त्याला जाऊन आज आठवडा झाला. पण ती गोष्ट मन मानायला तयार नाही. वाटलं येईल कुठून तरी आणि पायाशी घुटमळत बसेल, जोवर मी डोके कुरवाळून त्याचे लाड करत नाही! माझा बेस्ट फ्रेंड होता तो. खऱ्या मित्रांपेक्षाही जवळचा. सगळे लाड आणि हट्ट पुरवून घ्यायचा. आमच्या घरातील एक हक्काचा बनला होता तो!
काही वर्षांपूर्वी एक दिवस दुपारचा भाजी मार्केटमधून आमच्या माईच्या मागोमाग थेट बंगल्यात आला पाहुणा म्हणून. झाले विक्रमला म्हणजे माझ्या धाकट्या भावाला तो फार आवडला. त्याने बाबांजवळ हट्ट धरून त्याला बंगल्यात ठेऊन घेतला. बघता बघता घरातील सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. त्याच्या काळ्यासावल्या रंगावरून माईने त्याचे नाव ‘कन्हैया’ ठेवले! त्याचा काही हट्ट नसायचा. घरात जे जेवण बनायचे, ते तो आवडीने खायचा. तो ज्या दिवशी आला, तो दिवस पकडून त्याचा वाढदिवस सुद्धा आम्ही मोठ्या आनंदात साजरा करायचो दरवर्षी… बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ त्याचा खडा पहारा असायचा.
विक्रमने हट्ट धरून त्याला घरी ठेवला खरा पण त्याचा उत्साह काही दिवसांतच मावळला आणि मग कन्हैयाची जबाबदारी आपसूकच माझ्यावर आली… त्याचे खाणेपिणे, आठवड्याची आंघोळ, रोज सकाळ आणि रात्री त्याला फिरवून आणणे ही सगळी काम माझ्या रोजच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट झाली. मी नसलो कधीतरी तर मात्र विक्रम रडतखडत का होईना, पण माझी कामं करायचा. विक्रमची खरी कसोटी लागायची जेव्हा कामानिमित्त माझे मुंबई बाहेर जाणे व्हायचे. बऱ्याचदा मी पहाटे निघून रात्री उशिराने परतायचो. प्रवासाची बॅग मी काढली भरायला की, कन्हैय्याला अंदाज यायचा… मग आदल्या रात्री त्याचे जास्त लाड करायला लागायचे मला. त्याला जवळ घेऊन मी सांगायचो की, ‘बाबा रे मी उद्या नाहीये तर विक्रमकडून तुझं सगळे नीट करून घे.’
मी पहाटे निघालो की, दरवाजाच्या आवाजाने हा देखील अंगणातील त्याच्यासाठी बांधलेल्या लाकडी घरातून उठायचा. त्याच्याशी दोन शब्द बोलल्याखेरीज माझा पाय बंगल्यातून निघत नसे. मी रात्री उशिराने येईस्तोवर स्वारी जागी असायची आणि मी बंगल्यात शिरताच माझ्या अंगावर असा काही झेपावायचा की, जणू काही तो सांगायचं की, ‘आधी माझ्याशी बोल आणि मगच घरात जा.’
हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?
एकदा मी असाच दोन दिवसांनी येणार होतो, तेव्हा तर कन्हैय्याने कमालच केली होती. रात्री बिलकुल जेवत नव्हता. शेवटी विक्रमने मला व्हिडीओ कॉल केला. मी कन्हैय्याशी बोललो. त्याला कळात नव्हते की, नक्की आवाज कुठून येतो आहे. पण त्याचे जेवण संपेपर्यंत माझा व्हिडीओ कॉल सुरू होता.
खरंच पाळीव प्राण्याचं जग किती वेगळे असते! आपल्यासारखे त्यांना बोलता येत नाही. पण तरी देखील त्यांच्या भावना ते तुमच्यापर्यंत कशाही करून पोहोचवतातच, एवढे मात्र खरे! रविवार म्हणजे त्याचे आणि माझे वेगळेच विश्व असायचे. आम्ही दोघेही रविवारची आतुरतेने वाट बघायचो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या दोघांची धमाल सुरू असायची. माईसुद्धा मला लटके रागावून म्हणायची की, “राहुल अरे, त्याचे ठीक आहे, पण तूसुद्धा लहान मुलासारखे वागतो आहेस.”
मग मी माईला ठणकावून सांगायचो की, “माई रविवारी आम्हाला काहीच बोलायचे नाहीस तू. आज आमच्या दोघांचा दिवस आहे. आज घड्याळ बंद आहे. आम्ही मनसोक्त मजा करणार.” मी खरंच कन्हैय्यासोबत बंगल्याच्या आवारात अगदी धुडगूस घालायचो. जरी माई रागावली असली तरी, आमच्या दोघांतील भावनिक नाते तिला अचंबित करायचे. आमचे दोघांचे बागडणे ती कौतुकाने पाहात राहायची.
असा हा आमचा लाडका कन्हैया काही आजाराचे निमित्त होऊन एक दिवस अचानक आम्हाला सोडून गेला. तो तर घरातीलच सदस्य होता. कोणी कोणाचे सांत्वन करायचे, असे झाले होते त्या दिवशी! सगळ्यात जास्त धक्का माईला बसला होता, कारण तीच जास्त वेळ त्याच्या सोबत घालवायची. संबंध घरावर शोककळा पसरली होती. आमच्या नकळत आमच्या मोठया कॉलनीमध्ये कन्हैय्या कितीजणांचा लाडका होता, हे त्याला शेवटचे बघण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनी आणि तरुण मुलामुलींकडे बघून आम्हाला कळले.
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
एक अध्याय संपला होता…
कन्हैयाशिवाय जगणे पुढचे कितीवरी दिवस आम्हाला किती जड गेले, ते आमचे आम्हालाच ठावूक. आजही माई त्याच्या आवडीचे काही केले घरात तर, त्याच्या वाटणीचे एका ताटात ठेऊन ते ताट ती अंगणात ठेवते. पक्षी येऊन ते खातात आणि त्यावेळी माईचे डोळे पाण्याने भरून येतात…


