दिनचर्येतील लवकर उठणे, ठराविक वेळेस आहार सेवन करणे, लवकर झोपी जाणे आणि सुखनिद्रेचा आनंद आणि लाभ घेणे, याबाबत सविस्तर तपशील आपण मागील लेखांमध्ये जाणून घेतले. या लेखात आपण मलविसर्जन (कोठा साफ असणे) या विषयासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत.
वास्तविक, शौच म्हणजे मलविसर्जन करणे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि म्हणूनच यात काय जाणून घ्यायचे, असे वरकरणी वाटू शकते. परंतु आपण नेहमी अनुभवत असलेल्या एका साध्या गोष्टीवरून या विषयाचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल. आपली प्रकृती बिघडल्यावर आपण जेव्हा डॉक्टर/वैद्य यांच्याकडे जातो, तेव्हा डॉक्टर/वैद्य एक साधा प्रश्न नेहमी विचारतात, तो म्हणजे ‘पोट नियमित साफ होतं का?’ पोटाचे विकार असले तर हा प्रश्न साहजिक आहे. पण बरेचदा इतर आजारांत देखील असा प्रश्न विचारला जातो. यावरून शौच/मलविसर्जन या विषयाचे महत्त्व खरोखरच अधोरेखित होते.
आजच्या धकाधकीतील बदललेल्या जीवनशैलीत बहुतांश लोकांच्या बाबतीत वेळ मिळेल तसा मलविसर्जन हा विधी उरकण्याकडे अधिक कल दिसून येतो. आपले शरीर मलविसर्जनाची सूचना देत असते, परंतु काही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले जाते, परिणामी मलविसर्जन नैसर्गिक रहात नाही. ही बाब क्षुल्लक समजली जाते आणि नकळत लागलेल्या या वाईट सवयीचे आरोग्यावर घातक दुष्परिणाम होतात.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सुखनिद्रेसाठी निवडक उपयुक्त उपाय
मलविसर्जनाविषयी थोडक्यात…
या विषयी इथे थोडक्यात शास्त्रीय माहिती घेणे यथार्थ होईल.
अन्नावाटे शरीरात घेतलेल्या पदार्थांचे पचनसंस्थेत पचन होते आणि त्यानंतर उरलेला टाकाऊ भाग म्हणजे मल होय. मल हे तीन प्रकारचे आहेत – पुरीष, मूत्र आणि स्वेद. मल मोठ्या आतड्यातून मलाशयात येतो. त्यावेळेस मेंदूकडे संवेदना जाऊन मलप्रवृत्ती निर्माण होते. काही कारणास्तव मलविसर्जन न झाल्यास अधिक मल मलाशयात येऊन पुन्हा तसा संदेश मेंदूकडे जाऊन मलप्रवृत्ती निर्माण होते आणि गुदद्वारातून मलविसर्जन होते.
तद्वतच मूत्रपिंडात तयार झालेले मूत्र एकत्रित होऊन मूत्रवाहक नलिकेतून मूत्राशयात सोडले जाते. ठराविक प्रमाणात मूत्र साठल्यानंतर तसा संदेश मेंदूकडे जाऊन मूत्रविसर्जनाची भावना होते. मूत्राशयापासून मुत्रोत्सर्जक नलिकेमार्फत मूत्रविसर्जन होते.
सोप्या भाषेत मलमूत्र विसर्जनाबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण मलविसर्जनाची योग्य वेळ याबाबत जाणून घेऊयात.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे
मलविसर्जनाची योग्य वेळ
सकाळी सहा वाजेपर्यंत वाताचा काळ असल्याने नैसर्गिक मलप्रवृत्ती होऊन मलविसर्जन झाल्यास दिवसभर हलके आणि उत्साही वाटते.
आता आपण मलविसर्जनाविषयी इतर महत्त्वाचे निवडक मुद्द्यांवर मार्गदर्शन घेऊयात.
मलविसर्जन : महत्त्वाचे निवडक मुद्दे
- मलमूत्र हे शरीराचे वेग असून त्यांना रोखले तर विविध शारीरिक समस्यांना आयतेच आमंत्रण मिळेल. त्यामुळे मलमूत्र विसर्जनाचे संकेत आले की, त्यांची पूर्तता त्वरित करावी.
- सकाळी उठल्यावर पेलाभर कोमट पाणी प्यावे. प्रकृतीनुसार पाण्यात लिंबाचा रस घालणे लाभदायक आहे. यामुळे शौचाला साफ होऊन पोटाचे आरोग्य चांगले राहते.
- पोट साफ होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात तूप घालून प्यावे.
- शौचासाठी भारतीय पद्धतीचा संडास वापरावा. परंतु कमोड वापरणे गरजेचे असल्यास कमोडसमोर छोटे स्टूल घेऊन दोन्ही पाय त्यावर ठेवावेत. मलविसर्जन व्यवस्थित होण्यासाठी असे करणे हितकारक आहे.
- पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर, शरीरातील सर्व मल बाहेर न पडता शरीरात साठतो. अशा मलाचा प्रकोप होऊन प्रकुपित मल शरीरात व्याधी उत्पन्न करतो. म्हणूनच व्यवस्थित अन्नपचन आणि नियमित मलविसर्जन यांचे दिनचर्येत महत्त्व आहे.
याबाबतीत एक महत्त्वाची बाब सदैव लक्षात ठेवावी ती म्हणजे – ‘ज्याचे पोटाचे आरोग्य चांगले तो आरोग्याचा राजा होय.’
म्हणूनच निरामय आरोग्यासाठी मलविसर्जनाच्या नियमित वेळेचे पालन करणे नितांत आवश्यक आहे.
या संदर्भात आवर्जून सांगायचे झाल्यास – निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या आहार-विहार आणि मानसिक आरोग्य या पुस्तकांत ‘आरोग्यदायी विहार’ आणि ‘निसर्गसुसंगत दिनचर्या’ या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
क्रमशः



Thank you for this post nice information