संगीता भिडे
“अहो, मी आज ‘आजची तरुण पिढी’ या विषयावर बोलणार आहे.”
“त्यात काय आहे विशेष असं बोलायला?” इति ‘अहो’.
“तरी पण…” – मी.
“मग सांगा – आजची तरुण पिढी बिघडली… संपला विषय!”
“अहो, पण मग आपला मुलगा?”- अस्मादिक.
“तो? तो तर पारच -” ‘बिघडलाय’ या अर्थाचे नुसतेच हातवारे आणि “तोही तुमच्यामुळे” – ‘अहों’ची ग्वाही.
या पुढला सुखसंवाद सांगण्यात अर्थ नाही, पण मी मात्र त्यामुळे खूपच अंतर्मुख झाले. सहजच माझ्या पिढीच्या तारुण्याकडे वळून पाहिलं आणि एक संवाद जसाच्या तसा आठवू लागला. मी कॉलेजला असताना भालप्रदेशावर कुंकू बऱ्याच उंचावर लावत असे. एका संसृ्कतीरक्षक काकांनी लगेच मला टोकलं, “हल्ली कुंकू बरंच वर वर चाललंय?” उगाचच गप्प बसणं स्वभावात नाही. उत्तर देऊन मोकळी झाले, “काका, कुंकू वर चाललंय हे तर खरंच, पण मला वाटतं, माझ्या पुढल्या पिढीपर्यंत ते पुन्हा खाली येईल, बरं का काका!” आणि खरंच आश्चर्य म्हणजे हे कुंकू आता दोन भुवयांच्या मधे विराजमान झालं आहे.
हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं
थोडक्यात काय? तर, प्रत्येक कालची पिढी आजच्या तरुण पिढीच्या नावाने ‘ती बिघडली’ म्हणून कंठशोष करत असते आणि उद्या काय होणार, या चिंतेने कपाळाला हात लावून बसते. खरं म्हणजे काल, आज आणि उद्या या संकल्पना इतक्या सापेक्ष आहेत की, अगदी आदिकालापासून आजपर्यंत एकजात सर्व पिढ्या बिघडल्या आहेत, असाच निष्कर्ष काढावा लागेल. मग ‘बिघडणे’ म्हणजे नक्की काय आणि नेमकं काय समजायचं? जिथे जिथे पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा, नितीनियम, वेष, इत्यादी बदलण्याचा, मोडून काढण्याचा प्रयत्न होतो, तिथे तिथे ती व्यक्ती, तो समाज आणि राष्ट्र सुद्धा ‘बिघडले’ या सदरात मोडू लागलेत आणि म्हणूनच फुले, आंबेडकर, आगरकर, सावरकर इत्यादी मंडळी आज आमच्यासाठी ‘समाज सुधारक’ असली तरी, त्यांच्या काळात बिघडलेलीच माणसं होती. परिणामी, महात्मा फुले, सावित्रीबाई यांना जनतेने भिरकावलेले दगड झेलावे लागले, आगरकर यांची त्यांच्या जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली तर, सावरकरांना वाळीत टाकण्याची भाषा होऊ लागली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
मला तर अधिक पुढे जाऊन असं म्हणावसं वाटतं, ‘बिघडणे’ हे जर ‘घडणे’साठी उद्युक्त होत असेल तर, हा प्रत्येक व्यक्तीचा, समाजाचा, आणि राष्ट्राचाही एक अंगीभूत गुणधर्म आहे, असं समजायला काय हरकत आहे? परिणामी, व्यक्तीची, तो राहतो त्या समाजाची, राष्ट्राची प्रगतीपथावर वाटचाल झालेली दिसते. असं जर आहे तर, ‘बिघडणे’ या गोष्टीचा एवढा बाऊ कशासाठी करायचा? आणि आजच्या तरुण पिढीवर ती बिघडली म्हणून कालच्या पिढीने शिक्का तरी का मारायचा? याला एकच उत्तर संभवतं, बिघडण्याला सुद्धा दोन बाजू असतात – एक ईष्ट आणि दुसरी अनिष्ट!
दुर्दैवाने अनिष्ट बाजूच प्रत्येक पिढीगणिक वाढत चालली आहे, हे मात्र खरंय. उदाहरणेच द्यायची झाली तर याला कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक वा अन्य कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. प्रत्येक क्षेत्रातच परमार्थापेक्षा स्वार्थाला महत्त्व अधिक मिळू लागलंय. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ ही जीवनशैली मागे पडून ‘उच्च राहणी, नीच विचारसरणी’ प्रतिष्ठा मिळवू पाहतेय.
मुलाने पित्यासमोर अपेय पान करणे, विद्यार्थ्याने शिक्षकावर प्राणघातक हल्ला करणे, विरोधी व्यक्तीला हल्ला करून संपवून टाकणे यासारख्या बाबींचा कोणालाही विधिनिषेध उरलेला नाही. एकूण जीवनच चंगळवादी, भोगवादी बनविणे हे निश्चितच अधोगतीचे आणि वैचारिक अध:पतनाचे गमक आहे.
वैज्ञानिक साधनांची सहज उपलब्धता असून सुद्धा पिढीगणिक अभ्यासू वृत्ती, सेवाभाव, आदरभाव, श्रमप्रतिष्ठा इत्यादी गोष्टींची घसरणच चालू असल्याचे दिसते. झटपट पैशाच्या भूताने तर तरुण पिढीला एवढे ग्रासले आहे की, भ्रष्टाचार, अनाचार हाच शिष्टाचार होऊ पाहतोय. बेबंद, नीतीशून्य कटू फळ आजच्या पिढीला लागलेले बघताना नक्कीच अतीव वेदना होतात.
हेही वाचा – अनोखा बंधूभाव
हे सर्व चित्र खरं असलं तरी, आजच्या तरुण पिढीवर संपूर्ण जबाबदारी निश्चितच टाकता येत नाही. कारण प्रत्येक पिढी आपल्या पहिल्या पिढीच्या खांद्यावर उभी असते. साहजिकच आजच्या तरुण पिढीचे क्षितिज कालच्यापेक्षा रुंदावलेले असते. दुर्दैवाने टिळक, गांधी, नेहरू, बोस, आगरकर, आंबेडकर, सावरकर इत्यादींसारखे कर्तृत्ववान हिमालय, क्षितिजावर दूरवर नजर टाकूनही दृष्टिपथात येत नाहीत. समोर आदर्श आहे तो, वाटेल तेवढी खुनाखुनी करून, स्मगलिंग करूनही हीरो ठरलेल्या फिल्मी नायकाचा, राजकारणाचा उपयोग देशहितापेक्षा स्वहितासाठी करणाऱ्या स्वार्थी पुढाऱ्यांचा, स्वतःच्या संपत्तीचे विसर्जन न करता ती वाढवण्याच्या मागे लागलेल्या साम्यवादी विचारवंतांचा, ‘बिना सहकार नाही उद्धार’ असे म्हणून निर्धनांना अधिक निर्धन बनवणाऱ्या सहकारसम्राटांचा, जातीयतेचे निर्मूलन करण्याऐवजी त्यालाच खतपाणी घालणाऱ्या ढोंगी समाज धुरीणांचा, विद्यार्थ्यांना पदव्या विकत देणाऱ्या शिक्षणमहर्षींचा, स्वतः ऐषारामात राहून जनतेला अध्यात्माचे काढे पाजणाऱ्या अध्यात्मवाद्यांचा!
तात्पर्य, आजची तरुण पिढी बिघडली, तिने अनिष्ट वळण घेतलं, हे जरी खरं असलं तरी ही पिढी हाताबाहेर गेली आहे, असं मला तरी वाटत नाही. कारण या पिढीला इष्ट दिशा दाखवणं तुमच्या- आमच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, समाजधुरिणांच्या आणि राज्यकर्त्यांच्याच हातात आहे; याचं भान जर योग्य वेळी आलं तर अजूनही योग्य तो बदल होऊ शकतो. मात्र यासाठी प्रत्येक व्यक्तीने बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ, विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणे नितांत आवश्यक आहे. अजूनही आमच्या राष्ट्रात, समाजात, कुटुंबात संख्येनं कमी असले तरी उत्कृष्ट उपदेशक, मार्गदर्शक, दिशादर्शक व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याकडे आमच्या पाल्यांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणे हे निश्चितपणे कालच्या म्हणजे आमच्या पिढीचे कर्तव्य आहे, एवढे जरी आम्हाला करता आलं तरी मला वाटतं, ‘आजची तरुण पिढी बिघडली आहे,’ असा कंठशोष न करता ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बी बिघडाना’ असेच आजच्या तरुण पिढीला आम्ही ताठ मानेने सांगू शकू… आणि स्वातंत्र्यसूर्याचा उषःकाल होता होता, भवताली जी काळरात्र झाली आहे, याची चिंता न वाटता ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल’ असा विश्वास आम्ही देऊ शकू.
इति अलम्!


