या त्या दिवशी भले मोठे भोंगे लागून गौरवपर गीते, नाहीतर आरत्या गाऊन मोकळे व्हायचे… त्या त्या पुतळ्याला हार घालून देवत्व देऊन टाकायचे आणि मग एक मोठा नमस्कार ठोकला की, पुढल्या वर्षापर्यंत त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या महान कार्याची आम्हाला आठवणही होत नाही.
एक कोणीतरी माथेफिरू येतो, एखाद्या पुतळ्याची विटंबना करतो आणि क्षणात सर्वत्र दंगल उसळते. हिंसाचार-दुराचार यांना ऊत येतो… आणखी एखादा उठतो आणि एखादा खुनी किती थोर होता आणि त्याचे मंदिर का व्हायला हवे? हे कंठशोष करत सांगत सुटतो. या सगळ्याच घटना अनाकलनीय! एकाच भूमातेच्या पोटी जन्माला आलेली ही माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात. दंगल माजवतात. इतक्या ठिसूळ असतात आमच्या भावना? पुतळ्यांचा उपयोग जर जातीय तेढ, ताणतणाव, विद्वेष वाढविण्यासाठी होणार असेल तर कशाला हवेत पुतळे?
आमच्या या सर्व पुतळ्यांची विटंबना थांबवायची असेल तर त्यासाठी सर्वच राजकारणी आणि समाजकारणी लोकांनी जो भ्रष्टाचार, हिंसाचार, दुराचार यांचा गलिच्छ खेळ चालवला आहे, तो थांबणे नितांत आवश्यक आहे. समाज-मन निरोगी- निकोप बनविण्याची चिंता कोणालाच उरलेली नाही!
इतका सारा उहापोह केल्यावरही, इतकी प्रतिकूल परिस्थिती असूनही पुतळे उभारणे आवश्यकच आहे. फक्त त्यासाठी काही पथ्ये आम्ही कटाक्षाने पाळायला हवीत. विशेषत:, पुतळ्यांची उभारणी जातीनिहाय होऊ नये. या सर्व थोर व्यक्तींचे विचार श्रेष्ठ आहेत हो! श्रेष्ठ विचारांना कधीही जात, धर्म, पंथ, देश यांच्या मर्यादा नसतात… आणि हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. समाजमन निरोगी, बुद्धिवंत, विचारवंत होण्यासाठी सरकारवर विसंबून राहता कामा नये- यासाठी आम्ही नागरिकांनीच काही योजना अमलात आणल्या तर!
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
अत्यंत महत्वाचे म्हणजे, भारतीय समाजाचा अगदी पुरातन काळापासून अभ्यास केला तर असं लक्षात येतं की, आपला आदर्श त्याला नेहमीच सगुण-साकार स्वरुपात हवा असतो; निर्गुण-निराकाराला तो आदर्श म्हणून नाही स्वीकारू शकत… आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा ठामपणे हेच सांगेन की, आम्हाला पुतळे हवे, पण ते त्यांच्या गुणांच्या पूजेसाठी, गुणांच्या अनुकरणासाठी… केवळ वर्षातून एकदा हार घालण्यासाठी नव्हे! तरच आमची वाटचाल अधिक सुकर होईल, मानवतेचा झेंडा फडकवण्यासाठी होईल…


